पंतप्रधान कार्यालय

15 ऑगस्ट, 2021रोजी, भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण

Posted On: 15 AUG 2021 2:34PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 ऑगस्‍ट 2021

 

माझ्या प्रिय देशबांधवांनो

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या आपल्या सर्वांना आणि जगभरातील भारतावर प्रेम करणाऱ्या, लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा !

आज स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या या पवित्र प्रसंगी देश आपल्या सगळ्या स्वातंत्र्यसैनिकांना, राष्ट्राच्या सुरक्षेत अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या, स्वतःची आहुति देणाऱ्या, वीर आणि वीरांगनांना आज देश वंदन करतो आहे. स्वातंत्र्याला जनचळवळीत रूपांतरित करणारे पूज्य बापू असोत किंवा मग स्वातंत्र्यासाठी आपल्या सर्वस्वाचा होम करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस सोत, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, बिस्मिल, अशफाक उल्लाह खान  सारखे महान क्रांतिकारक असोत, झाशीची राणी लक्ष्मीबाई असो, चित्तूरची राणी चेन्नमा असो, किंवा मग, राणी गाइदिल्यु असो, किंवा मग आसाममधील मातंगिनी हाजराचा पराक्रम असो, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू असोत, देशाला अखंड राष्ट्रात एकत्रित करणारे सरदार पटेल असोत किंवा मग भारताला भविष्याचा मार्ग दाखवणारे, बाबासाहेब आंबेडकर असोत, अशा व्यक्तीचे, देश आज अशा प्रत्येक व्यक्तिमत्वाचे स्मरण करत आहे. देश या सर्वांचा ऋणी आहे.

भारत, बहुरत्ना वसुंधरा आहे. भारतात प्रत्येक कालखंडात, प्रत्येक कानाकोपऱ्यात, असंख्य लोकांनी, ज्यांची नावेही कदाचित इतिहासाच्या पानांवर लिहिलेली नसतील, अशा असंख्य लोकांनी या राष्ट्राला घडवले आहे, पुढे नेले आहे, मी अशा प्रत्येक व्यक्तिमत्वाला आज वंदन करतो. त्यांचे अभिनंदन करतो. भारताने शेकडो वर्षे, मातृभूमि, संस्कृती आणि स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. पारतंत्र्याच्या वेदना, स्वातंत्र्याची चेतना या देशाने शतकानुशतके सोडली नाही. यश-अपयश येत राहिले, मात्र, मनमंदिरात स्थापन झालेली स्वातंत्र्याची आकांक्षा, कधीही संपू दिली नाही. या सर्व काळातल्या संघर्षाचे नेतृत्व करणारे, सर्व संघर्षांचे नेतृत्व करणाऱ्यांना वंदन करण्याचे औचित्य आहे. आणि हे सगळे आपल्या वंदनास पात्र आहेत.

कोरोनाची जागतिक महामारी.. या कोरोनाच्या जागतिक महामारीत आपले डॉक्टर्स, आपल्या परिचारिका, आपले निमवैद्यकीय कर्मचारी, सफाई कामगार, लस तयार करण्यासाठी अखंड मेहनत घेणारे आपले वैज्ञानिक, सेवाकार्यात गुंतलेले आपले कोट्यवधी नागरिक, ज्यांनी या कोरोना काळातला क्षण न क्षण लोकसेवेसाठी समर्पित केला आहे, ते सगळे वंदनास पात्र आहेत.

आजही देशातल्या काही भागात, पूर आहे, भूस्खलन आहे, काही वेदनादायी वृत्त देखील येत आहेत, अनेक क्षेत्रांमध्ये लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे, अशावेळी केंद्र सरकार असो, राज्य सरकारे असोत, सर्वजण त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहेत. आजच्या या कार्यक्रमात, ऑलिंपिकमध्ये , भारताची युवा पिढी, ज्यांनी भारताचे नाव उंचावले आहे, असे आपले खेळाडू, आज आपल्यामध्ये आहेत. काही इथे आहेत, काही समोर बसले आहेत.

मी आज देशबांधवांना, इथे जे उपस्थित आहेत, त्यांनाही तसेच, भारताच्या कानाकोपऱ्यातून जे या समारंभात सहभागी झाले आहेत, अशा सर्वांना मी आवाहन करतो, की आपण आपल्या सर्व खेळाडूंच्या सन्मानार्थ, टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन करुया.

भारताच्या खेळांचा सन्मान, भारताच्या युवा पिढीचा सन्मान, भारताचा सन्मान मिळवून देणाऱ्या तरुणांचा सन्मान, देश, कोट्यवधी देशबांधव आज टाळ्यांच्या कडकडाटात आपल्या या तरुणाईचे, देशाच्या युवा पिढीचे  गौरव करत आहेत, सन्मान करत आहेत. खेळाडूंनी विशेषतः, आपण अभिमान बाळगू शकतो, त्यांनी केवळ आपले मनच जिंकले नाही, तर त्यांनी आपल्या येणाऱ्या पिढ्यांना, भारताच्या युवा पिढीला, प्रेरणा देण्याचे खूप मोठे काम केले आहे.

माझ्या प्रिय देशबांधवांनो,

आपण स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करतो, मात्र फाळणीच्या वेदना आजही आपल्या छातीवर घाव लागतात.ही फाळणी गेल्या शतकातील मानवी आयुष्यातील सर्वात मोठ्या संकटांपैकी एक होते. स्वातंत्र्यानंतर या सर्व पीडितांचे फारच लवकर विस्मरण झाले. मात्र, कालच देशाने एक भावनिक निर्णय घेतला आहे. यापुढे, दरवर्षी14 ऑगस्ट हा दिवस ‘फाळणी वेदना स्मृति दिन’ म्हणून पाळला जाणार आहे. ज्या लोकांना, फाळणीच्या काळात,अमानुष परिस्थितीतून गेले, ज्यांनी अत्याचार सहन केले, ज्यांच्या पार्थिवांना सन्मानाने अंत्यसंस्कार देखील मिळाले नाहीत, अशा सर्व लोकांना आपल्या स्मृतींमध्ये जिवंत ठेवणेही तेवढेच आवश्यक आहे.

स्वातंत्र्याच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला, ‘फाळणी वेदना स्मृति दिन’ पाळला जाण्याचा निर्णय होणे म्हणजे, त्या सर्व लोकांना प्रत्येक भारतीयाच्या वतीने आदरपूर्वक श्रद्धांजली आहे.

माझ्या प्रिय देशबांधवांनो,

प्रगतीपथावर वाटचाल करणाऱ्या आमच्या देशासमोर, संपूर्ण मानवजातीसमोर कोरोनाचा हा कालखंड एक सर्वात मोठे आव्हान म्हणून आला आहे. भारतवासियांनी, खूप संयम आणि धैर्याने या लढा लढला आहे. या लढ्यात आपल्यासमोर, अनेक आव्हानेही होती, मात्र, प्रत्येक क्षेत्रात आम्ही देशबांधवांनी असामान्य गतीने काम केले आहे. आमचे वैज्ञानिक आणि आमच्या उद्योजकांच्या ताकदीचाच हा परिणाम आहे, की भारताला लसीसाठी आज कोणावर, इतर कोणत्या देशावर आपल्याला अवलंबून राहावे लागले नाही. आपण कल्पना करु शकतो, क्षणभर विचार करा, जर आपल्याकडे, भारताकडे आपली लस नसती, तर आपण काय केले असते? पोलिओची लस मिळवण्यासाठी किती वर्षे लागलीत

या एवढ्या मोठ्या संकटात, जेव्हा संपूर्ण जगात महामारी आहे त्यावेळी, आपल्याला लस कशी मिळाली असती? भारताला कदाचित केव्हा मिळाली असती, मिळाली असती की नाही? मात्र आज आपण गौरवाने सांगू शकतो की जगातील सर्वात मोठे लसीकरण आपल्या देशात सुरु आहे. 54 कोटींहून अधिक  लोकांना लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. कोविन सारख्या ऑनलाइन व्यवस्था, डिजिटल प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था, आज संपूर्ण जगाला आकर्षित करत आहे. महामारीच्या काळात, भारताने, ज्याप्रकारे, 80 कोटी देशबांधवांना कित्येक महीने सातत्याने अन्नधान्य देऊन, ज्याप्रकारे त्यांच्या घरातली चूल पेटती ठेवली, ही बाबदेखील संपूर्ण जगासाठी आश्चर्य आणि चर्चेचा विषय आहे. हे अगदी खरे आहे की इतर देशांच्या तुलनेत, भारतात कमी लोकांना संसर्ग झाला, हे ही खरे आहे, की जगातील देशांच्या लोकसंख्येच्या तुलनेत, भारतात आपण अधिक प्रमाणात आपल्या नागरिकांचे जीव वाचवू शकलो. मात्र, आपल्यासाठी हा पाठ थोपटून घेण्याचा विषय नाही. समाधानाने निवांत होण्याचा विषय नाही. असे म्हणणे, की काही आव्हाने नव्हतीच, ही आपल्या पुढच्या विकासाचे मार्ग बंद करणारा विचार ठरेल.

