Rural Prosperity
जल जीवन अभियान
₹ 2.08 लाख कोटी केंद्रीय खर्चासह, 15.72 कोटींहून अधिक ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे पाणी पोहोचवणे
Posted On:
26 OCT 2025 10:26AM
नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर 2025
|
ठळक मुद्दे
- 15.72 कोटींहून अधिक ग्रामीण कुटुंबांना आता नळाचे स्वच्छ पाणी उपलब्ध आहे.
- अभियान (2019) सुरू होताना, केवळ 3.23 कोटी कुटुंबांना नळाचे पाणी उपलब्ध होते. तेव्हापासून, 12.48 कोटी अतिरिक्त कुटुंबे जोडली गेली, जे भारतातील सर्वात जलद पायाभूत सुविधांच्या विस्तारांपैकी एक आहे.
- या अभियानाच्या अंमलबजावणी दरम्यान 3 कोटी मनुष्य-वर्ष रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे, ज्यामध्ये जवळजवळ 25 लाख महिलांना बाह्य चाचणी उपकरणे वापरण्यासाठी प्रशिक्षित केले आहे.
- जागतिक आरोग्य संघटनेचा अंदाज आहे की देशात सुरक्षितपणे व्यवस्थापित केलेल्या पिण्याच्या पाण्याची तरतूद केल्यास अतिसारामुळे होणारे 4 लाख मृत्यू टाळता येतील. असा अंदाज आहे की देशात सुरक्षितपणे व्यवस्थापित केलेल्या पिण्याच्या पाण्याच्या सार्वत्रिक व्याप्तीमुळे, जवळजवळ 1.4 कोटी DALY (अपंगत्व-समायोजित जीवन वर्ष) टाळता येतील.
- जागतिक आरोग्य संघटनेचे असेही प्रतिपादन आहे की प्रत्येक ग्रामीण घराला नळ जोडणी दिल्यास पाणी संकलनावरील वेळेत (दररोज 5.5 कोटी तास) विशेषतः महिलांमध्ये (या भाराच्या तीन चतुर्थांश) एवढी लक्षणीय बचत होईल.
- भारतातील 2,843 पाणी चाचणी प्रयोगशाळांमध्ये 2025-26 मध्ये 38.78 लाख नमुन्यांची चाचणी करण्यात आली, ज्यामुळे पाण्याच्या कठोर गुणवत्तापूर्ण नियंत्रण सुनिश्चित झाले.
|
प्रस्तावना
भारताने जल जीवन अभियानाअंतर्गत (हर घर जल) एक मोठा टप्पा गाठला आहे, ज्यामध्ये 81 टक्क्यांहून अधिक ग्रामीण घरांना आता नळाचे स्वच्छ पाणी उपलब्ध झाले आहे. 22 ऑक्टोबर 2025 पर्यंत, 15.72 कोटींहून अधिक ग्रामीण कुटुंबांना घरगुती नळांद्वारे सुरक्षित पिण्याचे पाणी मिळत आहे, जे ग्रामीण भारतातील सार्वत्रिक जल सुरक्षेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. या अभियानाअंतर्गत, सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 2,08,652 कोटी रुपयांच्या केंद्रीय खर्चाची मदत मंजूर केली, ज्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला आहे.

प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला नळाचे पाणी पुरविण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2019 रोजी या अभियानाची सुरुवात केली. त्यावेळी, फक्त 3.23 कोटी कुटुंबांना (16.71 टक्के) नळाचे पाणी उपलब्ध होते. तेव्हापासून, 12.48 कोटी अतिरिक्त घरांना या अभियानाशी जोडण्यात आले आहे, जे ग्रामीण भारतातील मूलभूत पायाभूत सुविधांच्या सर्वात जलद विस्तारांपैकी एक आहे.
माता आणि भगिनींना आपल्या घरांसाठी पाणी आणण्याच्या शतकानुशतके चालणाऱ्या कष्टापासून मुक्त करण्याचा प्रयत्न जल जीवन मिशन करते. त्यांचे आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक-आर्थिक परिस्थिती सुधारणे, राहणीमान सुलभ करणे आणि ग्रामीण कुटुंबांमध्ये अभिमान आणि प्रतिष्ठा वाढवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.

