वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

येत्या पाच वर्षात मसाल्यांची  निर्यात दुप्पट करून  10 अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचवण्याचे पीयूष  गोयल यांचे मसाला उद्योगांना आवाहन


उच्च श्रेणी मूल्यवर्धन आणि नवीन उत्पादनाच्या  विकासावर अधिक भर देत  भारतीय मसाले  उद्योगाची स्पर्धात्मकता  टिकवून ठेवण्याचे उद्दिष्ट :पीयूष  गोयल यांचा मसाला मंडळाला संदेश

वेलची उत्पादक शेतकऱ्यांसाठी नाविन्यपूर्ण हवामान आधारित पीक विमा योजनेचा गोयल यांनी केला  प्रारंभ

Posted On: 26 FEB 2022 10:03PM by PIB Mumbai

 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री, पीयूष  गोयल यांनी आज  येत्या पाच वर्षात या मसाल्यांची निर्यात दुप्पट करून 10 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे आवाहन मसाले  उद्योग क्षेत्राला केले.

''आपण आता मसाल्यांच्या निर्यातीचे 10 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचे महत्वाकांक्षी उद्दिष्ट 2030 पर्यंत पूर्ण करण्याची आकांक्षा बाळगली आहे - मात्र कदाचित त्याहूनही जलद, हे उद्दिष्ट  येत्या पाच वर्षांत आपण गाठू शकतो का? आगामी पाच वर्षांत 2027 पर्यंत आपण आपली निर्यात  दुप्पट करून 10 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचवण्याची  आणि त्यानंतर पुढील पाच वर्षांत आपली निर्यात 10 अब्ज डॉलर्सच्या दुप्पट  करण्याची आकांक्षा बाळगूया'' ,असे गोयल यांनी  मसाले मंडळाच्या 35 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात  दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलताना सांगितले.

2014-21 मध्ये मसाल्यांच्या निर्यातीत 115% आणि मूल्यात (अमेरिकी डॉलर्स) 84% वाढ झाली असून, 2020-21 मध्ये ही निर्यात 4.2 अब्ज डॉलर्स इतक्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचल्याबद्दल गोयल यांनी समाधान व्यक्त केले. "आता, भारतीय मसाले आणि मसाले उत्पादने जगभरातील 180 हून अधिक ठिकाणी  पोहोचत आहेत," असे ते म्हणाले.

''कोविडच्या काळात भारताची औषधे आणि लसींसोबतच जगाने आपल्या मसाले आणि काढ्याचे महत्त्व अनुभवले." असे गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करून सांगितले.

हळदी दूध/हळद लट्टे हे आपल्या आजीचे घरगुती उपाय आणि दालचिनी, तुळस  (तुळशीची पाने) इ. मसाले हे आता जगातील मुख्य  घरगुती पदार्थ बनले आहेत.  किंबहुना, भारताने गेल्या वर्षी हळदीच्या निर्यातीत 42% वाढ नोंदवली, असे  गोयल यांनी सांगितले.

जागतिक मसाले क्षेत्रात  भारत आघाडीवर असला तरी या क्षेत्रालाही आव्हानांचा सामना करावा लागत आहे, असे गोयल म्हणाले. ''अन्न सुरक्षा, गुणवत्ता आणि शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध असताना, जगभरातील विविध ग्राहकांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने उच्च श्रेणी मूल्यवर्धन आणि नवीन उत्पादनाच्या विकासावर भर देऊन भारतीय मसाले उद्योगाची स्पर्धात्मकता टिकवून ठेवण्याचे उद्दिष्ट आहे'', असे त्यांनी सांगितले.

सरकार लवचिक आणि कार्यक्षम कार्यक्रम आणि उपक्रमांद्वारे देशातून मसाल्यांची निर्यात वाढवण्यासाठी उत्सुक आहे, असे गोयल म्हणाले.

या कार्यक्रमादरम्यान गोयल यांनी ,वेलची उत्पादक शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी, मसाले मंडळ आणि भारतीय कृषी विमा कंपनीचा संयुक्त उपक्रम असलेल्याहवामानावर आधारित नाविन्यपूर्ण  पीक विमा योजनेचा प्रारंभ केला. मसाले मंडळाच्या 35 व्या वर्धापन दिनानिमित्त  त्यांनी टपाल तिकिटाचे प्रकाशनही केले. सरकारने मसाल्यांच्या क्षेत्रातील जागतिक नेतृत्व म्हणून भारताची निर्यात वाढवण्याचा आणि विस्तारण्याचा मार्ग मोकळा केला आहे, असे गोयल यांनी सांगितले.

सेवेची गुणवत्ता आणि कार्यक्षमतेसाठी नाव कमावण्याच्या अनुषंगाने , भारतातील सर्व प्रदेशांमध्ये गुणवत्ता चाचणी प्रयोगशाळांचे जाळे विस्तारण्याचे आणि सर्वोच्च मानकांचे पालन करण्याचे आवाहन गोयल यांनी मसाले मंडळाला केले.

मसाले हे भारतीय खाद्यपदार्थ आणि जीवनशैलीचा एक भाग आहेत, असे ते म्हणाले. वर्षानुवर्षे , भारत हा जगातील मसाल्यांचे आगर आहे. जगातील सर्वात मोठा मसाल्यांचा उत्पादक आणि ग्राहकही  आहे. केरळमधील काळी मिरी, गुजरातचे आले आणि ईशान्येकडील नागा मिरची यांसह  काश्मीरमधील केशर जगप्रसिद्ध आहे, असे गोयल यांनी सांगितले. 

मसाल्याच्या विविध  उत्पादनांसाठी भौगोलिक निर्देशांक टॅग मिळवण्याचे आवाहन गोयल यांनी मसाले उद्योग क्षेत्राला केले.

मसाले आणि मसाल्यांच्या उत्पादनांचे आघाडीचे उत्पादक, ग्राहक आणि निर्यातदार  म्हणून तसेच मसाल्यांची  प्रक्रिया आणि मूल्यवर्धनात जागतिक केंद्र म्हणून.गेल्या काही वर्षात भारताने जागतिक मसाले  क्षेत्रात सर्वोच्च स्थान कायम ठेवले आहे, असे गोयल यांनी सांगितले.

***

R.Aghor/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1801486) Visitor Counter : 190