जगातील समृद्ध देशांच्या तुलनेत आपल्याकडच्या व्यवस्था परिपूर्ण नाहीत,जगाकडे समृद्ध देशांकडे जे आहे, ते सगळे आपल्याकडे नाही आणि दुसरीकडे, आपली लोकसंख्याही खूप जास्त आहे. जगाच्या तुलनेत खूप मोठी लोकसंख्या आहे. आणि आपली जीवनशैली देखील जरा वेगळी आहे. या सगळ्या प्रयत्नांच्या नंतरही अनेक लोकांचे जीव आपण वाचवू शकलो नाही. कित्येक मुलांच्या डोक्यावरुन हात फिरवणारे लोक या जगातून नाहीसे झाले. त्यांचा लाड करणारे, त्यांचे हट्ट पुरवणारे त्यांचे पालक निघून गेले, हे असह्य दुःख आणि वेदना कायमच आपल्यासोबत राहणार आहे.

माझ्या प्रिय देशबांधवानो,

प्रत्येक देशाच्या विकासयात्रेत, एक काळ असा येतो, ज्यावेळी देश स्वतःची नव्याने व्याख्या करतो. स्वतःला, नवीन संकल्पासह पुढे नेतो. भारताच्या विकासयात्रेतही, आज ती वेळ आली आहे. 75 वर्षांच्या या काळाला आपल्याला केवळ एका समारंभापुरते मर्यादित ठेवायचे नाही. आपल्याला नव्या संकल्पांना आपल्या देश उभारणीचा आधार बनवायचे आहे. नवे संकल्प घेऊन वाटचाल करायची आहे. इथून सुरु होत, पुढच्या 25 वर्षात ज्यावेळी आपण आपल्या स्वातंत्र्याचा शतक महोत्सव साजरा करु, ती 25 वर्षे नव्या भारतासाठीचा सृजनकाळ असेल. या अमृतकाळात, आपले साकार झालेले संकल्पच, आपल्याला स्वातंत्र्याच्या 100 वर्षांपर्यंत घेऊन जातील. अभिमानास्पदरित्या घेऊन जातील. भारत आणि भारताच्या नागरिकांसाठी समृद्धीची शिखरे सर करणे हे या अमृतकाळाचे उद्दिष्ट आहे. एका अशा भारताची निर्मिती, जिथे सुविधांचा दर्जा, गांवे आणि शहरे यांच्यात दरी निर्माण करणारा नसेल, हे अमृतकाळाचे उद्दिष्ट आहे. जिथे नागरिकांच्या आयुष्यात सरकार विनाकारण हस्तक्षेप करणार नाही, अशा देशाची उभारणी, हे अमृतकाळाचे उद्दिष्ट आहे. एका अशा भारताची उभारणी, जिथे जगातील सर्वात आधुनिक पायाभूत सुविधा असतील.

आपण कोणापेक्षाही कमी नसू, हे अमृतकाळाचे उद्दिष्ट आहे, हाच कोट्यवधी देशबांधवांचा संकल्प आहे. मात्र, संकल्प तोवर अपूर्ण राहतो, जोपर्यंत संकल्पाला परिश्रम आणि पराक्रमाची जोड दिली जात नाही. म्हणून आपल्याला सगळ्या संकल्पांना परिश्रम आणि पराक्रमाची जोड देत, ते पूर्ण करूनच आपल्याला थांबायचे आहे. आणि ही स्वप्ने, आपले हे संकल्प आपल्या सीमांच्या पलीकडे  सुरक्षित आणि समृद्ध जगासाठीही प्रभावी योगदान देण्यासाठी आहेत.

मात्र आपल्याला आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी इतकी प्रदीर्घ प्रतीक्षा करायची नाही.आपल्याला आतापासूनच कामाला लागायचे आहे.आपल्याला एक क्षणही वाया घालवायचा नाही.हीच वेळ आहे आणि योग्य वेळ आहे.आपल्या देशातही परिवर्तन घडवायचे आहे आणि आपल्याला एक नागरिक या नात्याने स्वतःमध्ये बदल घडवायलाच लागतील. बदलत्या युगानुरूप आपल्याला बदल घडवायलाच लागतील. सबका साथ सबका विकास सबका विश्वास हा मंत्र घेऊन आपण सर्व वाटचाल करत आहोत मात्र आज लाल किल्याच्या बुरुजावरून मीआवाहन करत आहे,सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि आता सबका प्रयास आपल्या प्रत्येक लक्ष्य प्राप्तीसाठी अतिशय महत्वपूर्ण आहे.गेल्या सात वर्षात सुरवातीलाच अनेक योजनांचा लाभ कोट्यवधी गरिबांच्या घरापर्यंत पोहोचला आहे.उज्वला योजनेपासून ते आयुष्मान भारताची ही ताकद आज देशाचा प्रत्येक गरीब जाणतो.आज सरकारी योजनांचा वेग वाढला आहे. या योजना निर्धारित लक्ष्य साध्य करत आहेत.आधीच्या तुलनेत आपण अतिशय वेगाने पुढे गेलो आहोत.मात्र इथे गोष्ट पूर्ण होत नाही.आता आपल्याला परिपूर्णते पर्यंत जायचे आहे पुर्णत्वापर्यंत जायचे आहे. शंभर टक्के गावांपर्यंत पोहोचायचे आहे, रस्ते असोत,बँक खाती उघडणे असो, शंभर टक्के लाभार्थींपर्यंत आयुष्मान भारत कार्ड असो, शंभर टक्के पात्र व्यक्तींपर्यंत उजवला योजना आणि गॅस जोडणी असो, सरकारची विमा योजना असो, पेन्शन योजना असो, आवास योजनेद्वारे आपल्याला अशा प्रत्येक व्यक्तींपर्यंत पोहोचायचे आहे जे त्याचे हक्कदार आहेत.

शंभर टक्के हेच उद्दिष्ट घेऊन वाटचाल करायची आहे. आजपर्यंत आपल्याकडे अशा मित्रांचा कधी विचार करण्यात आला नाही जे ठेला लावतात,पदपथावर बसून सामानाची विक्री करतात, आम्ही या मित्रांना स्वनिधी योजनेच्या मार्फत बँकिंग व्यवस्थेशी जोडत आहोत. ज्याप्रमाणे आम्ही वीज प्रत्येक घरापर्यंत म्हणजे शंभर टक्के पोहोचवली , ज्याप्रमाणे आम्ही शंभर टक्के घरांमध्ये शौचालय निर्मितीसाठी प्रामाणिक प्रयत्न केला, त्याप्रमाणेच आपल्याला आता योजनांच्या परिपूर्णतेचे उद्दिष्ट घेऊन मार्गक्रमणा करायची आहे आणि यासाठी आपल्याला कालमर्यादा फार दूरवरची ठेवायची नाही. आपल्याला काही वर्षातच आपले संकल्प साकार करायचे आहेत. देश आज हर घर जल मिशन घेऊन वेगाने काम करत आहे. मला आनंद आहे की जल जीवन मिशनच्या केवळ दोन वर्षात साडेचार कोटीहून अधिक कुटुंबांना नळाद्वारे पाणी पुरवठा होऊ लागला आहे. नळाद्वारे पाणी मिळायला सुरवात झाली आहे.कोट्यवधी माता- भगिनींचा आशीर्वाद हाच आमचा ठेवा आहे.या शंभर टक्केचा सर्वात मोठा लाभ हा असतो की सरकारी योजनेच्या लाभापासून कोणी वंचित राहत नाही. जेव्हा सरकार हे लक्ष्य घेऊन वाटचाल करते की आम्हाला समाजाच्या टोकाला असलेल्या वंचिता पर्यंत पोहोचायचे आहे तेव्हा कोणताही भेदभाव होत नाही आणि भ्रष्टाचाराला थाराही उरत नाही.

माझ्या प्रिय देशबांधवांनो,

देशाच्या प्रत्येक गरीब प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोषण पोचवण्याला ही सरकारचे प्राधान्य आहे. गरीब महिला, गरीब मुलांमध्ये कुपोषण आणि आवश्यक पोषण प्रदान करणाऱ्या घटकांचा अभाव त्यांच्या विकासात मोठा अडथळा ठरतो. हे लक्षात घेऊन हे निश्चित करण्यात आले की सरकार, आपल्या वेगवेगळ्या योजनांच्या अंतर्गत जो तांदूळ गरिबांना देते, तो पोषण मूल्ययुक्त करेल, गरिबांना पोषणयुक्त तांदूळ देईल.सरकारी रास्त भाव धान्य दुकानांवर, माध्यान्ह भोजन योजने अंतर्गत मुलांना मिळणारा तांदूळ असो,2024 पर्यंत प्रत्येक योजनेद्वारे मिळणारा तांदूळ पोषण मूल्य युक्त असेल.

