कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

प्रशासकीय सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संस्थात्मक पातळीवर क्षमताबांधणीची यंत्रणा विकसित केल्याचे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन

Posted On: 18 JUL 2022 7:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 जुलै 2022

 

प्रशासकीय सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संस्थात्मक पातळीवर क्षमताबांधणीची यंत्रणा विकसित केली आहे, असे केंद्रीय पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अवकाश राज्यमंत्री, डाॅ जितेंद्र सिंग यांनी सांगितलं.

नवी दिल्लीतील क्षमता बांधणी आयोगाच्या (CBC) मुख्यालयात “नागरी सेवा प्रशिक्षण संस्थांसाठी राष्ट्रीय मानकांची” सुरुवात करताना डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, नागरी सेवा प्रशिक्षण संस्थांसाठी राष्ट्रीय स्तरावर मानके तयार करण्यासाठी एक अनोखा आदर्श ठेवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे आणि याबाबतीत भारत लवकरच जागतिक आदर्श ठरेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

डॉ जितेंद्र सिंह यांनी क्षमता बांधणी आयोगासह 25 केंद्रीय प्रशिक्षण संस्था, 33 राज्यस्तरीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था आणि इतर नागरी सेवा प्रशिक्षण संस्थांचा समावेश असलेल्या 103 हून अधिक सहभागींच्या उपस्थितीत उदघाटन सोहोळ्याचा एक भाग म्हणून राष्ट्रीय मानकांसाठी वेब-पोर्टल आणि अॅप्रोच पेपरचे उद्घाटन केले.

केंद्रीय प्रशिक्षण संस्थांसाठी त्यांच्या सध्याच्या क्षमतेवर आधाररेखा तयार करण्यासाठी, त्यांची गुणवत्ता आणि प्रशिक्षण वितरणाची क्षमता वाढवण्यासाठी आणि प्रशिक्षणासाठी मानकांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी क्षमता बांधणी आयोगाने नागरी सेवा प्रशिक्षण संस्थांसाठी राष्ट्रीय मानके (NSCSTI) विकसित केली आहेत. हे प्रशिक्षण संस्थांना उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करण्याची महत्वाकांक्षा देखील निश्चित करेल.

मंत्री म्हणाले, मिशन कर्मयोगी हे नवीन भारताच्या संकल्पनेशी तादात्म्य पावणारा सुयोग्य दृष्टिकोन, कौशल्ये आणि ज्ञानासह भावी सुसज्ज नागरी सेवा तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. ते पुढे म्हणाले की क्षमता वृद्धीसाठी प्रशिक्षण हे सर्वात महत्वाचे साधन आहे आणि आम्ही हे सुनिश्चित केले पाहिजे की आमच्या प्रशासकीय सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या गरजांनुसार प्रशिक्षित केले जाईल आणि त्यांना कधीही-कोठेही शिकण्याची संधी मिळेल. नागरी सेवा प्रशिक्षण संस्था या पुरवठा साखळी परिसंस्थेतील सर्वात महत्त्वपूर्ण घटक आहेत कारण आपल्या नागरी सेवा प्रशिक्षण संस्था भारत सरकारच्या 31 लाख कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देतात असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी अधोरेखित केले.

प्रशिक्षण परिसंस्थेतील मानकीकरण प्रशिक्षण संस्थेची क्षमता वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले.

डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, भारताच्या केंद्रीय प्रशिक्षण संस्थांनी (CTIs) अधिका-यांच्या आजीवन प्रशिक्षणात योगदान दिले पाहिजे आणि त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत मार्गदर्शक म्हणून काम केले पाहिजे.

जीवनाच्या सर्व क्षेत्रांतील उत्क्रांतीचा वेग पाहता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा सतत आढावा घेणे आणि त्यात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सांगत मंत्र्यांनी समारोप केला.


* * *

S.Tupe/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1842465) Visitor Counter : 163