पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

लाल किल्ल्यावर आयोजित श्री गुरू तेग बहादूरजींच्या 400 व्या प्रकाश पर्व सोहळ्यात पंतप्रधानांचा सहभाग


पंतप्रधानांनी या प्रसंगी एक स्मृती नाणे आणि टपाल तिकिटाचे केले प्रकाशन

''आदरणीय गुरूंच्या शिकवणुकीनुसार देश पुढे वाटचाल करत आहे''

"शेकडो वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन मिळालेले भारताचे स्वातंत्र्य त्याच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक प्रवासापासून वेगळे करता येणार नाही"

“औरंगजेबाच्या जुलमी विचारसरणीसमोर गुरू तेग बहादूरजींनी 'हिंद दी चादर' म्हणून कार्य केले

"आम्हाला 'नव्या भारता 'च्या तेजोवलयात सर्वत्र गुरु तेग बहादूरजींचा आशीर्वाद जाणवतो "

गुरुंचे ज्ञान आणि आशीर्वादाच्या रूपात आपल्याला ‘एक भारत’ चे सर्वत्र दर्शन होते. ”

"आजचा भारत जागतिक संघर्षाच्या काळातही संपूर्ण स्थैर्यासह शांततेसाठी प्रयत्नशील आहे आणि भारत देशाच्या संरक्षण आणि सुरक्षेसाठी तितकाच खंबीर आहे"

Posted On: 21 APR 2022 11:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 एप्रिल 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर आयोजित श्री गुरू तेग बहादूरजींच्या 400 व्या प्रकाश पर्व सोहळ्यात भाग  घेतला.पंतप्रधानांनी श्री गुरु तेग बहादूरजींना प्रार्थना केली.400 रागी यांनी  शबद /कीर्तन केले त्यावेळी त्यांच्यासोबत  पंतप्रधान प्रार्थनेला बसले. यावेळी शीख नेतृत्वाकडून पंतप्रधानांचा गौरव करण्यात आला. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते स्मृती नाणे आणि टपाल तिकीटाचेही प्रकाशन करण्यात आले.

यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, गुरुंच्या कृपेने ,आदरणीय गुरूंच्या शिकवणुकीनुसार देश संपूर्ण निष्ठेने पुढे वाटचाल करत आहे. पंतप्रधानांनी गुरुंच्या चरणी नतमस्तक झाले. गुरू तेग बहादूर जी यांच्या हौतात्म्याचे साक्षीदार असलेल्या  आणि देशाच्या  इतिहासाचे आणि आकांक्षांचे प्रतिबिंब असलेल्या लाल किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व पंतप्रधानांनी अधोरेखित केले. या पार्श्‍वभूमीवर या ऐतिहासिक ठिकाणी आजचा कार्यक्रम खूप महत्त्वाचा आहे, असे ते म्हणाले.

शेकडो वर्षांच्या गुलामगिरीतून भारताची  मुक्तता आणि भारताचे स्वातंत्र्य हे भारताच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक प्रवासापासून वेगळे करता येणार नाही.म्हणूनच, देश स्वातंत्र्याचा  अमृत महोत्सव आणि श्रीगुरू तेग बहादूरजींचे  400 वे  प्रकाश पर्व एकाच संकल्पाने साजरे करत आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला. आपल्या  गुरुंनी नेहमीच ज्ञान आणि अध्यात्मासोबत समाज आणि संस्कृतीची जबाबदारी घेतली.त्यांनी सामर्थ्य हे सेवेचे माध्यम बनवले, ते पुढे म्हणाले.

ही भारताची भूमी केवळ एक देश नाही तर  आपला महान वारसा  आणि महान परंपरा आहे.याचे जतन संवर्धन आपल्या ऋषीमुनींनी, गुरूंनी शेकडो हजारो  वर्षांच्या तपस्येने आणि समृद्ध  विचारांना केले आहे. असे पंतप्रधान म्हणाले. गुरु तेग बहादूर जी यांच्या अमर बलिदानाचे प्रतीक असलेला लाल किल्याजवळचा  गुरुद्वारा शीशगंज साहिब गुरु तेग बहादूर यांच्या बलिदानाच्या महानतेचे स्मरण  करून देतो, असे मोदी म्हणाले. त्या काळात धर्माच्या नावाखाली हिंसाचार करणाऱ्यांची  धार्मिक कट्टरता आणि टोकाच्या अत्याचारांची पंतप्रधानांनी यावेळी आठवण करून दिली.त्यावेळी भारताला आपली ओळख वाचवण्याची मोठी आशा गुरु तेग बहादूरजींच्या रूपाने उभी राहिली.औरंगजेबाच्या जुलमी विचारसरणीसमोर गुरू तेग बहादूरजी खंबीरपणे  'हिंद दी चादर' म्हणून उभे राहिले., असे पंतप्रधान म्हणाले. गुरू तेग बहादूरजींच्या बलिदानाने भारतातील अनेक पिढ्यांना त्यांच्या संस्कृतीच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी आणि तिच्या आदरासाठी  आणि सन्मानासाठी जगण्याची आणि मरण्याची प्रेरणा दिली आहे.मोठ्या शक्ती नाहीशा झाल्या, मोठी वादळे शांत झाली, पण भारत अजूनही अमर आहे, पुढे जात आहे, असेही ते म्हणाले.आज पुन्हा एकदा जग भारताकडे आशेने आणि अपेक्षेने पाहत आहे, यावर  मोदी यांनी  भर दिला. आम्हाला ‘नव्या भारता'च्या  तेजोवलयामध्ये  सर्वत्र गुरू तेग बहादूरजींचा आशीर्वाद जाणवतो असे पंतप्रधान म्हणाले.

