लोकसभा सचिवालय
लोकसभा अध्यक्षांनी आजच्या संघर्षाने ग्रस्त जगात संवादाचे महत्त्व केले अधोरेखित; भारतात खोलवर रुजलेली लोकशाही परंपरा केली अधोरेखित
भगवान महावीरांची शिकवण आणि भारताचा लोकशाही वारसा जागतिक सौहार्दाचा मार्ग दाखवणारे : लोकसभा अध्यक्ष
‘संवाद से समाधान’ या विषयावर महावीर फाउंडेशनच्या कार्यक्रमात लोकसभेच्या अध्यक्षांनी आमंत्रितांना केले संबोधित
Posted On:
23 JUN 2025 9:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जून 2025
‘संवाद से समाधान’ या विषयावर मुंबईत महावीर फाउंडेशनमध्ये आयोजित कार्यक्रमात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सद्य काळातील आव्हाने सोडवण्यासाठी संवाद, शांतता आणि लोकशाही मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. भगवान महावीरांच्या शिकवणींची कालातीत उपयुक्तता त्यांनी स्पष्ट केली. तसेच भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत असताना ‘लोकशाहीची जननी’ म्हणून भारताची ओळख अधोरेखित केली.
बिर्ला म्हणाले की भगवान महावीरांकडून 2500 वर्षांपूर्वी दिलेला संदेश आजही समाजासाठी अत्यंत सुसंगत आहे. भगवान महावीरांची अहिंसा, करुणा आणि आत्म-शिस्त ही तत्त्वे आधुनिक काळातील जीवन संघर्षांला तोंड देण्यासाठी लोकांना मार्गदर्शन करत आहेत, असेही ते म्हणाले. भगवान महावीरांचे विचार केवळ धार्मिक तत्वे नाहीत तर सुसंवाद, आत्मनिरीक्षण आणि नैतिक आचरणाला प्रोत्साहन देणारी एक समग्र जीवनशैली आहे, यावर बिर्ला यांनी भर दिला.
समकालीन समस्यांशी समांतरता दर्शवत लोकसभा अध्यक्ष म्हणाले की वाढता संघर्ष आणि अस्थिरतेने ग्रस्त असलेल्या जगात, संवादाचे महत्त्व कधीही इतके जास्त जाणवले नव्हते. हिंसाचार आणि संघर्ष आपल्या समस्या सोडवू शकत नाहीत असेही ते म्हणाले. त्याऐवजी, परस्पर सन्मानावर आधारित शांततापूर्ण संवाद हाच एकमेव शाश्वत मार्ग आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. म्हणूनच 'संवाद से समाधान' हा संदेश केवळ तात्विक नाही, तर तो अत्यंत व्यावहारिक आणि आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे "लोकशाही हा भारताचा आत्मा आहे" हे विधान उद्धृत करत बिर्ला यांनी सांगितले की भारतातील लोकशाही संस्था चर्चा, सहकार्य आणि समायोजन या मूलभूत तत्त्वांवर आधारलेली आहे.
देश संविधानाची 75 वर्षे पूर्ण झाल्याचा उत्सव साजरा करत असताना आज भारत लोकशाही देश म्हणून आदर्श ठरत आहे, यावर बिर्ला यांनी प्रकाश टाकला. लोकशाहीच्या प्रतिबद्धतेने आणि सर्वसमावेशकतेने देश प्रगती, स्थैर्य आणि एकतेच्या दिशेने वाटचाल करत आहे, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे; खासदार मिलिंद देवरा आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
* * *
N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2139080)