नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचे भारताच्या विकास आणि हरित दृष्टिकोनावर कोपनहेगन बिझनेस स्कूल (सीबीएस) मध्ये  ब्लू एमबीए कोहोर्टला मार्गदर्शन


“आपले नवप्रवर्तन सर्जनशीलतेने प्रेरित तर निर्णयांना  करुणेचा आधार  असावा” :  सर्बानंद सोनोवाल

Posted On: 07 JUN 2025 6:54PM by PIB Mumbai

 

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी कोपनहेगन बिझनेस स्कूल (सीबीएस) मधील  प्रतिष्ठित ब्लू एमबीए अभ्यासगटाशी आज संवाद साधला. या सत्रात भारताच्या भक्कम आर्थिक प्रगतीचा, गुंतवणुकीसाठी वाढत्या संधींचा आणि पर्यावरणीय जबाबदारीसह समन्वय साधत असलेला  विकास दृष्टिकोन त्यांनी विषद केला.   सोनोवाल हे या नामांकित बिझनेस स्कूलला भेट देणारे पहिले भारतीय मंत्री ठरले.

मंत्रीमहोदयांसोबत विविध प्राध्यापक व सागरी क्षेत्रातील तज्ज्ञांची एक तज्ज्ञ समिती यावेळी उपस्थित होती.

ब्लू एमबीए विद्यार्थ्यांशी बोलताना सोनोवाल यांनी भारताचा सागरमाला उपक्रम आणि भविष्यातील शाश्वत सागरी विकासासाठीचा सागरी अमृतकाळ दृष्टीकोन 2047 यावर आधारित सागरी विकास धोरण अधोरेखित केले. यामध्ये शाश्वत पायाभूत सुविधा, बहुविध लॉजिस्टिक, आणि भविष्यकालीन सागरी पर्यावरणाची निर्मिती यावर भर देण्यात आला आहे.

या चर्चेत भारताच्या जागतिक सागरी केंद्र व उदयोन्मुख दळणवळण शक्ती म्हणून होत असलेल्या भूमिकेचा उल्लेख झाला. यामध्ये हरित बंदर विकास, बहुविध दळणवळण सुविधा आणि डिजिटल पायाभूत रचनेद्वारे आंतरराष्ट्रीय व्यापार वृद्धीवर लक्ष केंद्रित केले जात आहे.

संवाद सत्रादरम्यान केंद्रीय मंत्री श्री. सर्बानंद सोनोवाल म्हणाले, “आजचा भारत समावेशक, नाविन्यपूर्ण आणि शाश्वत विकासाची प्रभावी गाथा  मांडतो.”

ब्लू एमबीए गटात जागतिक सागरी व  दळणवळण व्यवस्थापन  क्षेत्रातील वरिष्ठ व्यावसायिक आणि माजी विद्यार्थी यांचा समावेश आहे. त्यांचा मंत्र्यांसोबतचा संवाद भारतातील सागरी पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक शक्यता, सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून येणाऱ्या संधी, आणि हरित जहाजबांधणीसाठी सरकारच्या प्रोत्साहन धोरणावर केंद्रित होता.

पुढे बोलताना सोनोवाल म्हणाले, “हरित सागरी तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर असलेल्या डेन्मार्कने ऊर्जा कार्यक्षमता, नवप्रवर्तन व डिजिटल समुद्री वाहतूकसारख्या बाबतीत जागतिक मानदंड निर्माण केले आहेत.”

मंत्र्यांनी भारताच्या व्यापार वृद्धी व औद्योगिक विकासामुळे वाढलेल्या कार्यक्षम आणि शाश्वत समुद्री वाहतुकीच्या मागणीवर भर दिला. त्यांनी भारत सरकारच्या सागरी शिक्षणातील गुंतवणुकीचा उल्लेख केला. यामध्ये  जसे की भारतीय सागरी विद्यापीठ आणि गुजरात सागरी विद्यापीठ या संस्था केवळ खलाशी प्रशिक्षणापुरत्या न राहता दळणवळण व्यवस्थापन, सागरी पर्यटन , हरित इंधन, बंदर व्यवस्थापन आणि जहाज पुनर्नवीनीकरण यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये जागतिक दर्जाचे कुशल मनुष्यबळ तयार करत असल्याचे त्यांनी नमुद केले. भारताचे सागरी कार्यबल 2047 पर्यंत 7.86 दशलक्षावरून जवळपास 40 दशलक्ष पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. या बरोबरच महिला खलाशांची संख्या 2014 मध्ये 1,699 वरून 2024 मध्ये 7,000 पेक्षा अधिक झाल्याने विविधता आणि समावेशकतेवर देण्यात आलेला भर दिसून येतो.

सीबीएसच्या प्राध्यापकांनी भारताच्या सागरी धोरण सुधारणा आणि आग्नेय आशिया, मध्यपूर्व व युरोप यांच्यातील भारताच्या वाढत्या महत्त्वाच्या दुव्याची प्रशंसा केली. या कार्यक्रमामुळे भारत व डेन्मार्क यांच्यातील हरित जहाजबांधणी, स्वच्छ ऊर्जा आणि शाश्वत विकास या क्षेत्रांतील सहकार्य बळकट झाल्याचे अधोरेखित झाले. या शिवाय जागतिक शैक्षणिक व व्यावसायिक संस्थांशी भारताचे वाढते संबंधही अधोरेखित झाले.

***

N.Chitale/N.Gaikwad/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2134938)
Read this release in: Assamese , English , Hindi , Tamil