कंपनी व्यवहार मंत्रालय

भारतीय नादारी आणि दिवाळखोरी मंडळ येत्या 1 ऑक्टोबर2021 ला साजरा करीत आहे पाचवा वर्धापनदिन

Posted On: 29 SEP 2021 5:01PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 सप्‍टेंबर 2021

 

आयबीबीआय अर्थात भारतीय नादारी आणि दिवाळखोरी मंडळ येत्या 1  ऑक्टोबर 2021 ला पाचवा वर्धापनदिन साजरा करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे अध्यक्ष डॉ.विवेक देवरॉय या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी असतील आणि ते वर्धापनदिनानिमित्त “फ्रॉम नो एक्झिट टू इझी एक्झिट – अ केस स्टडी ऑफ आयबीसी” या विषयावर व्याख्यान देतील. केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे सचिव राजेश वर्मा आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉ.कृष्णमूर्ती सुब्रमण्यन हे देखील या समारंभाला माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहतील.

या वर्धापन दिनाच्या स्मरणार्थ “पंचवार्षिक नादारी आणि दिवाळखोरीविषयक संहिता (IBC),2016” हे वार्षिक, आयबीसीवरील माझा प्रभाव,2016 आणि आयबीसीचा पाच वर्षांचा महत्त्वपूर्ण प्रवास कथन करणारे ई-पुस्तक यांचे प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमात  आयबीसी,2016 वर आधारित दुसऱ्या ऑनलाईन राष्ट्रीय प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या सुवर्ण पारितोषिक विजेत्या स्पर्धकाचा सन्मान देखील केला जाणार आहे.

हा कार्यक्रम नवी दिल्लीच्या लोधी रस्त्यावरील इंडिया हॅबिटॅट केंद्रात, हॅबिटॅट विश्वातील स्टेन सभागृहात होणार आहे.इंटरनेटवरून या कार्यक्रमाचे प्रत्यक्ष प्रसारण होणार असून सर्व भागधारकांना त्यात ऑनलाईन पद्धतीने सहभागी होता येईल. आभासी पद्धतीने कार्यक्रमात भाग घेण्यासाठी https://ibbi.gov.in/annualday2021 या संकेतस्थळाचा वापर करावा.

 

आयबीबीआय विषयी थोडक्यात माहिती

नादारी आणि दिवाळखोरीविषयक संहिता,2016 (कोड) अस्तित्वात आणून भारताने दिवाळखोरीविषयक महत्त्वाच्या क्षेत्राची सुरुवात केली. मालमत्तांच्या मूल्याचे महत्तीकरण करणे, उद्योजकतेला प्रोत्साहन देणे, कर्जाची उपलब्धता वाढविणे आणि सर्व भागधारकांच्या कल्याणाचा समतोल राखणे या उद्देशाने ठराविक कालमर्यादा आखून कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यक्ती, भागीदारीतील संस्था आणि व्यक्ती यांची पुनर्रचना आणि दिवाळखोरीविषयक पृथक्करण करण्याच्या उदेशाने या संहितेची रचना करण्यात आली आहे.

पाच वर्षांच्या कार्यकाळानंतर या संहितेअंतर्गत दिवाळखोरी नियमांबाबत आता सशक्त परिसंस्था निर्माण झाली आहे. आता देशभरात 15 शहरांमध्ये हे निर्णय प्राधिकरण कार्यरत असून, भारतीय नादारी आणि दिवाळखोरी मंडळ, 3,670 नादारीविषयक व्यावसायिक(IPs),  दिवाळखोरीविषयक तीन व्यावसायिक संस्था(IPAs), नादारीसंबंधी कार्य करणाऱ्या 84 लहान व्यावसायिक संस्था (IPEs)  आणि एक माहितीविषयक सुविधा(IU)  सुरु करण्यात आली आहे. काही अत्यंत मोठ्या प्रमाणातील अनुत्पादक कर्ज असलेल्या संस्थांसह सुमारे 4,541 कॉर्पोरेट संस्था कॉर्पोरेट दिवाळखोरी ठराव प्रक्रीयेमध्ये अंतर्भूत करण्यात आल्या आहे. सुमारे 1,745 कॉर्पोरेट दिवाळखोरी ठराव प्रक्रिया एकतर समस्या सोडवून किंवा संस्था दिवाळखोरीत काढून पूर्ण झाल्या आहेत. विनंती, आढावा किंवा हिशोब पूर्ण करून 653 प्रकरणे सोडविण्यात आली असून 461 प्रकरणे मागे घेण्यात आली आहेत. आणखी 968 कंपन्यांनी स्वतःहून दिवाळखोरी जाहीर केली आहे. याबाबतच्या सुधारणा लागू करण्यामध्ये येत असलेल्या समस्यांवर सरकार सक्रियपणे उपाययोजना करीत आहे.

नादारी आणि दिवाळखोरीविषयक संहितेने 28 मे 2021 ला पाच वर्षे पूर्ण केली. पाच वर्षांच्या या प्राथमिक अवस्थेतील कार्यकाळात भागधारकांनी, भागधारकांसाठी केलेली भागधारकांच्या बाबतीतील सुधारणा असे याचे स्वरूप झाले आहे.या संहितेच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार असलेल्या परिसंस्थेचा महत्त्वाचा कणा म्हणून 1 ऑक्टोबर 2016 ला स्थापन झालेल्या आयबीबीआयकडे पहिले जाते.हे मंडळ सर्व IPs, IPEs, IPAs आणि IUs यांचे नियामक म्हणून काम करते. या संहितेअंतर्गत येणाऱ्या कॉर्पोरेट दिवाळखोरी ठराव, कॉर्पोरेट विलय, व्यतिगत दिवाळखोरी ठराव आणि व्यक्तिगत नादारी इत्यादी विविध प्रक्रियांसाठी नियम निश्चित करण्याची क्षमता या मंडळाला देण्यात आली आहे. कंपनी कायदा,2013 अंतर्गत मूल्यनिश्चिती करणाऱ्या व्यावसायिकांचे नियमन करण्याचे अधिकार देखील या संस्थेकडे आहेत. सध्या 4,172 नोंदणीकृत मूल्यनिश्चिती करणाऱ्या व्यक्ती आणि 16 नोंदणीकृत मूल्यनिश्चिती करणाऱ्या संस्था कार्यरत आहेत.  

 

* * *

Jaydevi PS/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1759301) Visitor Counter : 251