हे अभियान शाश्वतता आणि सामुदायिक सहभागावर समान भर देते. त्यात सांडपाणी व्यवस्थापन, जलसंधारण आणि पर्जन्य जल संचयनाच्या माध्यमातून पुनर्भरण आणि पुनर्वापर यासारख्या शाश्वतता उपायांचा मुळापासून समावेश आहे. हे समुदाय-आधारित दृष्टिकोनाद्वारे अंमलात आणले जाते, ज्यामध्ये माहिती, शिक्षण आणि संप्रेषण (IEC) उपक्रम हे जागरूकता आणि स्वामित्व निर्माण करण्यासाठी प्रमुख घटक आहेत. हे अभियान पाण्यासाठी जनआंदोलन (लोक चळवळ) उभारण्याचा प्रयत्न करते, ज्यामुळे त्याला एक सामायिक राष्ट्रीय प्राधान्यक्रम प्राप्त झाला आहे.
उद्दिष्टे
जल जीवन अभियानाच्या व्यापक उद्दिष्टांमध्ये हे समाविष्ट आहे:

जल जीवन अभियानांतर्गत प्रगती (22 ऑक्टोबर, 2025 पर्यंत)
भारतातील प्रत्येक ग्रामीण घरासाठी सुरक्षित आणि पुरेसे पिण्याचे पाणी सुनिश्चित करण्यासाठी जल जीवन अभियान सातत्यपूर्ण प्रगती करत आहे.
- जिल्हा-स्तरीय प्रगती: 192 जिल्ह्यांमधील सर्व घरांमध्ये, शाळांमध्ये आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये नळाचे पाणी पोहोचले आहे, त्यापैकी 116 जिल्ह्यांना पडताळणीनंतर ग्रामसभेच्या ठरावांद्वारे अधिकृतपणे प्रमाणित करण्यात आले आहे.
- ब्लॉक, पंचायत आणि गाव व्याप्ती:
- ब्लॉक: 1,912 ने पूर्ण व्याप्ती नोंदवली आहे, ज्यापैकी 1,019 प्रमाणित आहेत.
- ग्राम पंचायती: 1,25,185 ग्राम पंचायतींनी नोंदणी केली आणि 88,875 ने प्रमाणपत्र प्राप्त केले आहे.
- गावे: 2,66,273 गावांनी अहवाल नोंदणी केली, ज्यापैकी 1,74,348 हर घर जल उपक्रमांतर्गत प्रमाणित आहेत.
- 100 % व्याप्ती असलेली राज्ये/केंद्रशासित प्रदेश: गोवा, अंदमान आणि निकोबार बेटे, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव, हरियाणा, तेलंगणा, पुद्दुचेरी, गुजरात, हिमाचल प्रदेश, पंजाब, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश या अकरा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी सर्व ग्रामीण घरांसाठी पूर्ण नळाच्या पाण्याची जोडणी मिळवली आहे.
- संस्थात्मक व्याप्ती: देशभरातील 9,23,297 शाळा आणि 9,66,876 अंगणवाडी केंद्रांमध्ये नळाच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्यात आला आहे.
'नोंदणीकृत' म्हणजे राज्य/केंद्रशासित प्रदेशाच्या पाणीपुरवठा विभागाने पुष्टी केली आहे की त्या प्रशासकीय क्षेत्रातील सर्व घरे, शाळा आणि अंगणवाडी केंद्रांना नळांद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
'प्रमाणित' म्हणजे गावातील सर्व घरे, शाळा आणि अंगणवाडी केंद्रांना नळाद्वारे पाणीपुरवठा होत असल्याचा पाणीपुरवठा विभागाचा दावा पडताळून ग्रामसभेने ठराव मंजूर केला आहे. सर्व घरांना नळाचे पाणीपुरवठा होत असल्याचे प्रमाणपत्र पाणीपुरवठा विभागाने ग्रामपंचायतीला दिल्यानंतर हे अंमलात आणले जाते.