माझ्या प्रिय देश बांधवांनो,

आज देशात प्रत्येक गरिबापर्यंत उत्तम आरोग्य सुविधा पोचवण्याचे प्रयत्नही वेगाने सुरू आहेत. यासाठी वैद्यकीय शिक्षणात आवश्यक आणि मोठ-मोठ्या सुधारणाही करण्यात आल्या आहेत. प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधांकडेही लक्ष पुरवण्यात आले आहे.त्याचबरोबर देशात वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागांमध्येही मोठी वाढ करण्यात आली आहे. आयुष्मान भारत योजनेच्या अंतर्गत देशातल्या गावा-गावापर्यंत दर्जेदार आरोग्य सुविधा पोहोचवण्यात येत आहेत. जन औषधी योजनेच्या माध्यमातून गरिबांना, मध्यम वर्गाला स्वस्त औषधे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आतापर्यंत 75 हजारपेक्षा जास्त हेल्थ आणि वेलनेस केंद्र उभारण्यात आली आहेत. गट स्तरावर उत्तम रुग्णालये आणि आधुनिक प्रयोगशाळा जाळे निर्माण करण्यावर विशेषकरून काम करण्यात येत आहे.लवकरच देशातल्या हजारो रुग्णालयात आपली ऑक्सिजन संयंत्रेही असतील.

माझ्या प्रिय देशबांधवांनो,

21 व्या शतकात भारताला विकासाच्या नव्या शिखरावर घेऊन जाण्यासाठी, भारताच्या सामर्थ्याचा योग्य उपयोग, पुरेपुर उपयोग, ही काळाची गरज आहे, अतिशय आवश्यक आहे.यासाठी जो वर्ग मागास राहिला आहे, जे क्षेत्र मागास आहे त्याची काळजी घ्यायला लागेल.मूलभूत गरजांची काळजी घेण्याबरोबरच, दलित, मागास,आदिवासी, सामान्य वर्गातल्या गरिबांसाठी आरक्षण सुनिश्चित करण्यात येत आहे. नुकतेच वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात अखिल भारतीय कोट्यात इतर मागास वर्गासाठी आरक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. संसदेत कायदा करून इतर मागास वर्ग संबंधित सूची तयार करण्याचा अधिकार राज्यांना देण्यात आला आहे.

माझ्या प्रिय देशबांधवांनो,

आम्ही ज्याप्रमाणे हे सुनिश्चित करत आहोत की समाजाच्या विकासाच्या प्रवासात कोणतीही व्यक्ती मागे राहू नये, कोणताही वर्ग मागे राहू नये त्याच प्रमाणे,देशाचा कोणताही प्रदेश , कोणताही कोपराही मागे राहत कामा नये. विकास सर्वांगीण असला पाहिजे. विकास सर्व स्पर्शी असला पाहिजे. विकास सर्व समावेशक असला पाहिजे. देशाच्या आशा भागांना पुढे आणण्यासाठी गेल्या सात वर्षात,जे प्रयत्न करण्यात आले आहेत,त्यांना अधिक वेग देण्याच्या दिशेने आम्ही वाटचाल करत आहोत. आपला पूर्वेकडचा भारत,ईशान्य भारत, जम्मू-काश्मीर, लडाखसह संपूर्ण हिमालयीन क्षेत्र असो,आपला किनारी पट्टा असो किंवा आदिवासी भाग असो,हे भविष्यात भारताच्या विकासाच्या वाटचालीतील मोठा आधार ठरणार आहेत.आज ईशान्येत कनेक्टिव्हिटीचा इतिहास लिहिला जात आहे. ही कनेक्टिव्हिटी मना-मनाची, हृदयाचीही आहे आणि पायाभूत सुविधांचीही आहे. लवकरच ईशान्येकडील सर्व राज्यांच्या राजधान्या रेल्वे सेवेद्वारे जोडण्याचे काम पूर्ण होणार आहे. ॲक्ट ईस्ट धोरणाअंतर्गत आज ईशान्य , बांग्लादेश, म्यानमार, आणि दक्षिण पूर्व आशियाशी जोडला जात आहे.मागच्या काही वर्षात जे प्रयत्न करण्यात आले आहेत,त्यामुळे ईशान्येमध्ये कायमस्वरूपी शांततेसाठी, श्रेष्ठ भारत निर्माणासाठी उत्साह द्विगुणित झाला आहे. ईशान्येमध्ये पर्यटन , साहसी क्रीडा प्रकार, सेंद्रिय शेती, वनौषधी,तेल पाम यांची क्षमता मोठ्या प्रमाणात आहे.

आज ईशान्येकडील राज्यांमध्ये पर्यटन, साहसी खेळ, सेंद्रिय शेती, वनौषधी, पाम तेल यांच्या उत्पादनाची खूप मोठी क्षमता आहे. या क्षमतेचा संपूर्णपणे वापर करून घेणे आवश्यक आहे, या क्षमतेला देशाचा एक भाग बनवावे लागेल. आपल्याला हे कार्य अमृतमहोत्सवी काळाच्या काही दशकांतच पूर्ण केले पाहीजे. सर्वांच्या शक्तीस्थानांना योग्य संधी देणे हीच लोकशाहीची मूळ संकल्पना आहे. जम्मू असो वा काश्मीर, विकासाचा समतोल आता या भूमीवर सगळीकडेच निर्माण झालेला दिसत आहे. जम्मू काश्मीरमध्येच मर्यादामुक्ती महामंडळाची स्थापना झाली आहे आणि भविष्यात विधानसभा निवडणुकींसाठी देखील तयारी सुरु आहे. लडाख देखील विकासाच्या अमर्याद शक्यतांसह प्रगती करत आहे.एकीकडे लडाखमध्ये आधुनिक पायाभूत सुविधांची निर्मिती होत असताना दिसत आहे तर दुसरीकडे लडाखमध्ये स्थापन झालेली सिंधू मध्यवर्ती विद्यापीठ त्या भागातील उच्च शिक्षणाचे केंद्र म्हणून स्थापित होताना दिसत आहे. एकविसाव्या शतकातील या दशकात, भारत नील-अर्थव्यवस्थेच्या आपल्या प्रयत्नांना आणखी गती देईल. आपल्याला मत्स्यपालनासह सागरी शैवालांच्या शेतीमध्ये देखील नव्या शक्यता निर्माण होत आहेत त्यांचा देखील संपूर्ण लाभ करून घेणे आवश्यक आहे. ‘खोल सागरी अभियान’  समुद्रात खोलवर लपलेल्या अमर्याद  संधींचा शोध घेण्याच्या आपल्या महत्त्वाकांक्षांचा पुरावा आहे. जी खनिज संपत्ती समुद्रात खोलवर लपलेली आहे, जी औष्णिक उर्जा समुद्राच्या पाण्यात आहे ती देशाच्या विकासाला नव्या उंचीवर पोहोचवू शकते. देशाच्या ज्या जिल्ह्यांना, ते मुख्य प्रवाहापासून मागे पडले आहेत असे समजले जात होते, आम्ही त्यांच्या आकांक्षांना देखील जागृत केले आहे. देशात एकशे दहाहून अधिक आकांक्षित जिल्ह्यांमध्ये शिक्षण, आरोग्य, पोषण, रस्ते निर्मिती, रोजगार यांच्याशी संबंधित योजनांना प्राधान्य दिले जात आहे. यापैकी अनेक जिल्हे आपल्या देशाच्या आदिवासी भागात आहेत. आपण या जिल्ह्यांच्या दरम्यान विकासाशी संबंधित एका निरोगी स्पर्धेचे उत्साही वातावरण निर्माण केले आहे. हे आकांक्षित जिल्हे भारतातील इतर जिल्ह्यांच्या पातळीपर्यंत पोहोचतील या दिशेने ही स्पर्धा वेगाने सुरु आहे. 
माझ्या प्रिय देशवासियांनो,

अर्थ जगतात भांडवलशाही आणि समाजवाद यांची बरीच चर्चा होत असते, पण भारत सहकारवादाला देखील खूप महत्त्वाचे मानतो. सहकारवाद आपली परंपरा आणि आपल्या संस्कारांसाठी देखील खूप अनुकूल आहे. सामान्य जनतेच्या सामुहिक बळाच्या रुपात सहकारवाद अर्थव्यवस्थेच्या प्रेरक शक्तीच्या रुपात चालना देणारी शक्ती व्हावी यासाठी मुलभूत पातळीवरील अर्थव्यवस्थेसाठी एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. सहकार केवळ कायदे आणि नियमांनी भरलेली प्रणाली नाही तर एक उर्जा आहे, सहकार एक संस्कार आहे, एकत्र येऊन प्रगती करण्याची प्रवृत्ती आहे. या क्षेत्राचे सशक्तीकरण घडवून आणण्यासाठी एक विशेष मंत्रालयाची स्थापना करण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे आणि राज्यांमध्ये जे सहकारी क्षेत्र कार्यरत आहे त्याला जितके अधिक प्रमाणात सामर्थ्य प्रदान करता येईल तितके करण्यासाठी आम्ही हा नवा प्रयत्न हाती घेतला आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो,

या दशकात, आपल्याला गावांमध्ये नवी अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी संपूर्ण शक्तीनिशी प्रयत्न करावे लागतील. आपल्या गावांना आज आपण वेगाने बदलताना पाहत आहोत. गेल्या काही वर्षांत  आपण आपल्या गावांपर्यंत रस्ते, वीज, इत्यादी सोयी पोहोचविण्याचा प्रयत्न केला, तो संपूर्ण कालखंड आपण त्या कामांसाठी वापरला. मात्र आता आपण आपल्या गावांपर्यंत ऑप्टीकल फायबर नेटवर्क आणि डेटाची सुविधा पोहोचवीत आहोत. इंटरनेट सेवा ही पोहोचत आहे. गावातही  डिजिटल उद्योजक तयार होत आहेत. गावांमध्ये स्वयंसहाय्यता गटांशी जोडलेल्या आपल्या 8 कोटींहून अधिक भगिनी आहेत, त्या एकापेक्षा एक सरस उत्पादने तयार करतात. त्यांच्या या उत्पादनांना देशात तसेच परदेशात मोठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी सरकार ई-व्यापार मंच देखील तयार करत आहे. देश ‘व्होकल फॉर लोकल’ या मंत्रासह पुढे जात आहे, तेव्हा हा डिजिटल मंच महिला स्वयंसहाय्यता गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना देशाच्या कानाकोपऱ्यातील ठिकाणी आणि परदेशात देखील पोहोचविण्यासाठी उपयुक्त ठरेल. कोरोना काळात देशाने तंत्रज्ञानाची ताकद आणि आपल्या संशोधकांची शक्ती तसेच कटिबद्धता पाहिली आहे. देशाच्या प्रत्येक क्षेत्रात आपले वैज्ञानिक अत्यंत अक्कलहुशारीने काम करत आहेत. आता आपण आपल्या कृषी क्षेत्रात देखील या संशोधकांच्या शोधांचा वापर करण्याची वेळ आली आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाला आपण कृषी क्षेत्राशी जोडून घेतले पाहिजे. आता आपण अधिक काळ वाट बघू शकत नाही आणि आपल्याला याचा संपूर्ण फायदा करून घेतला पाहिजे. देशाला अन्न सुरक्षा प्रदान करण्याबरोबरच फळ, भाज्या आणि अन्नधान्याचे उत्पादन वाढविण्यात देखील याची खूप मोठी मदत होईल. आणि आपण संपूर्ण जगात स्वतःला सशक्तपणे सिध्द करून दाखवू शकतो. 

या सर्वात एका मोठ्या आव्हानाकडे आपण लक्ष द्यायला हवे. हे आव्हान म्हणजे गावातील लोकांकडे असलेल्या जमिनीचे आकुंचन. वाढत्या लोकसंख्येमुळे, कुटुंबे विभक्त होत असल्या कारणाने, शेतकऱ्यांकडे असलेली जमीन कमी कमी होत चालली आहे. देशातील 80% हून अधिक शेतकरी असे आहेत ज्यांच्याकडे 2 हेक्टरपेक्षाही कमी जमीन आहे. 2 हेक्टरपेक्षाही कमी ? आपण बघतोय की शंभरापैकी ऐंशी शेतकरी असे आहेत ज्यांच्याकडे 2 हेक्टरपेक्षाही कमी जमीन आहे. याचा अर्थ देशातील बहुसंख्य शेतकरी हा एका अर्थी लहान शेतकरी आहे. यापूर्वी देशात जी धोरणे आखण्यात आली त्यांच्यामध्ये या छोट्या शेतकऱ्यांसाठी जितके प्राधान्य द्यायला हवे होते, त्यांच्यावर जितके लक्ष केंद्रित करायला हवे होते, ते राहून गेले. आता देशातील याच लहान शेतकऱ्यांचा विचार करून कृषीविषयक सुधारणा केल्या जात आहेत, निर्णय घेतले जात आहेत. पीक विमा योजनेतील सुधारणा असो, किमान आधारभूत किंमत दीडपट करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय असो, लहान शेतकऱ्यांना शेतकरी क्रेडीट कार्डच्या माध्यमातून बँकेकडून स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून देणे असो, सौर ऊर्जेशी संबंधित योजना शेतांपर्यंत पोहोचविण्याची बाब असो, कृषी उत्पादक संघटना असो, हे सर्व उपक्रम लहान शेतकऱ्यांना अधिक सशक्त करतील. येणाऱ्या काळात, ब्लॉक पातळीवर साठवण गोदामांची सुविधा निर्माण करण्याचा देखील उपक्रम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक लहान शेतकऱ्याला कराव्या लागणाऱ्या छोट्या छोट्या खर्चाचा विचार करून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना राबविण्यात येत आहे. 10 कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यांमध्ये आतापर्यंत दीड लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट  जमा करण्यात आली आहे. लहान शेतकरी देशाची शान बनो, हा आता आपल्यासाठी गुरुमंत्र झाला आहे. लहान शेतकरी देशाची शान व्हावा हे आमचे स्वप्न आहे. आगामी काही वर्षांमध्ये आपल्या देशातील लहान शेतकऱ्यांच्या सामुहिक शक्तीमध्ये आणखी वाढ करावी लागेल. त्यांना नव्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतील. आज देशातील 70 हून अधिक रेल्वे मार्गांवर शेतकरी विशेष गाड्या चालविली जात आहेत. या सेवेद्वारे लहान शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन किफायतशीर वाहतूक खर्चासह देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यासाठी ही आधुनिक सोय उपलब्ध झाली आहे. कमलम असो किंवा शाही लीची, भूतझालोकिया मिरची असो किंवा काळा तांदूळ असो किंवा हळद, असा विविध शेतमाल आता जगाच्या विविध भागांमध्ये पोहोचविला जात आहे.  आज देशाच्या मातीत तयार झालेल्या उत्पादनांचा दरवळ जगाच्या अनेक भागांमध्ये पोहोचत आहे याचा देशाला अत्यंत आनंद होत आहे. भारतातील शेतात पिकवण्यात आलेल्या भाज्या आणि इतर खाद्यान्नानी जगातील लोकांची रसनातृप्ती होत आहे. 

माझ्या प्रिय देशवासियांनो, 

आपल्या गावांची क्षमता कशा प्रकारे वाढविली जात आहे याचे एक उदाहरण म्हणजे ‘स्वामित्व योजना.’ गावांमध्ये जमिनीच्या किंमतीची काय स्थिती आहे ते आपल्याला सर्वांनाच हे माहित आहे. स्वतः जमिनीचे मालक असून देखील गावातील लोकांना त्या जमिनीवर बँकांकडून कुठलेही कर्ज मिळू शकत नाही कारण चालत आलेल्या या जमिनींच्या कागदपत्रांबाबत पिढ्यानपिढ्या काहीच हालचाली करण्यात आल्या नाहीत. लोकांकडे या संदर्भात कोणतीच यंत्रणा उपलब्ध नाही. या स्थितीत बदल घडवून आणण्याचे काम आज स्वामित्व योजना करत आहे. आज प्रत्येक गावातील हरेक घराच्या मालकीच्या जमिनीचे ड्रोनच्या सहाय्याने संदर्भ-निश्चिती करण्यात येत आहे. गावातील जमिनींची माहिती आणि या संपत्तीच्या हक्कांची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करण्यात येत आहेत. यामुळे, गावातील जमिनीच्या बाबतीतले तंटे संपले आहेत, इतकेच नव्हे तर गावातील लोकांना बँकेकडून सुलभपणे कर्ज मिळण्याची सोय झाली आहे. गावातील गरिबांच्या जमिनी, तंट्याचे नाही तर विकासाचे कारण व्हावे यासाठी आज आपण त्या दिशेने कार्य करीत आहोत.

माझ्या प्रिय देशवासियांनो, 

स्वामी विवेकानंदजी जेव्हा भारताच्या भविष्याबद्दल बोलत असत, भारतमातेच्या भव्यतेचे जेव्हा ते दर्शन करत असत तेव्हा ते म्हणायचे की जितके शक्य होईल तितके देशाच्या भूतकाळाकडे पहा. आपल्या देशाच्या भूतकाळात जो अखंड, नवीनतम झरा वाहतो आहे, त्याचे पाणी आकंठपणे प्रश्न करा आणि यानंतर, विवेकानंदजींची श्रद्धा पहा कशी आहे, ते म्हणाले की नंतर समोर पहा.

पुढे बघा, अग्रेसर व्हा! भारताला पहिल्या पेक्षाही अधिक उज्वल, महान आणि श्रेष्ठ बनवा. देशाच्या असीम सामर्थ्यावर विश्वास ठेवत आता पुढे जावं हे स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात आपलं दायित्व आहे. आपण मिळून काम करायला हवं, पुढल्या पिढीच्या पायाभूत सुविधांसाठी. आपल्याला मिळून काम करायला हवं, जागतिक दर्जाच्या उत्पादन निर्मितीकरिता आपल्याला मिळून काम करायला हवं (नव्या युगाच्या नवोन्मेषी शोधांसाठी) कटींग एज इनोव्हेशनसाठी, आपल्याला मिळून काम करायला हवं, नव्या युगाच्या तंत्रज्ञानाकरता. 

