नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत आणि नॉर्वेमध्ये हरित सागरी तंत्रज्ञानाला बळ देण्यावर द्विपक्षीय चर्चा


भारताने नॉर्वेसोबत उत्तर सागरी मार्ग कार्यान्वित करण्यासंबंधी संयुक्त व्यवहार्यता अभ्यास राबवण्याची दर्शविली तयारी

नॉर्वेचे परिवहन मंत्री वाहतूक मंत्री योन-इवार न्येगोओर्ड् यांच्यासोबत केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची प्रवासी जलवाहतुकीच्या विद्युतीकरण क्षेत्रातील कौशल्याशी संबंधित नॉर्वेकडील ज्ञानसंपन्नतेच्या शक्यतांवर केली चर्चा

केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल आणि मंत्री मरियाने सीवर्टसन यांच्यात जहाज पुनर्वापर, शाश्वत मत्स्यव्यवसाय आणि महासागरीय नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील परस्पर सहकार्याच्या मुद्यावर चर्चा

Posted On: 04 JUN 2025 10:01PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 जून 2025

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज नॉर्वेची राजधानी ओस्लो इथे झालेल्या नॉर्वे-शिपिंग या कार्यक्रमाच्या निमित्ताने नॉर्वेचे वाहतूक मंत्री योन-इवार न्येगोओर्ड् तसेच मत्स्यव्यवसाय आणि महासागर धोरण मंत्री मरियाने सीवर्टसन यांच्यासोबत बैठका घेतल्या. भारत आणि नॉर्वे मधील सागरी संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने नॉर्वे सोबत विविध क्षेत्रांमध्ये सहकार्यपूर्ण भागिदारीच्या शक्यता तपासून पाहण्याच्या उद्देशाने त्यांनी या दोन्ही नेत्यांसोबत चर्चा केली.  

योन-इवार न्येगोओर्ड् यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सर्बानंद सोनोवाल यांनी हरित सागरी तंत्रज्ञानाचा (Green Maritime Technologies) अवलंब वाढवण्याच्या प्रयत्नांसदर्भात चर्चा केली. भारताच्या सागरी क्षेत्राचे हरितीकरण आणि शाश्वत दृष्टिकोनातून आधुनिकीकरण करण्याच्या नव्या प्रयत्नाची माहिती त्यांनी  न्येगोओर्ड् यांना दिली. हरित सागरी मालवाहतूक आणि डिजिटल परिवर्तनाशी संबंधित भारताचे उपक्रमही त्यांनी नमूद केले. नॉर्वेने प्रवासी जल वाहतूकीच्या विद्युतीकरणाशी संबंधित राबवलेल्या आणि अंमलबजावणी केलेल्या यशस्वी उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर, दोन्ही नेत्यांनी या क्षेत्रात  परस्पर सहकार्य वाढवण्यावर तसेच अनुभवांची देवाणघेवाण करण्यावर सहमती व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली, भारत 'मेरिटाइम इंडिया व्हिजन 2030' आणि 'मेरिटाइम अमृतकाल व्हिजन 2047' हे उपक्रम राबवत असून, त्याअंतर्गत अंतर्गत बंदरविषयक पायाभूत सुविधा, हरित सागरी मालवाहतूक, जहाजबांधणी आणि डिजिटलायझेशनमध्ये प्रगती करत असल्याचे सर्बानंद सोनोवाल यांनी या बैठकीत सांगितले. सार्वजनिक-खाजगी क्षेत्राची भागीदारी  आणि हरित ऊर्जेच्या एकात्मिकीकरणाचा लाभ घेत, भारत आपल्या बंदरांना जागतिक गुंतवणूक केंद्रांमध्ये रूपांतरित करण्याचे महत्त्वाकांक्षी अभियान राबवत असल्याचे त्यांनी सांगितले. भारताची बंदरे म्हणजे केवळ व्यापाराची प्रवेशद्वारे नाहीत तर ती स्वच्छ ऊर्जा वापराच्या दिशेने सुरु असलेल्या परिवर्तनाचे कारक घटक बनत असल्याचे सांगितले. ही बंदरे अपतटीय पवन ऊर्जा (offshore wind), हरित हायड्रोजन आणि कमी कार्बन उत्सर्जनाच्या व्यवसायविषयक दळवळणीय व्यवस्था अर्थात लॉजिस्टिकसाठी कामी येत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी दोन्ही नेत्यांनी हरित तटीय सागरी मालवाहतूक कार्यक्रम (Green Coastal Shipping Programme) आणि हरित सारगी वाहतूक 2050 (Green Voyage 2050) च्या आधारे भारत आणि नॉर्वेमधील हरित सागरी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात गहीऱ्या सहकार्यपूर्ण भागिदारीसंबंधीही चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी स्मार्ट लॉजिस्टिक्स, डिजिटल बंदर परिसंस्था, द्रवरुप नैसर्गिक वायू इंधन, हायड्रोजन आणि इलेक्ट्रिक प्रोपल्शन सारख्या पर्यायी इंधनांच्या बाबतीत संयुक्त प्रयत्नांच्या शक्यतांवरही चर्चा केली. भारताचा मैत्री हा उपक्रम आणि नॉर्वेचे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान संचालित बंदर व्यवस्थापन , डिजिटल ट्विन्स तसेच पर्यायी इंधन क्षेत्रामधील कौशल्याच्या माध्यमातून शाश्वत सारगी अर्थात नील अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी सर्वोत्तम समन्वयाची संधी असल्याच्या मुद्यावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