गुणवत्ता हमी आणि देखरेख
जल जीवन अभियाना अंतर्गत, ग्रामीण भागात सुरक्षित पिण्याचे पाणी सुनिश्चित करण्यासाठी गुणवत्ता हमी आणि देखरेखीसाठी एक मजबूत प्रणाली लागू करण्यात आली आहे. 2025-26 दरम्यान (21 ऑक्टोबर 2025 पर्यंत), एकूण 2,843 प्रयोगशाळांनी (2,184 संस्थात्मक आणि 659 जलपाणी पुरवठा केंद्र-आधारित) देशातील 4,49,961 गावांमध्ये 38.78 लाख पाण्याचे नमुने तपासले.
समुदाय-स्तरीय सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी, 5.07 लाख गावांमध्ये 24.80 लाख महिलांना क्षेत्रीय चाचणी उपकरणे (FTKs) वापरून पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी प्रशिक्षित करण्यात आले आहे. हा समुदाय-चालित दृष्टिकोन पाण्याच्या दूषिततेचा लवकर शोध घेण्यास आणि ग्रामीण पाण्याच्या गुणवत्तेच्या देखरेखीसाठी स्थानिक स्वामित्व बळकट करण्यास सहाय्य करतो.

जल जीवन अभियान (JJM) चे प्रमुख घटक
जल जीवन मिशनची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, खालील घटकांची प्रतिमा आखण्यात आली आहे:
- गावांतर्गत पाईपद्वारे पाणीपुरवठा पायाभूत सुविधा - प्रत्येक ग्रामीण घराला नळाच्या पाण्याची जोडणी सुनिश्चित करण्यासाठी गावांमध्ये पाईपद्वारे पाणीपुरवठा प्रणालींचा विकास.
|
- शाश्वत पेयजल स्रोत - पाणीपुरवठा व्यवस्थेला दीर्घकालीन शाश्वतता प्रदान करण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या विश्वसनीय स्त्रोतांचा विकास आणि/किंवा विद्यमान स्त्रोतांचा विस्तार.
|
- मोठ्या प्रमाणात पाणी हस्तांतरण आणि वितरण - मोठ्या प्रमाणात पाणी हस्तांतरण प्रणाली, प्रक्रिया संयंत्रे आणि वितरण जाळ्यांची स्थापना.
|
- पाण्याच्या गुणवत्तेसाठी तांत्रिक हस्तक्षेप - पाण्याच्या गुणवत्तेचा प्रश्न असलेल्या ठिकाणी पाण्यातील दूषित घटक काढून टाकण्यासाठी तंत्रज्ञानाची अंमलबजावणी.
|
- विद्यमान योजनांमध्ये नविन घटकांचा समावेश - दररोज प्रति व्यक्ती 55 लिटर (lpcd) या किमान सेवा पातळीवर कार्यात्मक घरगुती नळ जोडण्या (FHTCs) प्रदान करण्यासाठी पूर्ण झालेल्या आणि चालू असलेल्या योजनांचे अद्ययावतीकरण .
|
- सांडपाणी व्यवस्थापन - जलसंवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया आणि पुनर्वापर.
|
- सामुदायिक क्षमता बांधणी - शाश्वत पाणी व्यवस्थापनासाठी समुदायांच्या क्षमता निर्माण करण्याच्या उद्देशाने क्रियान्वयनांना पाठिंबा देणे.
|
- आकस्मिकता निधी - नैसर्गिक आपत्ती किंवा दुर्घटनांमुळे उद्भवणाऱ्या अनपेक्षित आव्हानांना किंवा समस्यांना तोंड देण्यासाठी निधीची तरतूद.
|
डिजिटल नवोन्मेषाद्वारे ग्रामीण पाणीपुरवठ्यात परिवर्तन
जल शक्ती मंत्रालयाच्या पेयजल आणि स्वच्छता विभाग (DDWS), अद्ययावत ग्रामीण पाईप जल पुरवठा प्रारूप योजना (RPWSS) विभागाने ग्रामीण जल सेवांमध्ये डिजिटल प्रशासनाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे.