देशाच्या कानाकोपऱ्यात असलेला गुरूंचा प्रभाव आणि त्यांच्या ज्ञानाचा प्रकाश अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की, गुरु नानक देवजींनी संपूर्ण देशाला एका धाग्यात जोडले आहे .गुरु तेग बहादूर यांचे अनुयायी सर्वत्र होते . पाटणा येथील पवित्र पटना साहिब आणि दिल्लीतील रकाबगंज साहिबचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले कीगुरूंचे ज्ञान  आणि आशीर्वादाच्या रूपात आम्हाला सर्वत्र ‘एक भारत’  चे दर्शन होते. शीख वारसा उत्सव साजरे करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा दाखला देत पंतप्रधानांनी नमूद केले कीगेल्या वर्षीच सरकारने साहिबजादांच्या महान बलिदानाच्या स्मरणार्थ 26 डिसेंबर रोजी वीर बाल दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला.शीख परंपरेतील तीर्थक्षेत्रांना जोडण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. करतार साहिबची प्रतीक्षा संपली आहे आणि अनेक सरकारी योजना या पवित्र स्थळांची यात्रा सुकर  आणि सुलभ बनवत आहेत.स्वदेश दर्शन योजनेंतर्गत, आनंदपूर साहिब आणि अमृतसर साहिबसह अनेक प्रमुख ठिकाणांचा समावेश असलेले तीर्थक्षेत्र सर्किट तयार होत आहे. हेमकुंड साहिब येथे रोपवेचे काम सुरू आहे. गुरु ग्रंथसाहिबच्या महिमेला वंदन करत  मोदी म्हणाले की, श्री गुरु ग्रंथ साहिब जी, आपल्यासाठी, आत्म-जाणिवेचे  मार्गदर्शक तसेच भारताच्या विविधतेचे आणि एकतेचे जिवंत स्वरूप आहेत.त्यामुळेच  अफगाणिस्तानात संकट आले तेव्हा आपल्या पवित्र गुरु ग्रंथसाहिबच्या आवृत्त्या परत आणण्याचा प्रश्न निर्माण झाला होता तेव्हा भारत सरकारने पूर्ण ताकद लावली आणि पूर्ण सन्मानाने त्या परत आणल्या. नागरिकत्व सुधारणा  कायद्याने शेजारील देशांतून येणाऱ्या शीख आणि अल्पसंख्याकांसाठी नागरिकत्वाचा मार्ग मोकळा झाला आहे, असेही ते म्हणाले.

भारताच्या तत्त्वज्ञानाच्या गाभ्याबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले, भारताने कधीही कोणत्याही देशाला किंवा समाजाला धोका निर्माण केलेला नाही. आजही आपण संपूर्ण जगाच्या कल्याणाचा विचार करतो. जेव्हा आपण आत्मनिर्भर  भारताबद्दल बोलतो तेव्हा आपण संपूर्ण जगाच्या प्रगतीचा विचार करतो.

आजचा भारत जागतिक संघर्षाच्या काळातही संपूर्णासह स्थैर्यासह  शांततेसाठी प्रयत्न करत आहे  आणि भारत देशाच्या संरक्षण आणि सुरक्षेसाठीही  तितकाच खंबीर आहे. आपल्यासमोर गुरुंनी दिलेली महान शीख परंपरा आहे, असेही ते म्हणाले.

गुरुंनी जुने रूढीवादी विचार बाजूला ठेवून नवीन कल्पना मांडल्या.त्यांच्या शिष्यांनी त्या अवलंबल्या  आणि त्यातून ते   शिकले. नव विचाराची ही सामाजिक मोहीम म्हणजे वैचारिक  पातळीवरचा नवोन्मेष होता. नवीन विचार, सतत कठोर परिश्रम  आणि 100% समर्पण, ही आजही आपल्या शीख समाजाची ओळख आहे.स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सवाच्या काळात आज देशाचा हा संकल्प आहे.आपल्या अस्मितेचा अभिमान असायला हवा. आपल्याला स्थानिकांचा अभिमान असायला हवा, आपल्याला आत्मनिर्भर  भारत घडवायचा आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

 

S.Kane/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1819101) अभ्यागत कक्ष : 242