माझ्या प्रिय देशवासीयांनो, 

आधुनिक युगात, प्रगतीचा पाया आधुनिक पायाभूत सुविधांवर उभारला जातो. मध्यम वर्गाच्या अपेक्षा आणि आकांक्षाही या पूर्ण करतात. कमकूवत पायाभूत सुविधांमुळे विकासाच्या वेगावरही वाईट परिणाम होतो आणि शहरी मध्यम वर्गाचही नुकसान होतं.

माझ्या प्रिय देशवासीयांनो,

हीच बाब लक्षात घेता, पाणी, जमीन, आकाश सगळ्याच क्षेत्रात देशानं असाधारण वेग आणि प्रमाणावर काम करुन दाखवलं आहे. नवे जलमार्ग, वॉटरवेज असोत, नव्या नव्या ठिकाणांना (सागरी विमानानं) सीप्लेननं जोडणं असो, देशात खूपच वेगानं काम सुरु आहे. भारतीय रेल्वेही वेगानं आधुनिक रुपात सक्रीय होत आहे. तुम्हाला माहित असेलंच आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 75 आठवडे साजरा करायचं ठरवलं आहे. 12 मार्चला याची सुरुवात झाली आणि 15 ऑगस्ट 2023 पर्यंत तो साजरा करणार आहोत. उत्साहाने पुढे जायचं आहे. यासाठी देशानं अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या 75 आठवड्यात 75 वंदे भारत रेल्वे गाड्या देशाच्या प्रत्येक भागाला एकमेकांशी जोडतील. देशात आज ज्या वेगानं नव्या विमानतळांचं निर्माण होत आहे. उडाण योजना दुर्गम भागांनाही जोडत आहे. हे अभूतपूर्व आहे. जोडले जात असलेले नवे विमानमार्ग लोकांच्या स्वप्नांना कसे नवे पंख देत आहे,  हे आपण बघत आहोत. 

माझ्या प्रिय देशवासीयांनो,

देशाला आधुनिक पायाभूत सुविधांसह पायाभूत सुविधा निर्माणात सर्वंकष दृष्टिकोण, एकात्मिक दृष्टिकोण यांचा अंगिकार करण्याची खूप गरज आहे. भारत येणाऱ्या काही काळातच कोट्यवधी देशवासीयांचं स्वप्न साकार करणारी एक मोठी योजना, गतीशक्तीचा राष्ट्रीय मास्टरप्लान, प्रधानमंत्री गतीशक्ती योजना आणणार आहे. तो लागू करणार आहे. शंभर लाख कोटी, शंभर लाख कोटी पेक्षाही अधिकची ही योजना लाखो नवतरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी घेऊन येणार आहे. गतीशक्ती, आपल्या देशासाठी असा राष्ट्रीय पायाभूत सुविधा मास्टरप्लान असेल, जो सर्वंकष पायाभूत सुविधेची पायाभरणी करेल. आपल्या अर्थव्यवस्थेला एकात्मिक आणि सर्वंकष मार्ग प्रदान करेल. आपल्या वाहतुकीच्या साधनांमधे सध्या काही ताळमेळ नसल्याचं आपण बघतो. गतीशक्ती यातले अडथळे दूर करेल, यामधे असलेल्या अडचणींना मार्गातून बाजुला काढेल. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, प्रवासाचा वेळ कमी होईल, औद्योगिक उत्पादन क्षमता आणखी वाढेल. आपल्या स्थानिक उत्पादन निर्मात्यांना जागतिक पातळीवर नेण्यासाठीही गतीशक्ती खूप मदत करेल. यामुळे भविष्यातील विशेष आर्थिक क्षेत्रांच्या निर्माणाच्या नव्या संधीही विकसित होतील. अमृत काळातील या दशकात गतीची शक्ती भारताच्या कायाकल्पाचा आधार बनेल. 

माझ्या प्रिय देशवासीयांनो,

विकासपथावर अग्रेसर होत आपलं उत्पादन आणि निर्यात दोन्ही वाढवायला हवं. आपण पाहिलं आहे, आता काही दिवसापूर्वीच भारताने आपलं पहिलं स्वदेशी विमानवाहू युद्धजहाज आयएनएस विक्रांत चाचणीसाठी समुद्रात उतरवलं आहे. भारत आज आपलं लढाऊ विमान बनवत आहे. आपली पाणबुडी बनवत आहे.  गगनयानही अवकाशात भारताची पताका फडकवण्यासाठी सज्ज होत आहे. स्वदेशी उत्पादनातील आपल्या सामर्थ्याला हे सिद्ध करत आहे. 

कोरोना नंतर निर्माण झालेल्या नव्या आर्थिक स्थितीत मेक इन इंडियाला स्थापित करण्यासाठी, देशाने उत्पादन संबंधित प्रोत्साहनाचीही घोषणा केली आहे. यामुळे होत असलेल्या परिवर्तनाचं उदाहरण आपण इलेक्ट्रॉनिक्स, उत्पादन निर्माण क्षेत्रात पाहू शकता. सात वर्षांपूर्वी आपण जवळपास आठ बिलीयन डॉलर्सचे मोबाईल फोन आयात करत होतो. आता याची आयात खूपच घटली असून आपण आज तीन बिलीयन डॉलर्सचे मोबाईल फोन निर्यातही करत आहोत. 

आपल्या उत्पादन निर्माण क्षेत्राला आज जेव्हा गती मिळतेय आपल्याला कटाक्षानं लक्ष द्यायचं आहे की आपण भारतात जे बनवू, सर्वोच्च दर्जासह, जागितक स्पर्धेत ते टिकायला हवं. शक्य झालं तर एक पाऊल पुढे जायला हवं, ही तयारी करायची आहे. जागतिक बाजारपेठेला आपल्याला लक्ष्य करायचं आहे. देशातल्या सगळ्या उत्पादन निर्मात्यांना मला आग्रहानं सांगायचंय, आपल्या उत्पादन निर्मात्यांनी हे कधी विसरता कामा नये की आपण जे उत्पादन बाहेर विकता, ते केवळ तुमच्या कंपनीने तयार केलेलं एक यंत्र नाही, केवळ एक उत्पादन नाही. त्याच्या सोबत भारताची ओळख जोडलेली असते. भारताची प्रतिष्ठा जोडलेली असते. भारताच्या कोटी कोटी लोकांचा विश्वास जोडलेला असतो. 

माझ्या प्रिय देशवासीयांनो,

यामुळेच मी प्रत्येक उत्पादन निर्मात्यांना सांगत असतो तुमचं प्रत्येक उत्पादन भारताचं ब्रँड अँबेसेडर आहे. जोपर्यंत त्या उत्पादनाचा वापर होत राहिल, वापरकर्ता छाती पुढे काढून, अभिमानानं म्हणेल, होय, हे मेड इन इंडिया आहे. हा दृष्टिकोण, मनोवस्था हवी. आता तुमच्या मनात जगभरातील बाजारपेठेवर गारुड करण्याचं स्वप्न असायला हवं. हे स्वप्न साकार करण्यासाठी सरकार तुमच्यापाठी सर्वोतोपरी उभं आहे. 

माझ्या प्रिय देशवासीयांनो,

देशातील आज वेगवेगळया क्षेत्रात, छोट्या छोट्या शहरातही, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातल्या शहरातही नवेनवे स्टार्ट अप्स बनत आहेत. त्यांचं भारतीय उत्पादन जागतिक बाजारपेठेत जाण्यासाठी मोठी भूमिकाही वठवत आहे. सरकार, आपल्या या स्टार्ट अप्सच्या पाठी पूर्ण ताकदीनं उभं आहे. त्यांना आर्थिक मदत करणं असो, करात सवलत देणं असो, त्यांच्यासाठी नियम सुलभ करणं असो, सर्व काही केलं जात आहे. आपण पाहिलं आहे, कोरोनाच्या या कठिण काळात हजारो, हजारो नवे स्टार्ट अप्स पुढे आले आहेत. यशस्वीपणे ते पुढे वाटचाल करत आहेत. कालचे स्टार्ट अप्स आजचे मोठे युनिकॉर्न उद्योग बनत आहेत. यांचं बाजारमूल्य हजारो कोटी रुपयांपर्यंत पोहचत आहे. 

हे देशातील नवे इच्छा आणि संकल्पना निर्माते आहेत. आपल्या अभिनव कल्पनांच्या सहाय्याने ते स्वतःच्या पायावर उभे राहात आहेत. अग्रेसर होत आहेत. जगावर अधिराज्य गाजवण्याचं स्वप्न बाळगून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. या दशकात भारताचे स्टार्ट अप्स, भारताची स्टार्ट अप्स व्यवस्था याला आपण जगात सर्वश्रेष्ठ बनवण्याच्या दिशेनं आपल्याला काम करायचं आहे. आपल्याला थांबायचं नाही. 