सर्व पाईप जल योजनांसाठी डिजिटल रजिस्ट्री म्हणून काम करणारी नवीन प्रणाली, पारदर्शकता, आराखडा तयारी आणि डेटा-चालित देखरेख सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येकी एक अनोखी RPWSS ओळख नियुक्त करत आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना नोव्हेंबर 2025 पर्यंत RPWSS आयडी निर्मिती पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
GIS मॅपिंग आणि PM गती शक्तीसह एकत्रित केलेले, हे व्यासपीठ कार्यक्षम क्रियान्वयन आणि देखभालीसाठी कालानुरूप डॅशबोर्ड, भविष्यसूचक विश्लेषण आणि साधने प्रदान करते. पंचायती आणि ग्रामीण पाणी आणि स्वच्छता समित्यांना पाणी प्रणाली व्यवस्थापित करण्यासाठी सत्यापित डेटासह ते सक्षम करते आणि WASH क्षेत्रात स्थानिक कौशल्य विकासाला प्रोत्साहन देते.
जल जीवन अभियाना अंतर्गत अद्ययावतीकरण केलेले RPWSS आयडी निर्मिती प्रारूप जे प्रगतीपथावर आहे, ते जबाबदारी, शाश्वतता आणि समुदाय सहभाग मजबूत करते.
जेजेएमचा परिणाम
जल जीवन अभियानाच्या (JJM) अंमलबजावणीमुळे ग्रामीण जीवनात लक्षणीय सुधारणा झाल्या आहेत, हे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी अधोरेखित केले आहे.
- प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला प्रामुख्याने महिलांसाठी (या भाराच्या तीन चतुर्थांश) नळ जोडणी पुरवून दररोज 5.5 कोटींहून अधिक तास वाचतील असा जागतिक आरोग्य संघटनेचा (WHO) अंदाज आहे.
- जागतिक आरोग्य संघटनेचा (WHO) असाही अंदाज आहे की भारतातील सर्व कुटुंबांसाठी सुरक्षितपणे व्यवस्थापित पिण्याच्या पाण्याची सार्वत्रिक व्याप्ती सुनिश्चित केल्याने अतिसाराच्या आजारांमुळे होणारे जवळजवळ 4 लाख मृत्यू टाळता येतील, अंदाजे 1.4 कोटी अपंगत्व समायोजित जीवन वर्ष (DALYs) टाळता येतील आणि परिणामी आरोग्य खर्चात 8.2 लाख कोटी रुपयांपर्यंत बचत होईल.
- भारतीय स्टेट बँकेच्या संशोधनानुसार, बाहेरून पाणी आणणाऱ्या घरांच्या टक्केवारीत 8.3% अंशांची घट झाली आहे, परिणामी 9 कोटी महिलांना आता यापुढे पाणी आणण्याची गरज नाही. शेती आणि संबंधित कामांमध्ये महिलांच्या सहभागात 7.4% अंशांची वाढ झाली आहे.
- नोबेल पारितोषिक विजेते प्राध्यापक मायकल क्रेमर यांच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की सुरक्षित पाण्याच्या पुरवठ्यामुळे पाच वर्षाखालील मुलांमधील मृत्युदर जवळजवळ 30% ने कमी होऊ शकतो, ज्यामुळे दरवर्षी 1,00,000 हून अधिक लोकांचे जीव वाचू शकतात.
- बंगळुरूच्या भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या मते, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) च्या भागीदारीत, JJM मध्ये त्याच्या उभारणीदरम्यान जवळजवळ 3 कोटी मानवी-वर्ष रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे, ज्यामध्ये जवळजवळ 25 लाख महिलांना क्षेत्रीय चाचणी उपकरणे वापरण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

समुदाय-प्रातिनिधिक आणि तंत्रज्ञान-चालित यशोगाथा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, “प्रत्येक घराला पाणी पुरवण्यासाठी जल जीवन अभियान हा एक प्रमुख विकास निकष बनला आहे.”जल जीवन अभियानाचे (JJM) यश केवळ पायाभूत सुविधांच्या निर्मितीमध्येच नाही तर “जन भागिदारीतून पेयजल व्यवस्थापन” या भावनेतही आहे, जे समुदाय-प्रातिनिधिक जल प्रशासन आणि तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण वापर आहे.
