जलशक्ती मंत्रालय
जलशक्ती मंत्रालयाच्या सल्लागार समितीकडून जलजीवन मिशन योजनेच्या प्रगतीचा आढावा
Posted On:
12 FEB 2021 9:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी 2021
केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या अध्यक्षतेखाली आज जलशक्ती मंत्रालयाच्या सल्लागार समितीची बैठक झाली. जलशक्ती राज्यमंत्री रतन लाल कटारिया हे देखील या बैठकीला उपस्थित होते. संसदेच्या 18 सदस्यांनी देखील या बैठकीत सहभागी होत जलजीवन मिशनच्या प्रगतीचा आढावा घेतला. ग्रामीण भागात नळाने पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी राष्ट्रीय जलजीवन मिशन योजनेने कोविड-19 महामारी असूनही केलेल्या प्रगतीची या खासदारांनी प्रशंसा केली आणि आपापल्या मतदारसंघांमध्ये या योजनेची जलद अंमलबजावणी करण्यासाठी काही सूचना केल्या.
ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि ते सुकर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2019 रोजी जलजीवन मिशनची घोषणा केली होती. त्यावेळी एकूण 18.93 कोटी ग्रामीण कुटुंबांपैकी 3.23 कोटी कुटुंबांना( 17%) नळाने पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध होती. सध्या एकूण 19.18 कोटी ग्रामीण कुटुंबापैकी एक तृतीयांश(35%) म्हणजेच 6.70 कोटी ग्रामीण कुटुंबांना त्यांच्या घरात नळावाटे पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध झाली आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनमानात सुधारणा झाली आहे आणि जीवन सुकर बनले आहे.
समानता आणि समावेशकतेच्या सिद्धांताला अनुसरून गावांमधील प्रत्येक घराला पिण्याच्या पाण्याची हमी देणाऱ्या या योजनेची व्याप्ती वाढली असून देशातील 52 जिल्हे ‘ हर घर जल जिल्हे’ म्हणजे नळाने घरी पाणी उपलब्ध असणारे जिल्हे बनले आहेत. राज्याराज्यांमध्ये या संदर्भात अतिशय निकोप स्पर्धा होत असून ग्रामीण भागातील प्रत्येक घराला नळाने पाणी पुरवणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
S.Tupe/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1697591)
Visitor Counter : 138