विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

हवामान संरक्षणासाठीचा भारताचा पथदर्शी आराखडा केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी केला सामायिक;


जागतिक स्तरावर या समस्येचे निराकरण करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख भूमिका बजावत असल्याचे प्रतिपादन

नवी दिल्ली येथे "एकीकृत धोरण निर्मितीसाठी व्यवस्थेचे विश्लेषण"

("सिस्टम्स ॲनालिसिस फॉर एनेबलिंग इंटिग्रेटेड पॉलिसी मेकिंग") या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत सिंग यांनी केले उद्‌घाटनाचे भाषण

Posted On: 10 AUG 2022 9:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2022

 

एकीकृत धोरण निर्मितीसाठी व्यवस्थेचे विश्लेषण या 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन, केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान;  राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पृथ्वी विज्ञान;  डॉ जितेंद्र सिंग यांनी आज इथे केले.  हवामान संरक्षणासाठीचा भारताचा पथदर्शी आराखडा त्यांनी सामायिक केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक स्तरावर या समस्येचे निराकरण करण्यात आघाडीची भूमिका बजावत आहेत असे त्यांनी यावेळी सांगितले.

भारताने पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात  समान परंतु भिन्न जबाबदारी (सीबीडीआर) तत्त्वावर, निराकरण उपायांबद्दल जगासमोर एक पथदर्शी आराखडा सादर केला आहे असे डॉ जितेंद्र सिंग म्हणाले. भारत 2030 पर्यंत  एकूण हरितगृह वायू उत्सर्जन (जीएचजीएस) एक अब्ज टन कमी करण्यासाठी वचनबद्ध आहे, जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व 2030 मध्ये एकूण वापराच्या 50 टक्क्यांनी कमी करणार आहे;  कार्बनची तीव्रता 2005 च्या पातळीपेक्षा जीडीपीच्या प्रमाणात  45 टक्क्यांनी कमी करणे आणि 2070 पर्यंत संपूर्ण देश कार्बन तटस्थ करणे यासाठी भारत कटीबद्ध असल्याचेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले.

इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर अप्लाइड सिस्टम्स नालिसिसच्या (आयआयएएसए) सहकार्याने विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागा अंतर्गत (डीएसटी) स्वायत्त संस्था, टेक्नॉलॉजी इन्फॉरमेशन, फोरकास्टिंग अँड असेसमेंट कौसिंलने (तंत्रज्ञान माहिती, अंदाज आणि मूल्यांकन परिषदेने, टीआयएफएसी) या परिषदेचे आयोजन केले. यात सुमारे 1000 शिक्षणतज्ञ, संशोधक, अभ्यासक, सरकारी अधिकारी, आयआयएएसए प्रतिनिधी, विविध विषयांतील धोरणकर्ते सहभागी झाले आहेत.  हवामान बदल, प्रदूषण, स्वच्छ ऊर्जा, उपजीविका आणि डिजिटलायझेशन यासह आशियातील देशांनी व्यापकपणे सामायिक केलेल्या जटिल समस्यांवर ते मंथन करत आहेत.

मलेशिया, श्रीलंका, ऑस्ट्रिया, अमेरिका, चीन, इराण, फिलीपिन्स, जपान आणि जॉर्डनमधील सहभागी तज्ञ, विविध भागधारकांमधील व्यापक परस्परसंवाद केंद्रित  प्रणाली विश्लेषण साधनांचा बहुपक्षीय अनुप्रयोग करत  उपाय शोधत आहेत.

भारत आपल्या विशेष भौगोलिक-हवामानाच्या परिस्थितीमुळे नेहमी नैसर्गिक आपत्तींचा बळी ठरतो असे त्यांनी सांगितले. पूर, दुष्काळ, चक्रीवादळ, भूकंप आणि भूस्खलन या वारंवार घडणाऱ्या घटना आहेत, परंतु अलीकडच्या काळात घटनांच्या वारंवारता आणि तीव्रतेची अनिश्चितता वाढली आहे.  हवामान बदल याला कारणीभूत असल्याचे सांगितले जाते असे ते म्हणाले. भारत आपत्ती व्यवस्थापनात अग्रेसर असल्याने हवामान बदलासारख्या जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी जग आपल्याकडे अपेक्षेने पाहत असल्याचे सिंग यांनी सांगितले.

भारत, स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या रुपात साजरा करत असताना या अत्यंत महत्त्वाच्या परिषदेचे आयोजन करणे हा भारतासाठी खरोखरच अभिमानाचा क्षण आहे असा गौरवपूर्ण उल्लेख करत डॉ जितेंद्र सिंग यांनी भाषणाचा समारोप केला.  

 

 

 

 

S.Kulkarni/V.Ghode/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1850683) Visitor Counter : 132


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu