वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
बहुराष्ट्रीयत्वाचे आदर्श सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्याचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे आवाहन
विशेषतः व्यापार तसेच गुंतवणूक यांच्याशी संबंधित विषय आणि प्राधान्यक्रम याबाबतीत मंत्रिस्तरीय बैठकीत सर्वानुमतीवर आधारित निष्कर्ष नोंदविण्याचे केंद्रीय मंत्र्यांचे आवाहन
Posted On:
22 SEP 2022 9:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 सप्टेंबर 2022
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी बहुराष्ट्रीयत्वाचे आदर्श सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. इंडोनेशियात बाली येथे सुरु असलेल्या जी-20 राष्ट्रांच्या व्यापार,गुंतवणूक तसेच उद्योग या क्षेत्रांशी संबंधित मंत्रिस्तरीय बैठकीच्या सुरुवातीला, उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते.
बहुपक्षीयतेला धोका निर्माण झाला तर जगात परस्पर संवाद तसेच आंतरराष्ट्रीय संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी मंचच शिल्लक राहणार नाही आणि त्यातून मुक्त व्यापार पद्धतीवर परिणाम होतील.
न्याय्य, पारदर्शक आणि नियमांवर आधारलेली बहुराष्ट्रीय व्यापार प्रणाली उभारण्यासाठी सर्व देशांतर्फे एकत्रित कटिबद्धता दर्शविण्यासाठी सर्वानुमतीवर आधारित निष्कर्ष मिळविण्यासंदर्भात इंडोनेशियाच्या अध्यक्षांनी केलेल्या प्रयत्नांना भारताचा खंबीर पाठींबा आहे याचा केंद्रीय मंत्र्यांनी पुनरुच्चार केला.
बहुराष्ट्रीयत्व हा जागतिक व्यापाराचे व्यवस्थापन करुन या व्यापाराची वाढ करण्यासाठी आवश्यक असलेला पाया आहे, यावर भारताचा दृढ विश्वास आहे या गोष्टीवर भर देत, केंद्रीय मंत्री गोयल यांनी जागतिक व्यापार संघटनेच्या 12व्या मंत्रीस्तरीय परिषदेतून मिळालेल्या निष्कर्षांचे स्वागत केले. या परिषदेतून जागतिक व्यापार संघटनेतील सुधारणा तसेच कोविड-19 संदर्भातील निदान आणि उपचार यांच्याशी संबंधित साहित्याचे उत्पादन तसेच पुरवठा यांच्यासाठी विहित करण्यात आलेल्या 6 महिन्यांच्या कालावधीबाबत टीआरआयपीएसमधून देण्यात आलेल्या सवलतीची कालमर्यादा वाढविणे यांच्यासह निर्देशित करण्यात आलेल्या इतर महत्त्वाच्या क्षेत्रांबाबत जी-20 मधील सदस्य देशांनी सकारात्मक आणि वेळेवर चर्चा कराव्यात असा आग्रह त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मत्स्यपालन वाटाघाटी आणि सार्वजनिक साठेबाजीवर कायमस्वरूपी तोडगा, ई-कॉमर्स स्थगितीवर कायमस्वरूपी उपाय याकडे सदस्यांनी तातडीने लक्ष देऊन निर्णय घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी सदस्यांना सांगितले.
महामारी आणि इतर अलीकडील भू-राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, जगाने पुरवठा साखळीतील व्यत्यय पाहिला आहे. या आव्हानांना तोंड देण्याची नितांत गरज असल्याचे ते म्हणाले.
हवामान बदलावर गंभीर चिंता व्यक्त करून त्यांनी परंपरा, संवर्धन आणि संयमाच्या मूल्यांवर आधारित निरोगी आणि शाश्वत जीवन जगण्याच्या मार्गाला चालना देण्याचे आवाहन केले. या संदर्भात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रस्तावित केलेला पर्यावरणासाठी जीवनशैली’ हा ‘लाइफ’ दृष्टीकोन हा शाश्वत जीवनशैलीला चालना देण्यासाठी आणि पर्यावरणीय शाश्वतता वाढविण्यासाठी एक प्रभावी साधन ठरू शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.
त्यांनी सर्व सदस्यांना अत्यंत लवचिकता दाखविण्याचे आणि जूनमध्ये झालेल्या बाराव्या जागतिक व्यापार संघटनेच्या मंत्री परिषदेतील अनुभवातून मार्ग काढण्याचे आवाहन केले. या परिषदेत योग्य आणि न्याय्य व्यापाराला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण, फलदायी चर्चा झाली होती. त्यात भारताच्या भूमिकेला लक्षणीय पाठिंबा मिळाला होता आणि अनेक सदस्यांनी फलप्राप्ती प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा व्यक्त केली आणि भारताच्या प्रस्तावांना अनुकुलता दाखविली होती.
R.Aghor /Sanjana/Prajna/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1861624)