या संदर्भातील भारत आणि नॉर्वेमधील संयुक्त उपक्रमही सर्बानंद सोनोवाल यांनी अधोरेखित केले. भारत हरीत सागरी मालवाहतूक, ग्रीन टग ट्रान्झिशन अर्थात टो बोट्सचे हरित तंत्रज्ञानाच्या दिशेने संक्रमण, ई-मिथेनॉल बंकरिंग आणि हायड्रोजन-चलित जहाजांवर मोठ्या प्रमाणावर काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले. या क्षेत्राशी संबंधित भविषायतील जागतिक मागणीची पूर्तता करण्याच्या उद्देशाने भारत आणि नॉर्वेमधील भागीदारी पुढे सुरू ठेवली जाऊ शकते, तसेच इलेक्ट्रिक प्रवासी बोटी आणि जहाजांची बांधणीही केली जाऊ शकते अशी शक्यताही त्यांनी मांडली. भारताच्या समृद्ध आणि विस्तीर्ण अंतर्गत जलमार्गांची पुरेपूर वापर करण्यासाठी जल प्रवासी वाहतुकेच्या विद्युतीकरणासंबंधी सर्वोत्तम कार्यपद्धतींसाठी भारत नॉर्वेसोबत भागीदारी करायला उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे मालवाहतूक तसेच प्रवासी वाहतूक सुरळीत करण्याच्या उद्देशाने कार्बन उत्सर्जनमुक्त आणि कार्यक्षम वाहतूक व्यवस्था स्थापित करण्याच्या दोन्ही देशांच्या परस्पर सामायिक ध्येयाला आणखी बळ मिळेल असे सोनोवाल म्हणाले.

नॉर्वेच्या मत्स्यव्यवसाय आणि महासागर धोरण मंत्री मारियान सिव्हर्टसेन नेस आणि केंद्रीय मंत्री सोनोवाल यांच्याबरोबर झालेल्या द्विपक्षीय बैठकीत त्यांनी जहाज पुनर्वापर, नाविकांचे प्रशिक्षण, शाश्वत मत्स्यव्यवसाय आणि महासागर व्यवस्थापन, महासागर नवीकरणीय ऊर्जा आणि ऑफशोअर हायड्रोकार्बन्स या क्षेत्रातील शक्यता आणि संधींवर चर्चा केली.

दोन्ही देशांमधील दीर्घकालीन सहकार्य हे सामायिक मूल्ये, परस्पर आदर आणि शाश्वत विकासासाठी अतूट वचनबद्धतेचे प्रतिबिंब असल्याचे दोन्ही नेत्यांनी अधोरेखित केले. “सागरी क्षेत्रात आणि त्यापलीकडे जाऊन इतर अनेक क्षेत्रात नॉर्वे भारताचा एक मौल्यवान भागीदार आहे” असे भारत आणि नॉर्वे यांच्यातील विशेष संबंध व्यक्त करताना सर्वानंद सोनोवाल म्हणाले. आपले दीर्घकालीन सहकार्य सामायिक मूल्ये, परस्पर आदर आणि शाश्वत विकासासाठी मजबूत वचनबद्धता प्रतिबिंबित करते, असेही ते म्हणाले. अलिकडचा EFTA-भारत व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि आपल्या मजबूत आर्थिक सहकार्याची पुष्टी करतो” हे सोनोवाल यांनी अधोरेखित केले.

