वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत-चिली सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराच्या वाटाघाटींना वेग; वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी चिलीच्या उपमंत्री पॉला एस्तेव्हेझ वाइनस्टीन यांची घेतली भेट


भारत-चिली सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारामुळे व्यापार आणि गुंतवणुकीचे संबंध अधिक दृढ होणार; वाटाघाटी वर्षअखेरीस पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

Posted On: 30 AUG 2026 12:32PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 ऑगस्‍ट 2026

 

भारत-चिली सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराच्या वाटाघाटींना पुढे नेण्यासाठी वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी 26 ऑगस्ट 2026 रोजी चिलीची राजधानी सॅंटियागो येथे, चिली प्रजासत्ताकाच्या आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध विभागाच्या उपमंत्री पॉला एस्तेव्हेझ वाइनस्टीन यांची भेट घेतली.  

भारत-चिली आर्थिक भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी खुल्या दृष्टिकोनासह सातत्यपूर्ण सहभाग आणि संतुलित दृष्टिकोन राखण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा भारताने पुनरुच्चार केला आहे. दोन्ही देशांतील व्यवसाय आणि जनतेसाठी अर्थपूर्ण संधी निर्माण करण्यावर यामध्ये भर देण्यात आला आहे. ग्लोबल साउथचे सदस्य म्हणून भारत आणि चिली यांची समान ओळख, तसेच दोन्ही देशांची समान धोरणात्मक दृष्टी, द्विपक्षीय आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी आणि सामायिक समृद्धीला पुढे नेण्यासाठी मजबूत आधार प्रदान करते.

दोन्ही बाजूंनी भारत-चिलीमधील मजबूत आणि सातत्याने वाढत असलेल्या संबंधांना आणखी बळकटी देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच, सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराच्या माध्यमातून दोन्ही देशांची सामायिक उद्दिष्टे आणि आकांक्षा प्रत्यक्ष आणि व्यावसायिकदृष्ट्या अर्थपूर्ण संधींमध्ये रूपांतरित होतील, याची खात्री करण्यावर भर देण्यात आला. वाणिज्य सचिवांनी आरोग्यसेवा, औषधनिर्माण, ऊर्जा, खनिजे, कृषी, यंत्रसामग्री आणि अभियांत्रिकी यांसह विविध क्षेत्रांमध्ये आर्थिक सहकार्य वाढविण्याच्या मोठ्या शक्यतांवर प्रकाश टाकला. सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराच्या वाटाघाटी यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यास, दोन्ही देशांमधील वाढता द्विपक्षीय व्यापार आणि आर्थिक भागीदारीला आणखी चालना मिळेल.

यावर्षीच सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराच्या वाटाघाटी पूर्ण करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे. दोन्ही देशांतील व्यवसायांसाठी न्याय्य आणि व्यावसायिकदृष्ट्या अर्थपूर्ण परिणाम सुनिश्चित करणारी, संतुलित आणि परस्पर लाभदायक चौकट निर्माण करणे हा यामागील उद्देश आहे. या सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारामुळे व्यापार आणि गुंतवणुकीच्या अधिक संधींचे नवे मार्ग खुले होण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर तंत्रज्ञान, मनुष्यबळ आणि लवचिक पुरवठा साखळी या क्षेत्रांमध्ये सहकार्याला चालना मिळेल. यामुळे भारत आणि चिली यांच्यातील दीर्घकालीन आर्थिक सहकार्यासाठी अधिक भक्कम पाया तयार होईल.

 

* * *

हर्षल आकुडे/राज दळेकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2304636) अभ्यागत कक्ष : 8