माझ्या प्रिय देशवासीयांनो,

मोठे बदल घडवून आणण्यासाठी, मोठ्या सुधारणा करण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज असते. आज सारं जग बघतय की भारतात राजकीय इच्छाशक्तीची कोणतीही कमतरता नाही. सुधारणा लागू करायला उत्तम आणि हुशार प्रशासन हवं. भारत कशाप्रकारे आपल्या इथे प्रशासनाचा नवा अध्याय लिहित आहे याचादेखील आज जग साक्षीदार आहे. अमृतकाळातील या दशकात आज आपण नव्या पिढीच्या सुधारणांना पोहचवायचं आहे. यात आपली प्राथमिकता असेल की, नागरीकांना ज्या काही सेवा पुरवणं आहे ते शेवटच्या टप्प्यापर्यंत, शेवटच्या व्यक्तीपर्यंत, प्रवाहीपणे कोणत्याही अडथळ्याशिवाय त्यांच्यापर्यंत पोहचावं. देशाच्या समग्र विकासासाठी देशातील लोकांच्या जीवनात सरकार आणि सरकारी प्रक्रीयेचा विनाकारण हस्तक्षेप संपवायलाच हवा. 

आधीच्या काळी सरकार स्वतःच ड्रायविंग सीटवर बसलं होतं. ही कदाचित त्या वेळेची मागणी राहिली असेल. पण आता काळ बदलला आहे. देशात गेल्या सात वर्षांत यासाठीचे प्रयत्नही वाढले आहेत. देशातील लोकांना अनावश्यक कायद्याच्या जाळ्यातून, अनावश्यक प्रक्रियांच्या जाळ्यातून मुक्ती द्यायला हवी. आतापर्यंत देशातील जुन्या शेकडो कायद्यांना समाप्त करण्यात आलं आहे. कोरोना कालखंडातही सरकारने 15 हजारपेक्षा जास्त अनुपालन रद्द केले आहेत. आपल्यालाही अनुभव असेल, एखादं छोटं सरकारी काम असेल तरी भरपूर कागदपत्रं, पुन्हा पुन्हा कागदपत्रं, एकच माहिती पुन्हा पुन्हा हेच चालत आलंय. 15 हजार अनुपालन आम्ही संपवले आहेत. तुम्ही विचार करा, दोनशे वर्षांपूर्वी, एक उदाहरण मी देऊ इच्छितो, दोनशे वर्षांपूर्वीपासून आपल्याकडे एक कायदा चालत आला होता, दोनशे वर्षांपूर्वीपासून म्हणजे 1857 च्याही आधीपासून, ज्यामुळे देशातील नागरीकाला नकाशा बनवण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. आता विचार करा, 1857 पासून सुरु आहे, नकाशा बनवायचा आहे तर सरकारला विचारा. नकाशा कुठल्या पुस्तकात छापायचा आहे तर सरकारला विचारा. नकाशा हरवल्यावर त्यात अटकेचीही तरतूद आहे. आजकाल प्रत्येक फोनमधे मॅपचं, नकाशाचं   ॲप आहे. उपग्रहांचे इतके सामर्थ्य आहे मग अशा प्रकारच्या कायद्यांचे ओझे डोक्यावर घेऊन आपण देशाला पुढे कसे काय नेऊ शकणार? अनुपालनाचे हे ओझे कमी करणे अतिशय गरजेचे आहे, मॅपिंग असो, अंतराळ असो, माहिती तंत्रज्ञान असो, बीपीओ असोत, अशा प्रकारे अनेक क्षेत्रात अनेक प्रकारच्या नियामक व्यवस्था आम्ही समाप्त केल्या आहेत. 

माझ्या प्रिय देशवासीयांनो,

विनाकारण असलेल्या कायद्यांच्या विळख्यातून सुटका, ईझ ऑफ लिव्हिंग आणि त्यासोबत ईझ ऑफ डुईंग बिझनेस या दोन्हीसाठी अतिशय गरजेची आहे. आपल्या देशातील उद्योग आणि व्यापार या परिवर्तनाचा अनुभव घेत आहेत. 

डझनावारी श्रम कायदे आता केवळ चार संहितांमध्ये समाविष्ट झाले आहेत. करांशी संबंधित व्यवस्थांना देखील आता सुलभ आणि फेसलेस करण्यात आले आहे. या प्रकारच्या सुधारणा केवळ सरकारपुरत्या मर्यादित राहू नयेत तर ग्रामपंचायत, नगर परिषदा, नगरपालिकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी देशातील प्रत्येक व्यवस्थेला एकत्रित काम करावे लागेल. मी हे आवाहन करत आहे आणि अतिशय आग्रहाने करत आहे की केंद्र असो वा राज्य, सर्वांच्या विभागांना मी सांगत आहे, सर्व सरकारी कार्यालयांना सांगत आहे, आपल्या येथे नियमांच्या, प्रक्रियांच्या आढाव्याची मोहीम राबवत जा. असा प्रत्येक नियम, अशी प्रत्येक प्रक्रिया जी देशाच्या जनतेसाठी अडथळा निर्माण करत असेल तर तो नियम किंवा प्रक्रिया आपल्याला काढून टाकलीच पाहिजे. जे सत्तर पंचाहत्तर वर्षात जमा झाले आहे ते एका दिवसात किंवा एका वर्षात दूर होणार नाही याची मला कल्पना आहे. पण आपण जर मनाशी निर्धार करून काम सुरू केले तर आपल्याला ते नक्कीच करता येईल. 

माझ्या प्रिय देशवासीयांनो,

याच विचाराने सरकारने नोकरशाहीमध्ये लोकाभिमुख दृष्टीकोनात वाढ करण्यासाठी, कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी सरकारने मिशन कर्मयोगी आणि क्षमता उभारणी आयोगाची देखील सुरुवात केली आहे. माझ्या प्रिय देशवासीयांनो कौशल्य आणि सामर्थ्यांने भरलेल्या आपल्या मातीसाठी काही तरी करायची आकांक्षा असलेल्या युवकांची भूमिका खूप मोठी असते. कोणाची असते ही भूमिका ? तर अतिशय मोठी भूमिका असते, आपल्या शिक्षणाची, आपल्या शिक्षण व्यवस्थेची, आपल्या शैक्षणिक परंपरेची. आज देशाकडे 21 व्या शतकांच्या गरजांची पूर्तता करणारे नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे. आता आपली मुले ना कौशल्याच्या कमतरतेमुळे थांबून राहतील,ना भाषांच्या सीमांमध्ये अडकून पडतील. दुर्दैवाने आपल्या देशात भाषांच्या मुद्यांवर खूप मोठे विभाजन निर्माण झाले आहे. भाषांमुळे आपण देशाच्या खूप मोठ्या गुणवत्तेला पिंजऱ्यात बंदिस्त केले आहे. मातृभाषेमध्ये गुणवत्ताप्राप्त लोक मिळू शकतात. मातृभाषेतून शिक्षण घेतलेल्या लोकांची प्रगती झाली तर त्यांच्या आत्मविश्वासात आणखी वाढ होईल. ज्यावेळी गरिबाचा मुलगा, गरिबाची मुलगी मातृभाषेतून शिक्षण घेऊन व्यावसायिक बनतील, त्यावेळी त्यांच्या सामर्थ्याला योग्य न्याय मिळेल.

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये गरिबी विरोधात संघर्षाचे साधन भाषा  आहे, अशी माझी धारणा आहे. हे नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण देखील गरिबी विरोधातील संघर्षात एक मोठे शस्त्र म्हणून काम करणार आहे. गरिबीविरोधातील लढाई जिंकण्यासाठी देखील मातृभाषेतील शिक्षण पाया ठरणार आहे. मातृभाषेची प्रतिष्ठा आहे, मातृभाषेचे महत्त्व आहे. देशाने हे पाहिले आहे आणि आपण सर्व त्याचा अनुभव घेत आहोत, खेळाच्या मैदानात भाषा अडथळा बनली नाही आणि याचा परिणाम असा झाला की आपल्या युवकांची प्रतिभा आता फुलू लागली आहे, ते खेळतही आहेत आणि खुलतही आहेत. 

आता असेच काही जीवनाच्या इतर मैदानांवरही होईल. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. यामध्ये खेळांना अवांतर विषय न मानता मुख्य विषय मानण्यात आले आहे. आयुष्यात पुढे जाण्यासाठी जी काही प्रभावी माध्यमे आहेत त्यामध्ये खेळ देखील एक माध्यम आहे. जीवनात संपन्नतेसाठी खेळणे बागडणे, क्रीडा स्पर्धा अतिशय गरजेच्या आहेत. एक काळ असा होता जेव्हा खेळाला मुख्य प्रवाहात मानले जात नव्हते. आई वडील देखील मुलांना सांगायचे की खेळत राहिलास तर आयुष्य वाया घालवशील. आता देशात तंदुरुस्तीविषयी, खेळाविषयी एक जागरुता निर्माण झाली आहे. यावेळी ऑलिंपिकमध्येही आपण पाहिले आहे, आपण अनुभव घेतला आहे. हा झालेला बदल आपल्या देशासाठी एक अतिशय महत्त्वाचा टर्निंग पॉईंट आहे. म्हणूनच आज देशात खेळात गुणवत्ता, तंत्रज्ञान आणि व्यावसायिक वृत्ती आणण्यासाठी जे अभियान सुरू आहे त्या अभियानाला या दशकात आपल्याला आणखी वेगवान करायचे आहे आणखी व्यापक करायचे आहे.

