कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या लोकशाहीच्या मूलभूत तत्वांचे मूर्तिमंत रूप- केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह
जम्मू काश्मीरमधील उधमपूर येथील मजाल्टा येथे डॉ. जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन
Posted On:
12 JUN 2022 8:43PM by PIB Mumbai
भारतात अगदी गरीब, सर्वसामान्य पार्श्वभूमीतून आलेली व्यक्तीही केवळ आपली गुणवत्ता आणि लोकांच्या पाठिंब्याच्या बळावर सर्वोच्च स्थानी पोहोचू शकते, एवढी आपल्या लोकशाहीची ताकद आहे, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकशाहीच्या या मूलभूत तत्वाचे मूर्तिमंत प्रतीक आहेत, असे प्रतिपादन, डॉ जितेंद्र सिंह यांनी केले. ते आज जम्मू काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यातील मजाल्टा, इथे एका बैठकीत बोलत होते.
एखाद्याचा सामाजिक, आर्थिक स्तर काहीही असो, त्याची भाषा कोणतीही असो, त्याला या राज्यव्यवस्थेत, कोणत्याही क्षेत्रात सर्वोच्च पदावर जाण्याची संधी मिळू शकेल, असा विश्वास त्याच्या आईला वाटणे हे लोकशाहीचे खरे तत्व आहे. लोकशाहीच्या अस्तित्वाचा हाच खरा अर्थ असेल, तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदापर्यंत पोहोचण्यातून, सर्वसामान्य लोकांचा लोकशाहीचे सामर्थ्य आणि भारतीय मूल्यांवरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे, असे डॉ सिंह म्हणाले. त्याचवेळी, केंद्रात गेल्या अनेक पिढ्यांपासून सुरू असलेल्या घराणेशाहीचाही यामुळे अंत झाला आहे, असे त्यांनी सांगितले.

गेल्या आठ वर्षांच्या कार्यकाळात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजातील वंचित घटकांसाठी ज्या योजना आणि कार्यक्रम आणले, ते खरे तर, भाजपाचा “सर्वांना समान न्याय: कोणाचाही अनुनय नाही” या तत्वावर आधारित प्रशासन व्यवस्था आणण्यासाठीच्या गेल्या सहा दशकांपासून सुरु असलेल्या लढ्याचा परिपाक आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर मोदी यांनी स्वतःला गरिबांच्या सेवेसाठी वाहून घेतले आणि देशातील दुर्लक्षित घटकांसाठी तसेच राज्यांच्या विकासासाठी काम करण्याचा संकल्प केला. त्यांच्या आजवरच्या प्रवासाकडे बघताना त्यांची ‘बोले तैसा चाले’ या मार्गाने वाटचाल सुरु आहे, असे आपण सप्रमाण म्हणू शकतो, असेही ते म्हणाले.
मोदींच्या कल्याणकारी योजनांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी देशात नवीन सांस्कृतिक वातावरण आणि नवीन राजकीय संस्कृती आणण्याचा प्रयत्न केला आहे, असे डॉ जितेंद्र सिंग म्हणाले. उज्ज्वला योजना आणि पंतप्रधान आवास योजना यासारखे फायदे जात, पंथ आणि धर्म किंवा राजकीय संलग्नता किंवा मतपेढी विचारात न घेता गरजूंपर्यंत पोहोचत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
उधमपूर-कथुआ-दोडा लोकसभा मतदारसंघापुरता विचार करायचा झाल्यास, डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, इथे देविका नदी आणि पाकलदुल जलविद्युत प्रकल्प यासारखे राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्पच सुरू झाले नाहीत, तर शाहपूर-कंडी प्रकल्प आणि रॅटल प्रकल्प यांसारखे अनेक रखडलेले प्रकल्पही सुरू करण्यात आले. त्याच वेळी, उत्तर भारतातील पहिले औद्योगिक जैव-तंत्रज्ञान उद्यान, कटरा ते दिल्ली असा पहिला एक्सप्रेस कॉरिडॉर सुरू करण्यात आला. या एकाच मतदारसंघात, तीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयेही सुरु करण्यात आली आहेत, असेही डॉ जितेंद्र सिंह यांनी यावेळी सांगितले.
***
VS/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1833359)