ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला आणखी तीन महिन्यांची (ऑक्टोबर 2022-डिसेंबर 2022) मुदतवाढ देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

Posted On: 28 SEP 2022 5:11PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 सप्‍टेंबर 2022

 

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत सर्व लाभार्थींना दरमहा प्रति व्यक्ती 5 किलो मोफत धान्याचे वितरण डिसेंबर 2022 पर्यंत सुरू राहणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 साली लोकहितार्थ केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अतिरिक्त अन्न सुरक्षा बहाल करण्याच्या अनुषंगाने, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला, सातव्या टप्प्यांतर्गत आणखी तीन महिन्यांची (ऑक्टोबर ते डिसेंबर 2022) मुदतवाढ द्यायला केंद्रिय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

कोविड महामारीचे  परिणाम आणि इतर विविध कारणांमुळे अवघे जग असुरक्षित परिस्थितीशी दोन हात करत असताना, भारतातील सर्वसामान्य नागरिकांना सहज आणि परवडण्याजोग्या पद्धतीने अन्न उपलब्ध व्हावे, यासाठी भारत सर्वतोपरी खबरदारी घेत असून आपल्या देशातील असुरक्षित घटकांसाठी अन्न सुरक्षेची खातरजमा करत आहे.

महामारीच्या  कठीण काळातून सर्वसामान्य लोक बाहेर पडत आहेत, हे लक्षात घेत सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. समाजातील गरीब आणि असुरक्षित घटकांना नवरात्र, दसरा, मिलाद-उन-नबी, दिवाळी, छठ पूजा, गुरुनानक देव जयंती, नाताळ असे सण आनंदाने साजरे करता यावेत, या विचाराने हा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी सणांच्या काळात कोणत्याही प्रकारची आर्थिक ओढाताण न करता समाजातील या वर्गाला सहजरित्या अन्नधान्य उपलब्ध होत राहिल, या दृष्टीकोनातून शासनाने या योजनेला तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंबे तसेच थेट लाभ हस्तांतरण योजनेच्या सर्व लाभार्थींना या कल्याणकारी योजनेंतर्गत प्रति व्यक्ती दरमहा 5 किलो धान्य मोफत दिले जाते आहे.

या योजनेच्या सहाव्या टप्प्यापर्यंत सरकारने आतापर्यंत 3.45 लाख कोटी रुपये इतका निधी खर्च केला आहे. योजनेच्या सातव्या टप्प्यात 44,762 हजार कोटी रूपये इतका अतिरिक्त खर्च अपेक्षित असून, त्यासह या योजनेच्या सर्व टप्प्यांमधील एकूण खर्च 3.91 लाख कोटी रूपये असणार आहे. या योजनेच्या सातव्या टप्प्यात सुमारे 122 लाख मेट्रिक टन अन्नधान्य प्रदान केले जाणार आहे.

योजनेच्या पहिल्या टप्प्यापासून सातव्या टप्प्यापर्यंत एकूण 1121 मेट्रिक टन अन्नधान्याचे वितरण अपेक्षित आहे.

सुरू झाल्यापासून आतापर्यंत गेले 25 महिने ही योजना कार्यान्वित आहे. तपशील पुढीलप्रमाणे :

  • पहिला आणि दुसरा टप्पा ( 8 महिने) : एप्रिल’20 ते नोव्हे.’20 
  • टप्पा क्र. 3 ते 5 (11 महिने) : मे’21 ते मार्च’22
  • सहावा टप्पा (6 महिने)  : एप्रिल’22 ते सप्टें.’22

 

* * *

S.Kane/M.Pange/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1862991) Visitor Counter : 181