पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून जोधपुर इथे “वाळवंटीकरण आणि दुष्काळ यांचा सामना करण्यासाठी धोरणे” या विषयावरच्या एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन
Posted On:
17 JUN 2025 9:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 जून 2025
वाळवंटीकरण आणि दुष्काळ यांचा सामना करण्याला समर्पित 2025 च्या जागतिक दिनानिमित्त केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने (एमओईएफसीसी) जोधपुरमध्ये भारतीय वन संशोधन आणि शिक्षण परिषद- रुक्ष वने संशोधन संस्था (आयसीएफआरई-एएफआरआय) येथे एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केले. रुक्ष आणि निम-रुक्ष परिसंस्थांमध्ये शाश्वत भूमी व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करणारी “वाळवंटीकरण आणि दुष्काळ यांचा सामना करण्यासाठी धोरणे” ही या कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना होती.
केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव हे प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होते. केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, तसेच राज्यसभा सदस्य राजेंद्र गेहलोत हे देखील कार्यक्रमात सहभागी झाले,होते.

उद्घाटनपर सत्रात केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी वाळवंटीकरण रोखण्यासाठी आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी हाती घेतलेल्या सक्रीय उपाययोजना अधोरेखित केल्या. यावेळी शाश्वत कृषी पद्धतींचे महत्त्व, समुदाय प्रेरित उपक्रम आणि नैसर्गिक अधिवासांचे जतन यावर त्यांनी अधिक भर दिला.
प्रामुख्याने अशाश्वत कृषी पद्धती, युरियासारख्या खतांचा अमर्याद वापर आणि कीटकनाशकांचा अविचारी वापर यांच्यामुळे झालेल्या वाळवंटीकरणामुळे भारताच्या भूमीवरील मोठ्या भागाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे याकडे केंद्रीय मंत्री यादव यांनी निर्देश केला. अशा पद्धती जमिनीचा कस घालवतातच पण त्याचसोबत अन्न सुरक्षा आणि जैवविविधतेला देखील धोका निर्माण करतात.
वाळवंटीकरण रोखण्यासंदर्भातील संयुक्त राष्ट्रांच्या कराराप्रती भारताच्या कटिबद्धतेच्या अनुषंगाने, केंद्र सरकारने परिसंस्थेचे पुनर्संचयन, दुष्काळाला प्रतिरोध आणि जैवविविधतेत सुधारणा यांच्यावर केंद्रित असलेला सर्वसमावेशक दृष्टीकोन स्वीकारला आहे. विविध देशांना जमिनीचा ऱ्हास रोखण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करत केंद्रीय मंत्री यादव यांनी क्षेत्रीय स्थैर्य आणि आर्थिक समृद्धतेसाठी निरोगी भूमी महत्त्वाची आहे यावर अधिक भर दिला.

या आव्हानांन तोंड देताना, पर्यावरणीय समतोल पुनर्प्रस्थापित करण्यासाठी खालील उपक्रमांची मदत होऊ शकेल:
- अमृत सरोवरे
- मातृ वन
- एक पेड माँ के नाम
हे उपक्रम केवळ झाडे लावण्याशी संबंधित नाहीत तर पर्यावरणीय समतोल पुनर्प्रस्थापित करण्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी शाश्वत भविष्य सुनिश्चित करण्यासाठी आहेत हे केंद्रीय मंत्री यादव यांनी अधोरेखित केले. ते पुढे म्हणाले की, 26 जिल्ह्यांच्या परिसरात 700 किमीवर विस्तारलेली अरवली पर्वतरांग पर्यावरणीयदृष्ट्या तसेच सांस्कृतिकदृष्ट्या खूप महत्त्वाची आहे. ही पर्वतरांग म्हणजे वाळवंटीकरण रोखण्यासाठी नैसर्गिक अडथळा तर आहेच पण त्याचबरोबर भारतीय नागरी संस्कृती आणि वारशाचे उगमस्थान देखील आहे. स्थानिक समुदायांनी संवर्धनसंबंधित प्रयत्नांमध्ये सक्रियपणे सहभागी व्हावे आणि ऱ्हास झालेल्या भागाचे सहयोगात्मक कार्यांच्या माध्यमातून पुनर्संचयन करावे असे आवाहन केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी केले.
पर्यावरणीय शाश्वतता आणि आर्थिक विकास यांच्या एकत्रीकरणातून भारत हरित अर्थव्यवस्थाविषयक उद्दिष्ट्ये प्राप्त करू शकेल असा विश्वास केंद्रीय मंत्री यादव यांनी वर्ष 2047 कडे दृष्टीक्षेप टाकताना व्यक्त केला. विकास आणि पर्यावरणसंबंधी कार्ये यांच्यात सुसंवादी समतोल सुनिश्चित करत भारताची विकासात्मक भरारी पर्यावरणीय जतनाशी सुसंगत असेल याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

जागतिक पातळीवर वनांचे आच्छादन कमी होत असताना भारताने स्वतःच्या भूमीवरील वनांचे आच्छादन वाढवण्यात लक्षणीय प्रगती केली आहे यावर केंद्रीय मंत्री शेखावत यांनी अधिक भर दिला.
पर्यावरणाचे रक्षण करण्यात स्थानिक समुदायांच्या योगदानाची शेखावत यांनी पोचपावती दिली.
* * *
N.Chitale/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2137058)