पाणी व्यवस्थापनात महिलांचे नेतृत्व - महाराष्ट्र
म्हापण गावात, अमृतनाथ महिला समूह, एक महिला स्वयंसहाय्यता गट, गावातील नळपाणी योजनेचे व्यवस्थापन करते. पंप चालवणे, प्रणालीची देखभाल करणे, मीटर रीडिंग घेणे, पाण्याचे बिल गोळा करणे आणि तक्रारींचे निराकरण करणे ही कामे त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये समाविष्ट आहेत. गटाने 100% पाणी बिल संकलन साध्य केले, योजनेसाठी आवश्यक निधी भक्कम केला आणि ते स्वयंपूर्ण बनवले. कार्यक्षम व्यवस्थापनाद्वारे, स्वयंसहाय्यता गटाने ₹ 1,70,000 कमावले, गटाला शाश्वत उत्पन्न देणारे युनिट बनवले आणि समुदाय-प्रातिनिधिक उपयुक्तता व्यवस्थापनाचे एक प्रारूप तयार केले.
स्रोत शाश्वतता आणि हवामान लवचिकता – नागालँड
नागालँडमधील वोखा येथे, जल जीवन अभियानांतर्गत लोक त्यांच्या जलस्रोतांचे संरक्षण करत आहेत. समुदायांकडून "लोक-प्रथम, स्रोत-प्रथम" दृष्टिकोनाचा अवलंब केला जातो. वोखा येथील समुदायांना हे लक्षात आले आहे की पाणलोट क्षेत्रांचे संरक्षण करणे हे त्यांच्या नळांचे संरक्षण करण्यासाठी आणि वर्षानुवर्षे पाण्याचा मुक्त प्रवाह मिळविण्यासाठी महत्त्वाचे आहे. जेजेएमच्या पाठिंब्याने आणि वन आणि मृदा तसेच जलसंधारण विभागांच्या सहकार्याने, गावकरी खराब झालेल्या उतारांना पुनरुज्जीवित करण्यासाठी एकत्र काम करत आहेत. मातीची धूप थांबवण्यासाठी आणि पावसाचे पाणी जमिनीत झिरपण्यास मदत करण्यासाठी त्यांनी खंदक, पुनर्भरण खड्डे आणि पाझर तलाव बांधले आहेत. माती धरून ठेवण्यासाठी अल्दर, ओक आणि बांबूसारखी स्थानिक झाडे लावली जातात. महिला गट या वृक्षारोपण मोहिमेचे नेतृत्व करतात, तर युवा मंडळे पुनर्भरण संरचनांची काळजी घेतात.
आरोग्य आणि स्वच्छता परिवर्तन – आसाम
आसाममधील बोरबोरी गावात, जल जीवन अभियाना (JJM ) अंतर्गत सामुदायिक संवेदनशीलतेमुळे पाण्यामुळे होणारे दीर्घकालीन आजार दूर होण्यास मदत झाली. पाईपद्वारे पाणी आणि स्वच्छता जागरूकता मोहिमा सुरू झाल्यानंतर, 2022-23 मध्ये नोंदवलेले रुग्ण 27 वरून दोन वर्षांत शून्यावर आले, एकही मृत्यू झाला नाही. स्थानिक नेत्या बिंदू देवी यांनी पाणीपुरवठा योजनेसाठी केवळ त्यांची जमीन दान केली नाही तर शाश्वत देखभाल प्रारूपाला प्रोत्साहन दिले, ज्याठिकाणी प्रत्येक घर पाणीपुरवठा प्रणाली सुरळीतपणे कार्यरत राहण्यासाठी दररोज ₹1 योगदान देते. या दृष्टिकोनामुळे समुदायाची मालकी आणि जबाबदारी वाढली, ज्यामुळे प्रणालीचे सुरळीत आणि दीर्घकालीन क्रियान्वयन सुनिश्चित झाले.
