पंतप्रधान कार्यालय

भारतीय विद्यापीठ संघटनेची 95 वी वार्षिक बैठक आणि कुलगुरूंच्या राष्ट्रीय चर्चासत्रात पंतप्रधानांनी केलेलं भाषण

Posted On: 14 APR 2021 9:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 एप्रिल 2021

 

नमस्‍कार,

या कार्यक्रमाला माझ्यासोबत उपस्थित असलेले गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, देशाचे शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक जी, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी जी, गुजरातचे शिक्षणममंत्री भुपेंद्र सिंह जी, युजीसीचे अध्यक्ष प्राध्यापक डी पी सिंह जी, बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू अमी उपाध्याय जी, भारतीय विद्यापीठ संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक तेजप्रताप जी, उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या मित्रांनो,

आज आपणाला देश जेव्हा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे, त्याच कालावधीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा हा प्रसंग आपल्याला या महान यज्ञाशी जोडतो आणि त्याचवेळी भविष्यासाठी प्रेरणाही देतो. मी कृतज्ञ देशातर्फे, सर्व देशबांधवांतर्फे, डॉ बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली अर्पण करतो.

 

मित्रांनो,

स्वातंत्र्याच्या लढ्यातील आपल्या लाखो-कोट्यवधी स्वातंत्र्यसैनिकांनी एका समरस-सर्वसामावेश भारताचे स्वप्न पाहिले होते.हे स्वप्न पूर्ण करण्याची सुरुवात बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान देऊन केली होती. आज त्याच संविधानाने सांगितलेल्या मार्गावरून चालतांना भारत  आपले एक नवे भविष्य रेखाटत आहे. यशाची नवनवी शिखरे पार करत आहे.

 

मित्रांनो,

आज या पवित्र दिनी, भारतीय विद्यापीठ संघटनेच्या सर्व कुलगुरुंची 95 वावी बैठक होत आहे. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठात 'बाबासाहेब समरसता अध्यासन' स्थापन करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. आत्ताच, बाबासाहेब यांच्या जीवनावर, त्यांचे विचार आणि आदर्श यावड श्री किशोर मकवाना यांनी लिहिलेल्या चार पुस्तकांचे लोकार्पण देखील झाले . या सर्व उपक्रमांशी संबंधित सर्व मान्यवरांचे मी अभिनंदन करतो.

 

मित्रांनो,

भारत जगात लोकशाहीची जननी म्हणून ओळखला जातो. आपली रोजच्या जीवनात, आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या कार्य पद्धतींमध्ये, एक प्रकारे आपल्या जीवन शैलीत लोकशाही एकरूप झाली आहे. स्वातंत्र्यानंतर भारत देश आपला लोकशाही वारसा आणखी भक्कम करून पुढील मार्गक्रमण कर शकेल यासाठी बाबासाहेबांनी देशाला मजबूत आधार दिला. बाबासाहेबांना वाचल्यानंतर, समजून घेतल्या नंतर आपल्या लक्षात येतं की, ते एक  वैश्विक दृष्टीकोन असलेले व्यक्ती होते.

श्री किशोर मकवानाजींच्या पुस्तकांत बाबासाहेबांची ही दृष्टी आपल्याला अनुभवायला मिळते. त्यांचे एक पुस्तक आपल्याला बाबासाहेबांच्या आयुष्याचा परिचय करून देते, तर दुसरे पुस्तक त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकते. या प्रमाणेच, तिसऱ्या आपल्याला बाबासाहेबांच्या राष्ट्राविषयीच्या तर्कशास्त्राची ओळख होते. आणि चौथे पुस्तक त्यांचे ‘आयाम दर्शन’ म्हणजे काय हे आपल्याला सांगेल. हे चारही गुण कुठल्याच आधुनिक शास्त्रापेक्षा कमी नाहीत.