देशाची ही सन्मानाची बाब आहे की शिक्षण असो वा खेळ, बोर्डाच्या परीक्षांचे निकाल असोत किंवा ऑलिंपिकचे मैदान, आपल्या सुकन्या आज अभूतपूर्व कामगिरी करत आहेत. आज भारताच्या सुकन्या आपले अवकाश प्राप्त करण्यासाठी आतुर आहेत. प्रत्येक कार्य आणि क्षेत्रामध्ये महिलांचा समान सहभाग असेल याची काळजी आपण घेतली पाहिजे. आपल्याला याची काळजी घेतली पाहिजे की रस्त्यापासून कामाच्या ठिकाणांपर्यंत महिलांमध्ये सुरक्षिततेची अनुभूती निर्माण झाली पाहिजे. प्रत्येक ठिकाणी महिलांमध्ये आपण सुरक्षित आहोत ही भावना निर्माण झाली पाहिजे. सन्मानाची भावना असली पाहिजे. यासाठी देशाच्या शासनाला, प्रशासनाला, पोलिसांना आणि न्यायव्यवस्थेला, नागरिकांना आपली शंभर टक्के जबाबदारी पार पाडायची आहे. या संकल्पाला आपण आपल्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षपूर्तीचा संकल्प बनवला पाहिजे. 

आज मला होत असलेल्या आनंदामध्ये मी देशवासीयांना सहभागी करत आहे. मला आपल्या देशाच्या लाखो कन्यांची पत्र मिळत होती, ज्यामध्ये आपल्याला सुद्धा सैनिकी शाळेत शिकण्याची  इच्छा असल्याची भावना त्या व्यक्त करत होत्या. त्यांच्यासाठी सुद्धा सैनिकी शाळांचे दरवाजे खुले केले जावेत. दोन अडीच वर्षांपूर्वी मिझोरामच्या सैनिकी शाळेत पहिल्यांदाच मुलींना प्रवेश देण्याच्या एका लहानशा प्रयोगाची आम्ही सुरुवात केली होती. आतापासून देशातील सर्व सैनिकी शाळांचे दरवाजे मुलींसाठी देखील सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. देशातील सर्व सैनिकी शाळांमध्ये आता मुली देखील शिकू शकतील. जगात राष्ट्रीय सुरक्षेचे जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व आता पर्यावरण सुरक्षेला दिले जाऊ लागले आहे. आज भारत पर्यावरण सुरक्षेचा बुलंद आवाज आहे. आज जैवविविधता असो वा लँड न्यूट्रॅलिटी, हवामान बदल असो वा उत्तम पुनर्वापर, सेंद्रीय शेती असो वा शेणापासून बायोगॅस निर्मिती असो, उर्जा संवर्धन असो वा स्वच्छ उर्जा संक्रमण, पर्यावरणाच्या दिशेने भारताचे प्रयत्न आज त्याची फळे देऊ लागले आहेत. भारतात  वनक्षेत्र किंवा नव्या राष्ट्रीय उद्यानांची संख्या, वाघांची संख्या आणि आशियाई सिंह या सर्वांमध्ये       झालेली वाढ ही सर्व भारतीयांसाठी आनंदाची बाब आहे. 

माझ्या प्रिय देशवासीयांनो,

भारताच्या या यशाच्या दरम्यान एक वास्तव देखील आपल्याला लक्षात घेतले पाहिजे. भारत आज उर्जा क्षेत्रात स्वावलंबी नाही. उर्जा आयातीसाठी भारत आज वर्षाला 12 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करतो. भारताच्या प्रगतीसाठी आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी भारत उर्जा क्षेत्रात स्वावलंबी बनणे काळाची गरज आहे, ही बाब अनिवार्य आहे. यासाठी आज भारताला हा संकल्प करावा लागेल की आपण भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी भारताला उर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवू आणि यासाठी आमचा कृती आराखडा अतिशय सुस्पष्ट आहे. वायू आधारित अर्थव्यवस्था आहे, देशात पीएनजी, सीएनजीचे जाळे असावे, 20 टक्के इथेनॉल ब्लेंडींगचे उद्दिष्ट असावे. एका निर्धारित लक्ष्याच्या दिशेने भारत पुढे वाटचाल करत आहे. भारताने इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या दिशेने देखील पुढचे पाऊल टाकले आहे आणि रेल्वेच्या शंभर टक्के विद्युतीकरणासाठी देखील काम अतिशय जलदगतीने सुरू आहे. 2030 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे भारतीय रेल्वेने लक्ष्य निर्धारित केले आहे. या सर्व प्रयत्नांबरोबरच देश मिशन सर्क्युलर इकॉनॉमीवर देखील भर देत आहे. वाहने भंगारात काढण्याचे आपले धोरण याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. आज जी-20 मध्ये, जी-20 या देशांच्या समूहात भारत असा एकमात्र देश आहे जो आपल्या हवामान बदलाची लक्ष्ये साध्य करण्याच्या दिशेने जलदगतीने आगेकूच करत आहे. 

भारताने या दशकाच्या अखेरपर्यंत 450 गिगावॉट अपारंपरिक उर्जा निर्मिती करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. 2030 पर्यंत 450 गिगावॉट... यापैकी 100 गिगावॉट उर्जानिर्मितीचे लक्ष्य भारताने निश्चित केलेल्या मुदतीपूर्वीच साध्य केले आहे. आमचे हे प्रयत्न जगाला देखील एक विश्वास देत आहेत. जागतिक मंचावर आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची स्थापना याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. भारत आज जे काही काम करत  आहे त्यामध्ये सर्वात मोठे जे लक्ष्य आहे ते भारताला हवामानाच्या क्षेत्रात मोठी झेप घ्यायला मदत करणार आहे. हवामानाच्या क्षेत्रात एक मोठी झेप घ्यायला मदत करणार आहे. ते आहे हरित हायड्रोजनचे क्षेत्र.हरित हायड्रोजनच्या क्षेत्रातील उद्दिष्ट प्राप्तीसाठी मी आज या तिरंग्याच्या साक्षीनं राष्ट्रीय हायड्रोजन अभियानाची घोषणा करतो आहे. या अमृतकाळात आपल्याला देशाला हरित हायड्रोजनचे उत्पादन आणि निर्यातीचं जागतिक केंद्र बनवायचं आहे. उर्जेच्या क्षेत्रातली ही नवी प्रगती भारताला आत्मनिर्भर बनवेल. तसंच स्वच्छ ऊर्जेकडे भारताला रुपांतरीत करण्यासाठीची ही एक नवी प्रेरणा देखील ठरेल. या हरित प्रगतीतून हरित क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी आपल्या युवकांसाठी आणि आपल्या स्टार्टअप कंपन्यांसाठी निर्माण होत आहेत. 

माझ्या प्रिय देश बांधवांनो,

21व्या शतकातला आजचा भारत मोठी उद्दिष्टे निश्चित करून ती पूर्ण करण्याचे सामर्थ्य असणारा आहे. भारत अशा समस्याही आज सोडवत आहे, ज्या सोडविण्यासाठी कित्येक दशके, कित्येक शतकं वाट पाहावी लागली होती. कलम 370 हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय असो, देशाला कराच्या जंजाळातून मुक्त करणारी व्यवस्था असो, वस्तू आणि सेवा कर असो, आपल्या सैनिकांसाठी एक श्रेणी-एक पेन्शनची व्यवस्था असो, रामजन्मभूमी विवादाप्रकरणी शांततामय मार्गाने तोडगा या सगळ्या गोष्टी गेल्या काही काळात प्रत्यक्षात येताना आपण पहिल्या आहेत. 

त्रिपुरात कित्येक दशकांनंतर ब्रू- रियांग करार होणे असो, ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देणे असो किंवा मग जम्मू-काश्मीरमध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे असो. भारताची संकल्पशक्ती आपण यातून सातत्याने सिद्ध करतो आहोत. 

आज कोरोनाच्या या काळातही भारतात विक्रमी थेट परदेशी गुंतवणूक येत आहे. भारतातली परदेशी गंगाजळीही आत्तापर्यंतच्या इतिहासात सर्वोच्च स्थानी आहे. सर्जिकल हल्ला आणि हवाई हल्ला करून भारतानं देशाच्या शत्रूला भारताच्या सामर्थ्याची चुणूकही दाखवली आहे. या सगळ्या गोष्टी हेच सांगणाऱ्या आहेत की भारत बदलतो आहे, भारत बदलू शकतो. भारत कठीण निर्णयही घेऊ शकतो आणि कठोर निर्णय घ्यायलाही भारत अजिबात कचरत नाही, थांबत नाही. 

