उपराष्ट्रपती कार्यालय
उत्तम आरोग्य आणि निरामयतेसाठी पिण्याचे शुद्ध पाणी आणि स्वच्छतेचे महत्त्व उपराष्ट्रपतींकडून अधोरेखित
प्रविष्टि तिथि:
23 FEB 2022 6:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी 2022
आजारांना टाळण्याच्या आणि लोकांच्या सर्वांगीण आरोग्याच्या दृष्टीने पिण्याचे शुद्ध पाणी आणि स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधांचे महत्व उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी आज अधोरेखित केले. कोविड महामारीचा प्रकोप मंदावत असताना, लोकांनी मात्र आपल्या संरक्षणात्मक उपाययोजना कमी करू नये आणि वारंवार हात धुण्याची सवय सुरूच ठेवली पाहिजे, असा सावधगिरीचा सल्ला त्यांनी दिला.
चेन्नई येथील राजभवन येथून आभासी माध्यमातून उद्घाटन केल्यानंतर राष्ट्रीय पाणी, स्वच्छता आणि स्वास्थ्य (WASH) परिषद -2022 ला संबोधित करताना, उपराष्ट्रपती म्हणाले की, मुलांची वाढ शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या निकोप वातावरणात झाली पाहिजे. यासाठी शुद्ध पाणी, स्वच्छता आणि आरोग्य चांगले राखण्याच्या दृष्टीने स्वच्छतेच्या सवयी यांसारख्या प्रतिबंधात्मक आरोग्य उपाय योजना अंगणवाड्या आणि प्राथमिक शाळांपासून सुरू करायला हव्यात असे ते म्हणाले.
जलशक्ती मंत्रालय, पंचायती राज मंत्रालय, युनिसेफ आणि अन्य विकास भागीदारांच्या सहकार्याने , राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्था (एनआयआरडीपीआर ), हैदराबाद च्या वतीने पाणी , स्वच्छता आणि स्वास्थ्य (WASH) यावर आधारित ही तीन दिवसीय आभासी परिषद आयोजित करण्यात आली आहे. ‘पंचायतींमध्ये पाणी, स्वच्छता आणि स्वास्थ्य सुविधांचा विस्तार करणे ’ यावर या परिषदेचा भर आहे.
ग्रामीण पाणीपुरवठ्यामध्ये महत्वाची भूमिका बजावत असल्यामुळे, पाणी, स्वच्छता आणि स्वास्थ्य (WASH) कार्यक्रम ग्रामपंचायतींना पुढे नेणे महत्त्वाचे असल्याचे सांगतानाच, शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रभावी सेवा देण्यासाठी पंचायतींचे संस्थात्मक बळकटीकरण सुनिश्चित करण्याच्या गरजेवर नायडू यांनी भर दिला.
प्रत्येक ग्रामीण कुटुंबासाठी पुरेशा प्रमाणात पिण्याचे शुद्ध पाणी ही मूलभूत गरज असून भारत या बाबतीत लक्षणीय प्रगती करत आहे, असे नायडू यावेळी म्हणाले.
* * *
N.Chitale/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1800607)
आगंतुक पटल : 305