शिक्षण मंत्रालय

नागपूरच्या विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेच्या 18 व्या दीक्षांत समारंभामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचे दूरदृष्य प्रणालीव्दारे भाषण

Posted On: 28 DEC 2020 9:24PM by PIB Mumbai

 

नागपूरच्या विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेच्या 18 व्या दीक्षांत समारंभामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंकयांनी दूरदृष्य प्रणालीव्दारे भाषण केले. या कार्यक्रमाला शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला पूर्णवेळ संचालक जे डी पाटील, एल अँड टीच्या संरक्षण व्यवसायाचे वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष आणि एल अँड टीचे इतर अधिकारीही उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंकयांनी दूरदृष्य प्रणालीव्दारे विद्यार्थ्‍यांना संदेश देताना सर्व नवपदवीधरांचे, त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. त्यांनी यावेळी तीन डीविषयी विद्यार्थ्‍यांशी संवाद साधला. ते म्हणाले, डेमॉक्रसी, डेमोग्राफिक आणि डिमांड या तीन गोष्टी देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी अतिशय महत्वाच्या आहेत आणि यांच्या मदतीनेच भारताचे 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट साध्य होऊ शकणार आहे.

राष्ट्रनिर्माणाच्या कार्यामध्ये अभियांत्रिकी आणि अभियंत्यांचे खूप मोठे योगदान असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. तसेच डिजिटल इंडिया, स्टार्ट-अप इंडिया, मेक इन इंडिया, यांची निशंकयांनी यावेळी माहिती दिली. आणि युवकांनी आता नवीन भारत- स्वच्छ भारत, स्वस्थ भारत आणि सशक्त भारत निर्माणासाठी कार्य करावे, असे आवाहन केले.  यावेळी संस्थेच्या माजी विद्यार्थ्‍यांचा उल्लेख करून त्यांनी समाज आणि राष्ट्राच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाचा उल्लेख मंत्री पोखरियाल यांनी यावेळी केला. कोरोना महामारीच्या काळामध्ये संस्थेने केलेल्या कार्याचे पोखरियाल यांनी कौतुक केले.

या कार्यक्रमात बोलताना शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे म्हणाले, आपल्या मुलांना पदवीच्या महत्वाच्या टप्प्यापर्यंत आणण्यासाठी पालकांनी घेतलेल्या कष्टाची, त्यांनी केलेल्या त्यागाची जाणीव सर्व मुलांनी ठेवावी. आता यापुढे तुम्ही ज्या संकल्पना शिकल्या आहेत, त्या प्रत्यक्षात उतरविण्याचा काळ सुरू झाला आहे. गेल्या काही वर्षात भारतात अतिशय वेगाने परिवर्तन घडून येत आहे.  आणि आता या स्पर्धात्मक जगामध्ये पाऊल ठेवताना विद्यार्थ्‍यांनी आपली मूल्यांचे कायम जपणूक करावी, असे आवाहन धोत्रे यांनी यावेळी केले.

व्हीएनआयटीचे संचालक प्राध्यापक पी.एम पाडोळे यांनी संस्थेचा अहवाल सादर केला. तसेच संस्थेने केलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. इंडस्ट्री- इन्स्टिट्यूट- इंटरअॅक्शन यावर संस्थेचा विश्वास असून, त्या दृष्टीने अनेक उद्योग व्यवसायांबरोबर सामंजस्य करार करण्यात आले आहेत, यामध्ये डसाॅल्ट ॲव्हिएशन, सिमेन्स आणि नागपूर एम्स यांचा समावेश असल्याचे पाडोळे यांनी सांगितले.

 

M.Chopade/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1684232) Visitor Counter : 193