कृषी मंत्रालय

केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी ‘भारतातील बांबू लागवडीतील संधी आणि आव्हानांवर राष्ट्रीय सल्लामसलत’ या उद्घाटन सत्राला संबोधित केले


शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यात बांबू हे महत्वाचे पीक ठरू शकते: तोमर यांचे प्रतिपादन

Posted On: 25 FEB 2021 7:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 फेब्रुवारी 2021 


केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आज ‘भारतातील बांबू लागवडीतील संधी आणि आव्हानांवर राष्ट्रीय सल्लामसलत’ च्या उद्घाटन सत्राला आभासी पद्धतीने संबोधित केले. नीती आयोगाचे राष्ट्रीय बांबू अभियान आणि ‘इन्व्हेस्ट इंडिया’ यांनी संयुक्तपणे बांबू या  विषयावर 2 दिवसीय विस्तृत मंथन आयोजित केले आहे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यात, रोजगाराच्या संधींमध्ये वाढ करण्यात आणि विशेषतः ईशान्येकडील प्रदेशातील लोकांचे जीवनमान सुधारण्यात बांबू पीक महत्वपूर्ण असल्याचे स्पष्ट झाल्याने बांबू क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकार जोरदार प्रयत्न करीत आहे असे यावेळी तोमर यांनी सांगितले.

छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शेतकरी उत्पादक संघटना, एफपीओ स्थापन करण्यावरही तोमर यांनी भर दिला कारण यामुळे रोपवाटिका आणि वृक्षारोपण वाढविण्यासाठी योग्य कार्यपद्धती उपलब्ध करुन देणाऱ्या समूहांना एकत्रित करणे सुनिश्चित होईल. बांबू क्षेत्रासाठी एफपीओ स्थापण्यासाठी प्रस्ताव पाठवावेत, असे आवाहन त्यांनी राज्यांना केले.

बीपासून रोप तयार होण्याच्या अवस्थेत बांबूची प्रजाती व गुणवत्ता ओळखणे फारच अवघड आहे, म्हणून नर्सरीची मान्यता व लागवडीच्या साहित्याचे प्रमाणपत्र यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केल्याबद्दल मंत्र्यांनी ‘राष्ट्रीय बांबू अभियानाचे’ कौतुक केले.

बांबू क्षेत्रातील कामगिरीविषयी बोलताना मंत्री म्हणाले की, मागील 3 वर्षात 15,000 हेक्टर क्षेत्रावर व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण बांबू लागवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय बांबू अभियानाने बांबूच्या 79 बाजारपेठा उभारल्या आहेत. बांबूवर आधारित स्थानिक अर्थव्यवस्थेचे मॉडेल स्थापित करण्यासाठी या उपक्रमांना प्रातिनिधिक प्रकल्प म्हणून पाहिले जाऊ शकते.

भारतीय उदबत्ती उद्योगात बांबू महत्वाची भूमिका बजावतो. भारतीय उदबत्ती उद्योगातील बांबूच्या जवळपास 60% काड्या आयात केल्या जात होत्या. आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी राष्ट्रीय बांबू अभियान आणि खादी व ग्रामीण उद्योग आयोग केव्हीआयसीसह केंद्र सरकार देशांतर्गत उदबत्ती उत्पादनावर भर देणार आहे असे मंत्र्यांनी स्पष्ट केले.

प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणमध्ये बांबूच्या वापरास प्रोत्साहन दिले जाईल, यासाठी ग्रामीण विकास मंत्रालयाने आवश्यक मॉडेल तयार केल्याचेही ते म्हणाले.

उद्घाटन सत्रात केंद्रीय एमएसएमई मंत्री नितीन गडकरी, कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी, नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ राजीव कुमार, पंतप्रधानांचे सल्लागार अमरजीत सिन्हा आणि विविध हितधारक सहभागी झाले होते.


* * *

Jaydevi PS/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1700902) Visitor Counter : 170


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi