कंपनी व्यवहार मंत्रालय

केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी आयसीएसआय चा त्रेपन्नावा वर्धापन दिवस केला साजरा

Posted On: 04 OCT 2021 10:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 ऑक्टोबर 2021

 

कंपनी सचिवांनी त्यांच्यावर असलेल्या सध्याच्या जबाबदाऱ्यांच्या पलीकडे जाऊन विचार करावा आणि मंत्रालय आणि नियामक प्राधिकरणे यांच्यासोबत नागरिकांच्या कर भरण्याच्या अनुपालन प्रक्रिया सुलभ करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे. त्या आज इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया (आयसीएसआय)च्या 53व्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलत होत्या.

प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत असताना सीतारामन यांनी आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या अनुषंगाने हा कार्यक्रम आयोजित करण्याबद्दल आणि या दृष्टिकोनाला जोड देणारी ‘उद्योजकता आणि नवोन्मेष यांच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताला ऊर्जा’ ही संकल्पना निवडल्याबद्दल आयसीएसआय ची प्रशंसा केली.

कोविड-19 महामारी च्या काळात अतिशय उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अर्थमंत्र्यांनी कंपनी सचिवांची प्रशंसा केली आणि सनराइज् क्षेत्रात ही भूमिका अधिक व्यापक होणार असल्याने देशातील युवकांनी या व्यवसायामध्ये आपले करियर करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.

यावेळी केंद्रीय अर्थ सचिव आणि अर्थमंत्रालयाच्या विभागाचे सचिव डॉक्टर टी व्ही सोमनाथन, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे सचिव राजेश वर्मा हे देखील आदरणीय अतिथी म्हणून उपस्थित होते. गेल्या 53 वर्षात उत्तम कॉर्पोरेट प्रशासनाला प्रोत्साहन देण्यामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सोमनाथन यांनी या संस्थेची प्रशंसा केली. कंपनी सचिवांच्या भूमिकेच्या महत्त्वाबद्दल बोलताना ते म्हणाले की तुम्ही अनुपालनाचे तज्ञ आहात आणि तुमच्या महत्त्वाच्या मार्गदर्शनामुळे कॉर्पोरेट कंपन्यांना अतिरिक्त अनुपालनाच्या ओझ्यापासून मुक्ती मिळते.

मंत्रालयाला विविध प्रकारच्या कामांसाठी आणि हितसंबंधीना इतर सेवा पुरवण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करत असल्याबद्दल कंपनी सचिवांच्या प्रयत्नांची राजेश वर्मा यांनी प्रशंसा केली. कंपनी कायदा, एलएलपी कायदा आणि बीआरआर समितीचा अहवाल तयार करण्यामध्ये आयसीएसआयने महत्वाची भूमिका बजावली आहे असे त्यांनी नमूद केले. यावेळी आयसीएसआयने ऑस्ट्रेलियामधील पाचवे परदेशी केंद्र, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते सुरू केले. यावेळी या संस्थेने एका पुस्तिकेचे देखील प्रकाशन केले

आयसीएसआयचे अध्यक्ष कंपनी सचिव नरेंद्र डी राव यांनी या संस्थेचा भाग असल्याबद्दल अभिमान व्यक्त केला. जगात आपले वर्चस्व दाखवणारी अतिशय बळकट आणि चिवट आर्थिक व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने अर्थव्यवस्थेची पुन्हा प्रगतीच्या दिशेने सुरु झालेली वाटचाल आणि पुनर्विकास प्रक्रिया पुढे नेण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार राव यांनी व्यक्त केला.

यापुढील काळात कौशल्य आधारित विकास, तंत्रज्ञानाचा वापर, व्यवसायाचे जागतिकीकरण, संशोधन आणि विकास केंद्रे आणि आयसीएसआयने निर्माण केलेल्या शासन निकषांचा प्रसार यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आयसीएसआयचे उपाध्यक्ष देवेंद्र देशपांडे यांनी यावेळी आयसीएसआयने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. केएमपीने आपल्याला दिलेल्या मान्यतेच्या पुढे जाऊया आणि समावेशक दृष्टीकोनासह व्यावसायिक बनूया आणि हितसंबंधींना तोडगे उपलब्ध करून देऊया, असे आवाहन त्यांनी केले.

आयसीएसआयचे माजी अध्यक्ष कंपनी सचिव रणजीत पांडे यांनी आपल्या भाषणात आयसीएसआयच्या 53 वर्षांच्या वाटचालीचे अनुभव सांगितले.

या सोहळ्याच्या उत्तरार्धात उद्योजकता आणि नवोन्मेष यांच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताला उर्जा या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या परिसंवादात इन्वेस्ट इंडियाचे एमडी आणि सीईओ दीपक बागला, इंटरनॅशनल कन्झ्युमर पॉलिसी एक्स्पर्ट आणि कन्झ्युमर ऑनलाईन फाऊंडेशनचे संस्थापक बेजॉन कुमार मिश्रा एन्कॅशचे संस्थापक यादवेंद्र त्यागी आयसीए एड्युस्किल्सचे संस्थापक आणि अध्यक्ष नरेंद्र कुमार श्यामसुखा यांच्यासारखे तज्ञ सहभागी झाले होते. या सर्वांनी भारतातील उद्योजकता आणि नवोन्मेष परिसंस्था याविषयी आपले विचार व्यक्त केले.

 

* * *

S.Tupe/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1760945) Visitor Counter : 252


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu