संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते लखनऊ येथील पीटीसी इंडस्ट्रीजच्या स्ट्रॅटेजिक मटेरियल्स टेक्नॉलॉजी कॉम्प्लेक्समध्ये टायटॅनियम आणि सुपरअॅलॉय मटेरियल्स प्लांटचे लोकार्पण
Posted On:
18 OCT 2025 4:37PM by PIB Mumbai
“तंत्रज्ञान निर्माता बनण्यासाठी आणि आपल्या तंत्रज्ञानविषयक सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी भारताने संरक्षण आणि अंतराळात वापरल्या जाणाऱ्या दुर्मिळ साधनसामुग्रीचे उत्पादन केले पाहिजे,” असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले. 18 ऑक्टोबर 2025 रोजी ते उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील पीटीसी इंडस्ट्रीजच्या स्ट्रॅटेजिक मटेरियल्स टेक्नॉलॉजी कॉम्प्लेक्समध्ये टायटॅनियम आणि सुपरअॅलॉय मटेरियल्स प्लांटचे लोकार्पण केल्यावर बोलत होते.

संरक्षण, अंतराळ, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या दुर्मिळ पृथ्वीज घटकांचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी नमूद केले की केवळ काही देशांकडेच या सामग्रीचे शुद्धीकरण करण्याची आणि उच्च दर्जाची उत्पादने बनवण्याची क्षमता आहे. या संदर्भात, त्यांनी सांगितले की आज उद्घाटन झालेला हा प्रकल्प, जो एअरो-इंजिन घटक आणि सुपर अलॉय घटक इत्यादीची निर्मिती करणाऱ्या पहिल्या खाजगी क्षेत्रातील उत्पादन एककांपैकी एक आहे, तो भारताला दुर्मिळ साधनसामग्री तयार करण्यास मदत करेल.
संरक्षण मंत्र्यांनी नमूद केले की यापूर्वी संरक्षण आणि अंतराळासाठी आवश्यक असलेले प्रगत साहित्य आणि महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानासाठी भारत इतर देशांवर अवलंबून होता, ज्यामुळे संरक्षण क्षेत्राचा विकास मंदावला होता, आणि टायटॅनियम आणि सुपर अलॉय मटेरियल प्लांटसारखे उपक्रम याच्या अगदी उलट आहेत.

भारताला खरी ताकद तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा तो स्वतःची साधनसामग्री, घटक, चिप्स आणि मिश्रधातू तयार करू शकेल, याचा राजनाथ सिंह यांनी पुनरुच्चार केला. त्यांनी सांगितले की या नवीन संयंत्रांमुळे भारत अशा निवडक देशांमध्ये सामील झाला आहे जे स्वतःचे महत्त्वाचे संरक्षण आणि अंतराळ साहित्य बनवू शकतात."याद्वारे, आपण आपली लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे, नौदल प्रणाली आणि उपग्रहांमध्ये वापरले जाणारे सुटे भाग तयार करू शकू", असे ते म्हणाले.
हा प्रकल्प आत्मनिर्भर भारताचे जिवंत उदाहरण आहे असे सांगत राजनाथ सिंह म्हणाले की यामुळे केवळ उद्योगांनाच नव्हे तर मोठ्या प्रमाणात समाजाला देखील लाभ होईल. यामुळे एक नवोन्मेष साखळी स्थापित होईल जी संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट पूर्ण करेल आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला नवीन गती देईल, असे ते म्हणाले.


50 एकरांवर पसरलेला हा स्ट्रॅटेजिक मटेरियल्स टेक्नॉलॉजी कॉम्प्लेक्स 1,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह स्थापन करण्यात आला आहे. वार्षिक 6,000 टनांपेक्षा जास्त उत्पादन क्षमता असलेला हा प्रकल्प भारताला देशांतर्गत आणि पुनर्वापर केलेल्या स्त्रोतांमधून एव्हिएशन-ग्रेड टायटॅनियम आणि सुपरअॅलॉयजचे उत्पादन करण्यास सक्षम बनवतो, जे सामरिक सामग्री स्वातंत्र्याच्या दिशेने एक निर्णायक पाऊल आहे.
***
माधुरी पांगे / सुषमा काणे / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2180775)
Visitor Counter : 8