कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत-अमेरिका व्यापार कराराबाबतच्या तर्कांना नकार, शेतकऱ्यांचे हित सर्वोच्च: केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान


गहू, तांदूळ, मका आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी दरवाजे बंद - कोणत्याही परिस्थितीत आयात नाही: केंद्रीय कृषी मंत्री

Posted On: 17 FEB 2026 9:58PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी 2026

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज राजस्थानमधील जयपूर येथे भारत-अमेरिका व्यापार कराराभोवतीच्या विविध तर्कांना स्पष्टपणे फेटाळून लावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या हिताशी कधीही तडजोड केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

शिवराज सिंह चौहान यांनी यावर भर दिला की भारताचे कृषीमंत्री म्हणून ते शेतकऱ्यांना पूर्ण जबाबदारीने सांगत आहेत की कोणत्याही करारात भारतीय शेतकऱ्यांच्या हिताशी कसलीही तडजोड करण्यात आलेली नाही. गहू, तांदूळ आणि मका यासारख्या संवेदनशील पिकांसाठी दरवाजे पूर्णपणे बंद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारताने आता तांदूळ उत्पादनात चीनला मागे टाकत जगात पहिला क्रमांक मिळवला आहे. अशा परिस्थितीत, शेतकऱ्यांना नुकसान पोहोचवू शकणारी कोणत्याही आयातीला मान्यता देण्यात आलेली नाही, असेही त्यांनी सांगितले.

भारतीय शेतकऱ्यांचे हित पूर्णपणे संरक्षित

भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत विशेषतः भारताच्या कृषी क्षेत्रावर त्याच्या संभाव्य परिणामांबद्दल सुरू असलेल्या चर्चा आणि चिंतांच्या पार्श्वभूमीवर शिवराज सिंह चौहान यांनी हे सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. सरकारच्या वाटाघाटींमध्ये वाढत्या परदेशी स्पर्धेच्या कोणत्याही प्रतिकूल परिणामांपासून देशांतर्गत उत्पादकांचे संरक्षण करण्यास प्राधान्य देण्यात आले असल्याचा विश्वास चौहान यांच्या या स्पष्टीकरणातून शेतकरी आणि संबंधित घटकांना दिला आहे.

शैलेश पाटील/‍‍श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2229401) अभ्यागत कक्ष : 6