भारत आणि नॉर्वे जहाजबांधणी सहकार्याचा वारसा सामायिक करतात. नॉर्वेच्या अत्याधुनिक जहाज डिझाइन कौशल्याचा आणि भारताच्या मजबूत शिपयार्ड क्षमतेचा उपयोग करून जागतिक दर्जाची, पर्यावरणपूरक जहाजांचे संयुक्तपणे उत्पादन करण्यासाठी दोन्ही देशांनी सहमती दर्शविली. यामुळे शाश्वत सागरी वाहतुकीत क्रांतिकारी बदल घडवून आणण्यासाठी चालना मिळेल. जहाज पुनर्वापर क्षेत्रावरील चर्चांमध्ये कौशल्य आणि हरित तंत्रज्ञानाचा उपयोग करून शाश्वत जहाज विकसन पद्धतीनं प्रोत्साहन देण्यावर या चर्चेत भर देण्यात आला. यासाठी पर्यावरण, आरोग्य आणि सुरक्षा मानकांमध्ये सुधारणा करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. गुजरातमधील अलंग जहाज पुनर्वापर यार्डचा अशा उपक्रमांसाठी संभाव्य स्थळ म्हणून विशेष उल्लेख करण्यात आला. 

“भारत आणि नॉर्वे नील अर्थव्यवस्थेत देखील एक मजबूत आणि वाढत जाणारी भागीदारी सामायिक करतात. ही भागीदारी शाश्वत महासागर व्यवस्थापन आणि आर्थिक वाढीसाठी सागरी संसाधनांचा विशेषतः नवीकरणीय ऊर्जा, सागरी तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासात वापर करण्याच्या परस्पर हितसंबंधांच्या सामायिक दृष्टिकोनावर वाटचाल करते.” असेही सोनोवाल यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्र्यांनी सागरी क्षेत्रात लिंगभाव विविधतेसाठी भारताच्या वचनबद्धतेची पुष्टी केली. महिला खलाशांच्या वाढती संख्या आणि लिंगभाव-समान परिसंस्था तयार करण्यासाठी 'सागर में सम्मान' उपक्रमाच्या प्रारंभावर प्रकाश टाकला. सोनोवाल यांनी खलाशांना विशेषतः ध्रुवीय पाण्यात, सायबर सुरक्षा आणि प्रगत सागरी कौशल्ये प्रदान करण्यात प्रशिक्षण देऊन मानवी भांडवल उभारणीसाठी नॉर्वेनी सहकार्य करावे असे आवाहन केले. नील अर्थव्यवस्थेच्या विशाल क्षमतेवर भर देत सर्बानंद सोनोवाल यांनी नॉर्वेजियन कंपन्यांना पर्यावरणीय उद्दिष्टांशी आणि भारताच्या वाढत्या सागरी महत्त्वाकांक्षांशी सुसंगत असणाऱ्या, महासागरातील नवीकरणीय ऊर्जा - विशेषतः पवन आणि भरती-ओहोटी आधारित ऊर्जा - शाश्वत मत्स्यसंवर्धन आणि खोल समुद्रातील अन्वेषण या क्षेत्रात संयुक्त उपक्रमांचा शोध घेण्याचे आमंत्रण दिले. 

भारताने नॉर्दर्न सी रूट (NSR) कार्यान्वित करण्यासाठी नॉर्वेजियन आणि भारतीय संस्थांसह संयुक्त व्यवहार्यता अभ्यास करण्याचा प्रस्ताव मांडला. आर्क्टिक क्षेत्रातील नौवहनांमध्ये नॉर्वे सोबत सहयोग करण्याषाबत भारताने आपली उत्सुकता व्यक्त केली असून यामध्ये आर्टिक नौवहन संदर्भातील संशोधन आणि विकास, बर्फाळ समुद्रासाठी योग्य जहाजांची रचना आणि बांधणी तसेच नववहन तंत्रज्ञानाच्या प्रगती संदर्भातील सहकार्याचा समावेश आहे. हा अभ्यास आर्क्टिक समुद्राच्या पाण्यात सुरक्षित आणि शाश्वत नौवहन पद्धती सुनिश्चित करण्यावर, प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या असामान्य ऑपरेशनल आव्हानांना तोंड देण्यावर आणि पर्यावरणीय परिणाम कमी करण्यावर लक्ष केंद्रित करेल.

भारत आणि नॉर्वे एक शाश्वत आणि समावेशी जागतिक सागरी व्यवस्था निर्माण करण्यासाठी एकत्र काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ आणि ‘नील अर्थव्यवस्थे’द्वारे प्रेरित आर्थिक वाढीच्या दृष्टिकोनातून, नवोन्मेष, शाश्वतता आणि परस्पर लाभदायक उपक्रमांना चालना देण्यासाठी आपल्या भागीदारीत प्रचंड संधी आहेत. आपले द्विपक्षीय सहकार्य सध्या जोमात असून, सागरी सहकार्य अधिक दृढ करण्याच्या आपल्या सहमतीमुळे हे संबंध आणखी मजबूत होतील, असा विश्वास आहे, असे सोनोवाल म्हणाले. “आजच्या चर्चेतील मुद्दे कृतीमध्ये रूपांतरित करण्यासाठी आपण एकत्रितपणे काम करू,” असेही सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितले.

 

 

S.Patil/T.Pawar/S.Mukhedkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2133978)