कृषी मंत्रालय
केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या साप्ताहिक आढावा बैठकीत खते, बियाणे, मान्सून आणि एल निनो परिस्थितीचा आढावा
नैऋत्य मान्सूनने संपूर्ण देश व्यापला असून,खरीप पिकांच्या पेरणीसाठी अनुकूल परिस्थिती
शेतकऱ्यांना वेळेवर खते उपलब्ध करून देण्याचे आणि वितरण प्रणालीतील कोणत्याही त्रुटीचे त्वरित निराकरण करण्याचे शिवराज सिंह चौहान यांचे निर्देश
प्रविष्टि तिथि:
21 JUL 2026 9:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,21 जुलै 2026
केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत खरीप पिकांच्या पेरणीची प्रगती, एल निनोचा प्रभाव आणि मान्सूनची सद्यस्थिती, अपुऱ्या पावसामुळे संवेदनशील जिल्ह्यांची परिस्थिती, खते आणि बियाण्यांची उपलब्धता, जलाशयांमधील पाणीसाठा इत्यादी बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अधिकाऱ्यांना अपुरा पाऊस पडणाऱ्या भागांवर विशेष लक्ष ठेवण्याचे आणि राज्यांशी सतत समन्वय राखण्याचे निर्देश दिले. बैठकीत देण्यात आलेल्या माहितीनुसार 17 जुलै 2026 पर्यंत देशात खरीप पिकांचे एकूण पेरणी 658.19 लाख हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत एकूण पेरणी क्षेत्रात घट झाली असली तरी, अनेक राज्यांमध्ये भात, कडधान्ये आणि इतर पिकांच्या पेरणीत सकारात्मक प्रगती दिसून आली आहे.

कडधान्ये, तेलबिया आणि कापूस अभियानामार्फत राज्य सरकारांसोबत साप्ताहिक आढावा बैठका आयोजित कराव्यात आणि क्षेत्रीय स्तरावरून मिळालेल्या अभिप्रायाच्या आधारे त्वरित आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश शिवराज चौहान यांनी दिले.
या बैठकीत, भारतीय हवामान विभागाचे अंदाज, संभाव्य एल निनो परिस्थिती आणि पावसाच्या दृष्टीने देशभरातील 270 संवेदनशील जिल्ह्यांमधील स्थितीचा आढावा घेण्यात आला.

9 जुलै 2026 पर्यंत नैऋत्य मान्सून राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागांसह संपूर्ण देशात पसरला देशभरात मान्सूनचा विस्तार झाल्याने, बहुतांश राज्यांमध्ये खरीप पिकांच्या पेरणीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी माहिती देखील या बैठकीत देण्यात आली.
1 जून ते 15 जुलै 2026 या कालावधीत देशात सरासरीपेक्षा 23 टक्के कमी पर्जन्यमानाची नोंद झाली.
या बैठकीत खते, विशेषतः युरियाची उपलब्धता आणि वितरण, तसेच बियाण्यांच्या उपलब्धतेचाही आढावा घेण्यात आला. खरीप हंगाम 2026 साठी खते आणि बियाण्यांची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली असून, राज्यांशी नियमित समन्वय साधून पुरवठ्यावर सातत्याने लक्ष ठेवले जात असल्याची माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार खते मिळतील याची खात्री केली पाहिजे आणि वितरण व्यवस्थेत काही कमतरता असल्यास त्यावर त्वरित उपाययोजना केली पाहिजे, असे निर्देश चौहान यांनी अधिकाऱ्यांना दिले.
निलीमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2287479)
आगंतुक पटल : 9