माझी इच्छा आहे, की विद्यापीठांत, महाविद्यालयांत आपल्या नवीन पिढीने या आणि यासारख्या पुस्तकांचा जास्तीत जास्त अभ्यास करावा. एकरूप समाज असो, दलित-वंचित समाजाच्या अधिकारांची चिंता असो, महिलांचे उत्थान आणि त्यांच्या अधिकारांचा प्रश्न असो, शिक्षण आणि विशेषतः उच्च शिक्षणाविषयी बाबासाहेबांचा दृष्टीकोन असो, या सर्व पैलूंमुळेदेशाच्या युवकांना बाबासाहेबांना समजून घेण्याची संधी मिळेल.

 

मित्रांनो,

डॉक्टर आंबेडकर म्हणत असत -

“माझी तीन आराध्य दैवतं आहेत. ज्ञान, स्वाभिमान आणि नम्रपणा .” म्हणजे Knowledge,Self-respect, आणि politeness. जेंव्हा ज्ञान येतं, तेंव्हाच स्वाभिमान वाढतो. स्वाभिमानी व्यक्ती आपल्या अधिकारां विषयी जागरूक असतो. समान अधिकारांमुळे समाजात एकरूपता येते आणि देश प्रगती करतो.

बाबासाहेबांनी जीवनात जो संघर्ष केला तो आपल्या सर्वांना अवगत आहे. इतका कठीण संघर्ष करून बाबासाहेब ज्या उंचीवर पोहोचले ते आपल्या सर्वांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे. बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर आपण चाललं पाहिजे हे सुनिश्चित करण्याची जबाबदारी नेहमीच आपल्या शिक्षण व्यवस्थेवर, आपल्या महाविद्यालयांवर  होती. आणि जेंव्हा एक राष्ट्र म्हणून समान उद्दिष्ट असेल, एकत्रित प्रयत्नांचा प्रश्न असेल, तर सामुहिक प्रयत्नच कार्यसिद्धीचे मध्यम असतात.

म्हणून, मला असं वाटतं, यात भारतीय विद्यापीठ संघाची (Association of Indian Universities) भूमिका महत्वपूर्ण बनते. या संस्थेला तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी, श्रीमती हंसा मेहता, डॉक्टर झाकीर हुसेन यांच्या सारख्या विद्वानांचा वारसा लाभला आहे.

डॉक्टर राधाकृष्णन जी म्हणत - “The end-product of education should be a free creative man, who can battle against historical circumstances and adversities of nature”.

म्हणजे, शिक्षण  असे हवे जे माणसाला मुक्त करेल, तो मोकळेपणाने विचार करेल, नवीन विचारांसोबत काही नाव निर्माण करेल. ते असं मानत की जगाला एक घटक मानून आपण आपले शिक्षण व्यवस्थापन केले पाहिजे. पण त्या सोबतच ते शिक्षणाच्या भारतीयत्वा विषयी देखील आग्रही होते. आजच्या जागतिक परिपेक्ष्यात याला अधिकच महत्व प्राप्त होते.

आज येथे नवे  ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण  आणि तिच्या अंमलबजावणीच्या योजनेवर विशेषांक प्रकाशित करण्यात आले. हे अंक, आपले  राष्ट्रीय शिक्षण धोरण हे भविष्यवादी आहे, जागतिक मापदंड असलेले धोरण  आहे, याचे विस्तृत दस्तावेज आहेत. आपण सर्व विद्वान राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या तपशीलांशी परिचित आहात. डॉक्टर राधाकृष्णनजी यांने शिक्षणाच्या ज्या उद्देशांचा उहापोह केला होता, तोच या धोरणाचा गाभा आहे.

मला सांगण्यात आलं की या वेळी तुम्ही चर्चासत्राचा विषय देखील - ‘भारतातील उच्च शिक्षणात परिवर्तन घडविण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण- 2020 ची अंमलबजावणी’ हाच ठेवला आहे. या साठी आपणा सर्वांचे अभिनंदन करायला हवे.

मी NEP बद्दल नेहमीच तज्ञांशी चर्चा करत असतो. राष्ट्रीय शिक्षण धोरण जितके वास्तववादी आहे, तितकीच वास्तववादी त्याची अंमलबजावणी करणे आहे.

