वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

येत्या 25 वर्षांच्या सज्जतेसाठी कोविड ही एक मोठी संधी -पीयूष गोयल


भारताची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर -  पीयूष गोयल

Posted On: 11 NOV 2021 9:50PM by PIB Mumbai

 

भारताला पुढील 25 वर्षांची तयारी करण्याची मोठी संधी कोविडने दिली आहे, असे पीयूष गोयल यांनी आज नवी दिल्ली येथे एका माध्यम परिषदेमध्ये बोलताना सांगितले.

वाणिज्य आणि उद्योग, वस्त्रोद्योग, ग्राहक व्यवहार आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री म्हणाले की, उत्कृष्ट फलनिष्पत्ती  दर्शविणाऱ्या निर्देशकांसह भारताची अर्थव्यवस्था पूर्णपणे रुळावर आली आहे.

केवळ 7 महिन्यांत सुमारे 235 अब्ज डॉलर्स मूल्याची उच्चांकी निर्यात झाली असल्याचे ते म्हणाले. वस्तू आणि सेवा कर संकलन 1.3 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आणि सेवांसाठीचा खरेदी व्यवस्थापक निर्देशांकाने  (पीएमआय) दशकातील सर्वोच्च पातळी गाठली.त्याचप्रमाणे उद्योगधंद्यातील मूल्यांकन उत्तम आहे, असे गोयल म्हणाले.

इतर कोणत्याही देशाप्रमाणे महामारीचा सामना करण्यासाठी, टाळेबंदीने  आपल्याला सामर्थ्य आणि क्षमता वाढवण्यासाठी  वेळ दिली. पीपीई किटपासून ते लसीपर्यंत आपल्याला भारतासाठी  आवश्यक असलेल्या उपाययोजना सापडल्या आहेत. जग भारताकडे आशेने पाहत आहे, असे त्यांनी सांगितले.

शीर्षस्थानी असलेल्या असामान्य नेतृत्वामुळे भारताने ही मोठी उसळी घेतली आहे, असे गोयल यांनी सांगितले.

आत्मनिर्भर भारताबद्दल बोलताना   गोयल म्हणाले की, सामर्थ्याच्या जोरावर  जगाशी संलग्न होण्याचे हे अभियान आहे.

हे अभियान सर्व आयात बंद करण्याबद्दल नाही.तर भविष्यासाठी क्षमता निर्माण करणारा 1.3 अब्ज लोकांच्या  फायद्याचे उद्दिष्ट असलेला हा एक सर्वसमावेशक कार्यक्रम आहे'', असे त्यांनी सांगितले.

श्री गोयल म्हणाले की, बहुपक्षीय मुक्त आणि निःष्पक्ष  व्यापारावर भारताचा  विश्वास आहे.आम्ही भारतीय उत्पादनांची क्षमता आणि गुणवत्ता बळकट करण्यावर विश्वास ठेवतो.13 क्षेत्रांमध्ये उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना सुरू करण्यात आली आहे. जिथे काही देशांतर्गत क्षमता नसते तिथे आयात होते.मात्र  आपण भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी  आणि भारतात क्षमता वाढवण्याच्या दिशेने काम करत आहोत, असे ते म्हणाले.

गोयल यांनी बोलताना  पुढे सांगितले की, जग आता भारताकडे  एक उदयोन्मुख महासत्ता म्हणून पाहत आहे आणि एक विश्वासू व्यावसायिक भागीदार म्हणून जगात भारताची ओळख निर्माण होत आहे. आपण  मुक्त व्यापार करार , संतुलित आणि न्याय्य समान करारांद्वारे जगाशी संलग्न होत आहोत., असे ते म्हणाले.  भारतासाठी अशा क्षेत्रात मोठ्या संधी निर्माण होत आहेत यामुळे विकासासोबतच रोजगाराच्या संधी निर्माण होतील'', असे त्यांनी सांगितले.

***

N.Chitale/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1771059) Visitor Counter : 220


Read this release in: English , Hindi , Urdu