पाण्याच्या टंचाईचे पाणी सुरक्षेत रूपांतर - राजस्थान
बोथरा गावात, एका समुदाय बैठकीत तीव्र पाणी टंचाई आणि भूजलाचा वापर 103% पेक्षा जास्त असल्याचे दिसून आले. या जाणीवेमुळे जल जीवन अभियाना (JJM) अंतर्गत सर्व घरांसाठी शाश्वत पिण्याचे पाणी सुनिश्चित करण्यावर लक्ष केंद्रित करून जल सुरक्षा योजना तयार करण्यात आली. जल सुरक्षा समिती (WSC) च्या बैठकीत, गावकऱ्यांनी चिंता व्यक्त केली की जेजेएम अंतर्गत बांधलेल्या नवीन खुल्या विहिरीला प्रभावी पुनर्भरण उपायांच्या समर्थनाची आवश्यकता आहे. याशिवाय, विहीर अजूनही कोरडी पडू शकते. WSC ने जल सुरक्षा योजना तयार केली आणि कडा ते दरी दृष्टिकोन स्विकारला. तपास धरणे आणि खंदक आराखडे बांधण्यात आले, ज्यामुळे तपास धरणे पूर्ण झाल्यानंतर दहा दिवसांत खुल्या विहिरीच्या पाण्याच्या पातळीत 70 फूट वाढ झाली. या प्रयत्नांमुळे गावाची वार्षिक पाणी साठवण क्षमता 11.77 % ने वाढली, पुनर्भरण संरचनांच्या एकूण खर्चाच्या 5% योगदान समुदायाने दिले.
डिजिटल प्रशासन आणि पारदर्शकता – पश्चिम बंगाल
पश्चिम बंगालच्या ‘जल मित्र’ ॲप्लिकेशनने सामुदायिक जल प्रशासनात देखरेख आणि पारदर्शकतेत क्रांती घडवून आणली. ‘जल मित्र’ मोबाइल आणि वेब ॲप्लिकेशन ही जल जीवन अभियानाशी (जेजेएम) संरेखित केलेली एक व्यवस्थापन माहिती प्रणाली (MIS) आहे, ज्याचा उद्देश प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला कार्यात्मक घरगुती नळ जोडण्या (एफएचटीसी) सुनिश्चित करणे आहे, तर डिजिटल नवोपन्मेषाद्वारे शाश्वत सेवा वितरण, सामुदायिक मालकी आणि सहभागी देखरेखीवर भर देणे आहे. डिजिटल व्यवस्थापन माहिती प्रणाली (MIS) मंचाने 13.70 कोटी सामुदायिक उपक्रमांचा मागोवा घेतला (एप्रिल 2024-ऑगस्ट 2025), 22,111 गावांमधील 80.39 लाख कुटुंबांसाठी कार्यक्षमता मूल्यांकन सुलभ केले आणि 4,522 जल बचाव समित्यांच्या निर्मितीला पाठिंबा दिला. ॲपने एका खंडित मॅन्युअल प्रक्रियेची जागा कालानुरूप, माहिती संकलन-चालित प्रणालीने घेतली, जी जबाबदारी आणि शाश्वत कार्यक्षमता सुनिश्चित करते.
निष्कर्ष
जल जीवन अभियान 81% पेक्षा जास्त घरांना सुरक्षित नळाचे पाणी उपलब्ध करून देऊन ग्रामीण भारताचे परिवर्तन करत आहे. त्यामुळे अवघ्या सहा वर्षांत जलद विस्तार, डिजिटल नवोन्मेष आणि मजबूत समुदाय सहभागाद्वारे हर घर जलचे स्वप्न प्रत्यक्षात आणत आहे. पायाभूत सुविधांव्यतिरिक्त जेजेएम गावांमध्ये आरोग्य, उपजीविका आणि प्रतिष्ठा वाढवित आहे. ते रोजगार निर्माण करत आहे, महिलांच्या वेळेची बचत करत आहे आणि जलजन्य आजार कमी करत आहे. शाश्वतता आणि समानता हे घटक केंद्रस्थानी ठेवून, हे अभियान सुशासन आणि लोकांच्या नेतृत्वाखालील विकासाचे एक प्रारूप म्हणून उभे ठाकले आहे, जे भारताला सार्वत्रिक आणि विश्वासार्ह जल सुरक्षेच्या निकट घेऊन जात आहे.
संदर्भ
जलशक्ती मंत्रालय
PIB पार्श्वभूमी
जल जीवन अभियान PDF मध्ये पहा
* * *
नेहा कुलकर्णी/संदेश नाईक/दर्शना राणे
(Explainer ID: 156477)
आगंतुक पटल : 42
Provide suggestions / comments
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_Ddn
,
Nepali
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Kannada
,
Malayalam