 

मित्रांनो,

तुम्ही तुमचे संपूर्ण जीवन शिक्षणला समर्पित केलं आहे. तुम्हाला हे चांगलच माहित आहे की प्रत्येक विद्यार्थ्याची एक क्षमता असते. शक्ती असते. याच क्षमता डोळ्यासमोर ठेऊन विद्यार्थी आणि शिक्षकांना तीन महत्वाचे प्रश्न पडतात.

पहिला - ते काय करू शकतात?

दुसरा - त्यांना शिकवलं तर ते काय करू शकतात?

आणि तिसरा - त्यांना काय करायचं आहे?

एक विद्यार्थी काय करु शकतो, ही त्याची आंतरिक शक्ती आहे. मात्र, आपण त्यांना आंतरिक शक्ती सोबतच, संस्थात्मक शक्ती दिली तर, त्यांचा व्यापक विकास होतो. हा संयोग झाला तर, आपले तरुण पाहिजे ते करू शकतील. म्हणूनच, आज देशाचा विशेष भर कौशल्य विकासावर आहे. आज जस जसा देश ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेत अग्रेसर होत आहे, तस तसा कुशल युवकांची भूमिका आणि त्यांची मागणी देखील वाढत आहे.

 

मित्रांनो,

डॉ श्याम प्रसाद मुखर्जींनी कौशल्याची शक्ती ओळखली होती, अनेक दशकांपूर्वी त्यांनी शिक्षण संस्था आणि उद्योगांच्या सहकार्यावर खूप भर दिला होता. आज तर देशात अपरिमित संधी आहेत, आणखी आधुनिक काळातले नवनवीन उद्योग आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, विविध उपकरणांद्वारे इंटरनेट जोडणी आणि माहिती पासून त्रीमितीय छपाई, आभासी जग, रोबोटिक्स, मोबाईल तंत्रज्ञान, भौगोलिक माहिती प्रणाली आणि स्मार्ट आरोग्य सुविधा ते संरक्षण क्षेत्रापर्यंत. आज जगात भारत भविष्यातलं केंद्र म्हणून बघितला जातो. या गरजा पूर्ण करण्यासठी देश कायम मोठी पावलं उचलतो आहे.

देशाच्या तीन मोठ्या शहरांत भारतीय कौशल्य संस्थांची स्थापना करण्यात येत आहे. काही महिन्यांपुर्वी डिसेंबरमध्ये या भारतीय कौशल्य संस्थेच्या पहिल्या तुकडीच्या अभ्यासाला मुंबईत सुरवात देखील झाली. नॅसकॉमच्या सहकार्याने  2018 मध्ये भविष्यवादी कौशल्य उपक्रमाला सुरवात (initiative) करण्यात आली आहे. यात 10 उदयोन्मुख तंत्रज्ञानातील दीडशे पेक्षा जास्त कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते.

 

मित्रांनो,

नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये NETFची देखील तरतूद आहे. यात शिक्षणात तंत्रज्ञानाच्या जास्तीत जास्त वापरावर भर दिला जातो. आमची अशी इच्छा आहे की सर्व विद्यापीठे बहु आयामी बनावीत. आम्ही विद्यार्थ्यांना लवचिकता देऊ इच्छितो. जसे की सुलभ  प्रवेश आणि बाहेर पडणे आणि शैक्षणिक गुण बँक बनवून, सहजतेने कुठेही अभ्यासक्रम पूर्ण करणे. ही सगळी उद्दिष्टं गाठण्यासाठी देशाच्या प्रत्येक विद्यापीठाने एकत्र येऊन, एकमेकांशी समन्वय साधून काम करायला हवे. यावर तुम्हा सर्व कुलगुरूंना विशेष लक्ष द्यावे लागेल.

ज्या नव्या नव्या शक्यता आहेत, ज्या क्षेत्रांमध्ये आपण शक्यता निर्माण करू शकतो, त्यांच्यासाठी एक कौशल्य साठा आपल्या विद्यापीठांतच तयार होईल. आपणा सर्वांना मी आग्रह करू इच्छितो की या दिशेने वेगात काम झाले पाहिजे, एका काल मर्यादेत ते काम संपवले जावे.

 

मित्रांनो,

बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या मार्गावर वाटचाल करुन आज देशात जलद गतीने गरीब, दलित,पीडित, शोषित, वंचित अशा सर्वांच्याच आयुष्यात परिवर्तन घडवले जात आहे. बाबासाहेब सर्वांना समान संधी मिळण्याविषयी बोलत असत. आज देशात जनधन खात्याच्या आधारे प्रत्येक व्यक्तीचे आर्थिक समावेशन होत आहे. DBT च्या मार्गाने गरीबाचा पैसा थेट त्यांच्या खात्यात पोहोचतो आहे. डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी जे भीम UPI सुरु केले आहे, ते आज गरिबांची मोठी ताकद बनले आहे. DBT च्या माध्यमातून गरिबाचा पैसा थेट त्यांच्या खात्यात पोचला आहे.आज प्रत्येक गरिबाला हक्काचे घर मिळते आहे. मोफत वीज जोडणी मिळते आहे. त्याचप्रमाणे जल जीवन अभियानाअंतर्गत गावांमध्ये देखील स्वच्छ पाणी पोचण्यासाठी मिशन मोडवर काम होत आहे.

कोरोनाचे संकट आले तेव्हाही देश, गरीब, मजूर यांच्यासाठी सर्वात आधी उभा राहिला. जगातलं सर्वात मोठं लसीकरण अभियान देखील आपल्याकडे सुरु असून त्यात गरीब-श्रीमंत अशा आधारावर काहीही भेदभाव होत नाहीये. हाच तर बाबासाहेबांनी दाखवलेला मार्ग आज, हेच तर त्यांचे आदर्श आहेत.

 

मित्रांनो,

बाबासाहेब आंबेडकर नेहमी महिला सक्षमीकरणावर भर देत असत आणि या दिशेने त्यांनी अनेक प्रयत्न केले. त्यांच्या याच दूरदृष्टीनुसार वाटचाल करतांना देश आज आपल्या लेकींना नवनव्या संधी उपलब्ध करुन देत आहे. घर आणि शाळांमध्ये शौचालयांपासून ते सैन्यात युद्धभूमीपर्यंत प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक धोरणात आज महिला आहेत. त्याचप्रमाणे बाबासाहेब यांचा जीवन संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवण्यासाठी आज देशात मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरु आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित पंचतीर्थ विकसित केले जात आहेत. काही वर्षांपूर्वी मला डॉक्टर आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राचे लोकार्पण करण्याची संधी मिळाली होती. आज हे केंद्र, सामाजिक आणि आर्थिक विषयांवर बाबासाहेब आंबेडकर  यांच्या आयुष्यावरील एक मोठे संशोधन केंद्र म्हणून विकसित झाले आहे.

 

मित्रांनो ,

आज आपण स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करण्याच्या जवळ पोचलो आहोत, आणि पुढच्या 25 वर्षांचे उद्दिष्ट आपल्यासमोर आहे. देशाचे हे भविष्य, भविष्याचे उद्दिष्ट आणि यश या सगळ्याचा आपल्या युवकांशी जवळचा संबंध आहे. आपले युवकच हे संकल्प पूर्ण करणार आहेत.आपल्यआ देशातील युवकांना त्यांच्या सामर्थ्यावर संधी उपलब्ध करुन द्यायच्या आहेत.

मला पूर्ण विश्वास आहे की आपल्या सर्वांचे हे सामूहिक संकल्प, आपल्या शैक्षणिक विश्वातील हे जागरुक प्रयत्न नव्या भारताचे स्वप्न पूर्ण करणार आहेत.

आमचे हे प्रयत्न, हे परिश्रमच बाबासाहेबांच्या चरणी आपली श्रद्धांजली ठरेल.

याच शुभेच्छांसह, मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. नवरात्रीच्या शुभेच्छा देतो. आज बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विशेष शुभेच्छा देतो.

खूप खूप धन्यवाद !

 

* * *

Jaydevi PS/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1711890) Visitor Counter : 311