शिक्षण मंत्रालय

राष्ट्रपतींनी जेएनयूच्या चौथ्या वार्षिक दीक्षांत कार्यक्रमाला व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले

Posted On: 18 NOV 2020 9:01PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 नोव्‍हेंबर 2020


उत्कृष्टतेसाठी समान संधी असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) देशातील सर्व भागातून आणि समाजातील सर्व स्तरातून विद्यार्थी शिकण्यासाठी येतात. अतिशय वेगळ्या करिअर मार्गांची आकांक्षा बाळगणारे  विद्यार्थी जेएनयूमध्ये एकत्र येतात. हे विद्यापीठ समावेशकता, विविधता आणि उत्कृष्टतेचा मिलाफ  आहे, असे राष्ट्रपती  राम नाथ कोविंद यांनी आज (18 नोव्हेंबर, 2020) जेएनयूच्या चौथ्या वार्षिक दीक्षांत समारंभाला एका व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित करताना सांगितले.

राष्ट्रपती म्हणाले की भारतीय संस्कृतीच्या सर्व छटा जेएनयूमध्ये प्रतिबिंबित होतात. संकुलातील  इमारती, वसतिगृहे, रस्ते आणि सुविधांची नावे भारतीय वारशावरून देण्यात आली  आहेत. हे सर्वोत्कृष्ट भारताचे सांस्कृतिक आणि भौगोलिक चित्र दर्शवते. हे भारतीयत्व हा जेएनयूचा ठेवा आहे आणि तो  बळकट करणे हे त्यांचे कर्तव्य आहे.

राष्ट्रपती म्हणाले की जेएनयूचे  उत्कृष्ट अध्यापकगण  मुक्त वादविवादाला प्रोत्साहन देतात आणि मत भिन्नतेबद्दल आदर व्यक्त करतात.  विद्यार्थ्यांना शिकण्यात भागीदार  मानले जाते जे उच्च शिक्षणासाठी आवश्यक आहे.  विद्यापीठ उत्स्फूर्त चर्चेसाठी प्रख्यात आहे जी वर्गांबाहेर, कॅफेटेरियात आणि ढाब्यावरही तासन तास  चालते.

प्राचीन भारतातील अध्यापन व संशोधनाच्या वैभवशाली भूतकाळाचा उल्लेख करताना राष्ट्रपती म्हणाले की आजच्या आव्हानांना तोंड देताना आपण तक्षशिला, नालंदा, विक्रमशीला आणि वल्लभी  विद्यापीठाकडून  प्रेरणा घेऊ शकतो, ज्यांनी अध्यापन व संशोधनाचे उच्च मापदंड निश्चित केले आहेत. जगभरातील विद्वान आणि विद्यार्थी विशेष ज्ञान मिळविण्यासाठी या  केंद्रांवर आले. त्या प्राचीन व्यवस्थेमध्ये ज्यात आधुनिकतेचे अनेक घटक आहेत, त्यांनी चरक, आर्यभट्ट, चाणक्य, पाणिनी, पतंजली, गार्गी, मैत्रेयी आणि तिरुवल्लुवर यासारखे थोर विद्वान घडवले. त्यांनी वैद्यकीय विज्ञान, गणित, खगोलशास्त्र, व्याकरण आणि सामाजिक विकासात अमूल्य योगदान दिले. जगातील इतर भागांतील लोकांनी भारतीय विद्वानांच्या साहित्याचा अनुवाद केला आणि या शिक्षणाचा पुढील ज्ञानाच्या प्रगतीसाठी उपयोग केला. आजच्या भारतीय विद्वानांनी अशा प्रकारची ज्ञानाची मूळ संस्था तयार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे ज्याचा उपयोग समकालीन जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी केला जातो. जेएनयू ही उच्च शिक्षणाच्या निवडक संस्थांपैकी एक आहे जी जागतिक स्तरावर तुलनात्मक उत्कृष्टतेपर्यंत पोहोचू शकते.

कोविड -19 महामारीबाबत  बोलताना राष्ट्रपती म्हणाले की, आज या साथीच्या रोगामुळे जग संकटात सापडले आहे. साथीच्या आणि महामारीच्या सद्यस्थितीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये नमूद केले आहे की उच्च शिक्षण संस्थानी  संसर्गजन्य रोग, साथीचे रोग, विषाणूविज्ञान , निदान, इंस्ट्रुमेंटेशन, लसनिर्मिती  आणि इतर संबंधित क्षेत्रात संशोधन करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. शक्यतो बहु-शाखीय दृष्टिकोनातून संबंधित सामाजिक समस्यांचा अभ्यास करणे देखील आवश्यक आहे. या प्रयत्नात जेएनयू सारख्या विद्यापीठांनी विशिष्ट मार्गदर्शन यंत्रणा विकसित करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमधील नवसंशोधनाला  चालना देण्यासाठी आघाडीवर असायला हवे, असेही ते म्हणाले.

केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी आपल्या व्हिडिओ संदेशामध्ये पीएचडी पदवी प्राप्त केल्याबद्दल आणि जगातील शिक्षणाचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर झाल्याबद्दल  जेएनयूच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना भारतीय मूल्यांचे जतन करण्यासाठी आणि आतापर्यंत घेतलेल्या  शिक्षणाच्या आधारे इतरांना राष्ट्र निर्मितीसाठी प्रेरित करण्याचे त्यांनी आवाहन केले. परिणामकारकता, समावेशकता, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हितसंबंध प्रतिबिंबित करणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) 2020 चा दृष्टीकोन आणि ध्येय विषयीही ते यावेळी बोलले. एनईपी हे शिक्षणामध्ये भारत एक अग्रगण्य देश होण्याच्या दिशेने उचललेले  एक पाऊल आहे, असेही ते म्हणाले.

निरंतर उच्च एनआयआरएफ मानांकन मिळविल्याबद्दल त्यांनी जेएनयूचे अभिनंदन केले. पायाभूत सुविधा विकास आणि संशोधन / नाविन्यपूर्ण प्रकल्पांना मदत करण्यासाठी विद्यापीठाला मिळालेल्या हेफा फंडाबद्दलही ते यावेळी बोलेले.  अटल इनोव्हेशन सेंटर आणि विद्यापीठातर्फे उभारल्या जाणाऱ्या अनेक स्टार्ट अप्सवर भर देत   ते म्हणाले कि ,यामुळे  मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया आणि आत्मनिर्भर भारत ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मदत होईल. महिलांसाठी एनसीसी कार्यक्रम सुरू करुन जेएनयूने महिलांच्या उन्नतीसाठी सुरु केलेल्या उपक्रमाचे  त्यांनी कौतुक केले.

जेएनयूचे कुलगुरू प्रा. एम. जगदेश कुमार यांनी विद्यापीठाचा शैक्षणिक अहवाल सादर केला आणि दोन नवीन शाखा स्कूल ऑफ इंजिनिअरिंग आणि अटलबिहारी वाजपेयी स्कूल ऑफ मॅनेजमेंट अँड एंटरप्रेन्योरशिपसह आपत्ती संशोधन केंद्र, राष्ट्रीय सुरक्षा अभ्यासाचे विशेष केंद्र, ईशान्य भारतासाठी विशेष अभ्यास केंद्र, ई-लर्निंगसाठी विशेष केंद्र ही चार नवीन विशेष केंद्रे स्थापन करण्यात आल्याचे सांगितले. नीती आयोगाच्या पाठिंब्याने जेएनयूने, अटल इनोव्हेशन सेंटर सुरू केले आहे आणि अनेक स्टार्ट-अप्स विद्यापीठात सुरु झाले आहेत. अभियांत्रिकी विभागाच्या (स्कूल ऑफ इंजिनीअरिंगच्या) विद्यार्थ्यांनी लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम (एलएमएस) आणि स्टार्ट अप कंपनीद्वारे क्लाऊड आधारित जैविक डेटा विश्लेषण व्यासपीठ यासारखे मंच विद्यापीठात विकसित केले  आहेत. हेफा फंड विद्यापीठाच्या पायाभूत सुविधा व संशोधन / नाविन्यपूर्ण कार्यक्रमांच्या विकासात मदत करेल. जेएनयू हे एनईपी 2020 धोरण आणि शिक्षणातील उत्कृष्टता प्राप्त करण्याच्या उद्दीष्टांशी सुसंगत आहे. तरुणांचा सर्वांगीण विकास लक्षात घेऊन आयुर्वेद जीवशास्त्रातील मास्टर्स कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.  जेएनयू प्रवेश परीक्षेसह विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर त्यांनी भर दिला. विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना ज्ञान आणि शिक्षण घेण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या  विद्यापीठातील स्वामी विवेकानंद पुतळ्याच्या अनावरणा बद्दल त्यांनी यावेळी अभिमानाने नमूद केले.

डॉ. व्ही.के. सारस्वत यांनी जेएनयूमधून डॉक्टरेट पदवी प्राप्त केल्याबद्दल सर्व पदवीधरांचे अभिनंदन केले. उद्योजकतेचा विकास, ग्रामीण-शहरी भागाचे एकत्रीकरण आणि देशातील शाश्वत विकासाद्वारे राष्ट्र उभारणीत विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले की, एक भारत श्रेष्ठ भारतासाठी आवश्यक असलेला आर्थिक विकास, सामाजिक स्निग्धता आणि नाविन्यपूर्णतेसाठी देश तरुणांकडे पाहत आहे. विज्ञान, आरोग्य, अर्थशास्त्र, साहित्य, कला इत्यादी विविध विषयांत विद्यार्थ्यांनी विधायक योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले. जेएनयूसारख्या उच्च विद्यापीठांकडून ज्ञान प्राप्त झाल्यानंतर, तरुण विद्वानांनी द्वितीय श्रेणी किंवा तृतीय श्रेणी शहरांमध्ये रोजगार निर्मितीसाठी हातभार लावावा. आत्मनिर्भर भारतसाठी नवोन्मेष आणि उत्पादनांच्या विकासासाठी एकत्रितपणे कार्य करण्यासाठी शैक्षणिक संस्था आणि उद्योग यांच्या एनईपी 2020 च्या दृष्टीकोनाबद्दल ते बोलले.

कोविड -19  साथीची परिस्थिती असूनही, दीक्षांत कार्यक्रमात  एकूण 603 विद्यार्थ्यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.


* * *

Jaydevi PS/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1673872) Visitor Counter : 107


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu