संरक्षण मंत्रालय
ज्ञान संपादन करा, अन्यायाविरोधात संवैधानिक मार्गांनी आवाज उठवा आणि लोकशाही पद्धतीने परिवर्तन घडवा: संरक्षण मंत्र्यांचा युवकांना सल्ला
“जिथे युवक आपले क्षितिज विस्तारु शकतील, नवोन्मेष करु शकतील, प्रयोग, सृजन करून अधिक चांगल्या समाजनिर्मितीसाठी उपाय विकसित करु शकतील, अशी व्यवस्था सरकार सातत्याने निर्माण करत राहील” – राजनाथ सिंह
Posted On:
29 AUG 2026 3:31PM by PIB Mumbai
“शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा, या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मंत्राचा अर्थ, ज्ञान संपादन करा, अन्यायाला हिंसाचाराने नव्हे तर लोकशाही पद्धतींनी वाचा फोडा आणि देशात परिवर्तन करण्यासाठी संघटित व्हा, असा असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. ते आज उत्तरप्रदेशात लखनौ इथे, बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठात आयोजित दीक्षांत समारंभात बोलत होते. सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी, संवैधानिक लोकशाही पद्धतींचे महत्त्व अधोरेखित करत, संविधान सभेत, डॉ. आंबेडकर यांनी दिलेल्या आपल्या शेवटच्या भाषणात, सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टे केवळ संवैधानिक मार्गांनीच साध्य केली पाहिजेत, यावर स्पष्टपणे भर दिला होता, असे त्यांनी सांगितले.

न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव, अशा आदर्श मूल्यांपासून प्रेरणा घेऊन कार्य करणारी युवा पिढी घडवण्यावर विद्यापीठांनी लक्ष केंद्रित करायला हवे यावरही राजनाथ सिंह यांनी भर दिला. यातूनच, ही युवा पिढी राष्ट्रबांधणीत आपले अर्थपूर्ण योगदान देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आज जग अत्यंत वेगाने बदलत आहे, असे सांगत नवे तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, सर्वांसाठी नवनव्या संधी निर्माण करत आहे. अशा वेळी, विद्यार्थ्यांनी आपली जिज्ञासू वृत्ती आणि सतत शिकण्याची क्षमता जागृत ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. ज्यांची नवनवी कौशल्ये शिकण्याची तयारी आहे, तेच आजच्या वेगाने बदलत्या जगात प्रगती साध्य करू शकतील असे त्यांनी सांगितले .
राष्ट्र उभारणीत सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित करत राजनाथ सिंह यांनी सांगितले की, वैयक्तिक प्रयत्नांमुळे प्रगतीला हातभार लागू शकतो; मात्र एकजुटीने केलेल्या संकल्पामुळे विकासाचा वेग अनेक पटींनी वाढू शकतो. विद्यार्थ्यांनी ‘टीम इंडिया’चा एक भाग म्हणून कार्य करण्याचे आणि 2047 पर्यंत विकसित भारताचे सामायिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन राजनाथ सिंह यांनी केले.
यश कायमच खडतर मार्गाने साध्य केले, जाते, त्याचा रस्ता कधीही सोपा नसतो, असे सांगत, संरक्षणमंत्र्यांनी, आपला दृढविश्वास, चिकाटी आणि परिश्रम यातूनच आव्हानांचे संधीत रुपांतर होऊ शकते असेही संरक्षणमंत्री म्हणाले.

गेल्या 12 वर्षांत शिक्षण, संशोधन आणि नवोन्मेषाच्या व्यवस्थेत झालेल्या लक्षणीय प्रगतीचा उल्लेख करताना संरक्षणमंत्री म्हणाले की, संशोधन आणि विकासावरील खर्च दुप्पट झाला आहे, तर 34 वर्षांनंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यात आले आहे. भारतीय युवक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहेत, स्टार्ट-अप्स सुरू करत आहेत, युनिकॉर्न कंपन्या उभारत आहेत आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
“भारत केवळ एक मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयाला आला नाही, तर आपल्या संस्कृती आणि क्षमतांवर विश्वास ठेवणारा देश म्हणून उदयाला आला आहे. आज भारत बोलतो, ते जग ऐकतो. आपण केवळ नियमांचे पालन करत नसून आपले नियम स्वतः बनवत आहोत. “आजची पिढी देशाच्या ओळखीचा अभिमान बाळगते, आपल्या संस्कृतीवर विश्वास ठेवते आणि भविष्याबाबत आशावादी आहे. ‘नव्या भारता’मध्ये झालेला हा सर्वात महत्त्वपूर्ण बदल आहे. ‘मेक इन इंडिया’च्या यशामागे ‘बिलीव्ह इन इंडिया’चा आत्मविश्वास आहे,” असे संरक्षणमंत्री म्हणाले.

***
निलिमा चितळे/राधिका अघोर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2304537)
अभ्यागत कक्ष : 6