माझ्या प्रिय देश बांधवांनो 

दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक संबंधांचे स्वरूप बदलले आहे. कोरोनानंतरही म्हणजेच कोरोनोत्तर काळातही जगाची नव्या प्रकारे रचना होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या काळात जगाने भारताचे प्रयत्न पहिले आहेत. आज जग भारताकडे एका नव्या दृष्टीकोनातून बघते आहे. आणि या दृष्टीकोनाचे दोन महत्वाचे पैलू आहेत. एक दहशतवाद आणि दुसरा विस्तारवाद. भारत या दोन्ही आव्हानांशी लढा देतो आहे. कणखरतेने आणि हिंमतीने या आव्हानांना उत्तरही देतो आहे. भारताला आपली जबाबदारी योग्य पद्धतीनं पार पाडता यावी यासाठी भारताचं संरक्षण करणाऱ्यांनाही तेवढेच सक्षम असणं आवश्यक आहे. संरक्षणाच्या क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी भारतातील कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या देशातल्या उद्योगांना नव्या संधी प्राप्त करून देण्यासाठी आमचे प्रयत्न सातत्याने सुरु आहेत. देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर तैनात असलेल्या आपल्या संरक्षण दलांचे हात मजबूत करण्यासाठी सरकार प्रयत्नात कुठलीही कसर ठेवणार नाही, अशी ग्वाही मी आज देतो आहे. 

माझ्या प्रिय देश बांधवांनो, 

आज देशातले महान विचारवंत श्री अरविंदो यांचीही जयंती आहे. वर्ष 2022 मध्ये त्यांची 150 वी जयंती येणार आहे. श्री अरविंदो भारतच्या उज्ज्वल भविष्याचे द्रष्टे पुरुष होते. ते म्हणत असत की “आपण आधी कधीच नव्हतो तेवढे सामर्थ्यवान आपल्याला व्हावे लागेल. त्यासाठी आपल्याला आपल्या सवयी बदलाव्या लागतील. एक नवे हृदय घेऊन आपल्याला स्वतःला पुन्हा जागृत करावे लागेल.” श्री अरविंदो यांचे हे विचार आपल्याला आपल्या कर्तव्यांचे भान देणारे आहेत. एक नागरिक म्हणून एक समाज म्हणून आपण देशाला काय देतो आहे याचा ही आपण विचार करायला हवा. आपण अधिकारांना नेहमीच महत्व दिले आहे. त्या-त्या काळात त्याची गरजही होती. मात्र आता आपल्याला आपली कर्तव्ये सर्वोपरी ठेवावी लागतील. त्यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल. जी संकल्पे पूर्ण करण्याचा विडा आज देशाने उचलला आहे ती पूर्ण करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला त्यात सहभागी व्हावे लागेल. प्रत्येक नागरिकाला त्याची जबाबदारी घ्यावी लागेल. 

जसे, देशाने जलसंवर्धनाचा संकल्प केला आहे, तो पूर्ण करण्यासाठी, पाणी वाचवण्याची सवय आपल्याला लावून घ्यावी लागेल. जसा देशाने डिजिटल व्यवहार करण्याचा संकल्प केला आहे, त्यावेळी आपल्यालाही कमीत कमी व्यवहार रोखीने करण्याचा प्रयत्न करावा लागेल. आपण ‘व्होकल फॉर लोकल’ हे अभियान सुरु केले आहे. त्यामुळे आपण अधिकाधिक स्थानिक  उत्पादनं खरेदी करावी हे आपले कर्तव्य आहे. देशाला प्लास्टिक मुक्त भारत करण्याचा जो आपला संकल्प आहे, तो पूर्ण करण्यासाठी आपलं कर्तव्य आहे की, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर आपल्याला पूर्णपणे बंद करायला हवा. आपल्या नद्या स्वच्छ ठेवणे, त्यात घाण न टाकणे हे आपलेच कर्तव्य आहे. आपले सागर किनारे स्वच्छ ठेवणे आपलेच काम आहे. स्वच्छ भारत अभियानालाही आपल्याला एका वेगळ्या टप्प्यावर न्यायचे आहे.  

आज जेंव्हा देश स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या औचित्याने हा अमृत महोत्सव साजरा करत आहे त्यावेळी आपल्यालाही या महोत्सवात सहभागी होणे आणि त्यात उत्साहाने आपले योगदान देणे. आपले संकल्प सातत्याने जागृत ठेवणे, हे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे. आपल्या स्वातंत्र्यलढ्याचा विचार करून आपण जे काही कराल ते सगळेच अमृताच्या थेंबासारखे पवित्रच असेल. कोटी कोटी भारतीयांच्या प्रयत्नातून भरला जाणारा हा अमृतकुंभ येणाऱ्या काळासाठी एक प्रेरणा बनून त्यांच्यात नवा उत्साह निर्माण करेल. 
माझ्या प्रिय देश बांधवांनो, मी भविष्यवेत्ता नाही. मी कर्मफळावर विश्वास ठेवतो. माझा देशातल्या युवकांवर विश्वास आहे. देशाच्या भगिनींवर, देशाच्या मुलींवर, देशाच्या शेतकऱ्यांवर, देशातल्या व्यावसायिकांवर माझा विशास आहे. ही “कॅन डू” पिढी आहे. ही पिढी कोणतेही उद्दिष्ट साध्य करू शकते. 

मला विश्वास आहे की, ज्यावेळी 2047 साली स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव, स्वातंत्र्याची शताब्दी पूर्ण होईल त्यावेळी जे कोणी पंतप्रधानपदी असेल, आज पासून 25 वर्षांनी, ते ज्यावेळी ध्वजारोहण करतील त्यावेळी आपल्या भाषणात ते ज्या यशाचे कामगिरीचे वर्णन करतील, ते यश तेच असेल ज्याचा संकल्प आज आपला देश करतो आहे. असा मला पूर्ण विश्वास आहे. आपल्या विजयावर हा माझा विश्वास आहे.

आज मी जे संकल्प म्हणून सांगतो आहे, तेच 25 वर्षांनंतर जे पंतप्रधान ध्वजारोहण करतील ते हेच संकल्प, भारताची सिद्धी म्हणून सांगतील. देश आपल्या त्या यशोगाथेचं गौरव गीत गात असेल. जे आज देशाचे युवक आहेत ते त्यावेळीही बघतील की आपल्या देशाने हे यश कसे मिळवले आहे. 

21व्या शतकात भारताची स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण करण्यात येणारी कुठलीही अडचण आता आपल्याला रोखू शकत नाही. आपली चिवट शक्ती हीच आपली ताकद आहे, एकजूट असणे ही आपली ताकद आहे. “राष्ट्र प्रथम - सदैव प्रथम” ही भावनाच आपली प्राणशक्ती आहे. हा काळ एकत्रित स्वप्ने बघण्याचा काळ आहे. हा काळ एक होऊन संकल्प करण्याचा काळ आहे. हा काळ एकवटून प्रयत्न करण्याचा काळ आहे. आणि हाच काळ आहे ज्यावेळी आपण विजयाच्या दिशेने वाटचाल करायची आहे. आणि म्हणूनच मी पुन्हा सांगतो.. 

हीच वेळ आहे, हीच योग्य वेळ आहे,

भारतासाठी अमूल्य  वेळ आहे. 

हीच वेळ आहे, हीच योग्य वेळ आहे,

भारतासाठी अमूल्य वेळ आहे.  

असंख्य बाहूंची शक्ती आहे, 

असंख्य बाहूंची शक्ती आहे, 

सर्वत्र देशाविषयी भक्ती आहे. 

असंख्य बाहूंची शक्ती आहे,

सर्वत्र देशाविषयी भक्ती आहे. 

तुम्ही उठा, तिरंगा फडकवा, 

भारताचे भविष्य आकाशात उंचवा!

हीच वेळ आहे, हीच योग्य वेळ आहे,

भारतासाठी अमूल्य वेळ आहे.  .. 

असाध्य आहे, काहीही नाही, 

कठीण, असे काहीही नाही. 

तुम्ही उठा, लागा कामाला

ओळखा आपल्या सामर्थ्याला, 

जाणा आपल्या कर्तव्यांना, 

जाणा आपल्या कर्तव्यांना... 

हीच वेळ आहे, हीच योग्य वेळ आहे,

भारतासाठी अमूल्य वेळ आहे... 

जेंव्हा देश स्वातंत्र्याची शंभर वर्षे पूर्ण करेल त्यावेळी देशवासियांची उद्दिष्टे प्रत्यक्षात पूर्ण झालेली असावीत हीच माझी इच्छा आहे. याच शुभकामनांसह सर्व देश बांधवांना 75व्या स्वातंत्र्यदिनाच्या मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि माझ्या सोबत हात वर करून म्हणा:- 

जय हिंद! जय हिंद!! जय हिंद!!! 

वंदे मातरम्! वंदे मातरम्!! वंदे मातरम्!!

भारत माता की जय ! भारत माता की जय !! भारत माता की जय !!!

खूप खूप धन्यवाद! 

 

* * *

JPS/MC/Radhika/Nilima/Sanjana/Vinayak/Shailesh/DR

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1746073) Visitor Counter : 6402