सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक परिषदेच्या चौथ्या बैठकीत वृद्ध कल्याण आणि सक्षमीकरणासाठी आराखडा
Posted On:
04 JUN 2025 7:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जून 2025
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक परिषदेची चौथी बैठक झाली. विद्यमान योजनांचा आढावा घेणे, उदयोन्मुख गरजांवर चर्चा करणे आणि विकसित भारत @2047 च्या दृष्टिकोनाशी सुसंगत भविष्यकालीन कृती कार्यक्रम निश्चित करणे, यासाठी या बैठकीने एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ म्हणून काम केले. देशातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिक सन्मानाने, आदराने आणि समाजात सक्रिय सहभागाने जगेल, याची खात्री करण्याच्या महत्त्वावर परिषदेने भर दिला.

बैठकीत, परिषदेने राष्ट्रीय वयोश्री योजना (आरव्हीवाय) आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एकात्मिक कार्यक्रम (IPSrC), ज्येष्ठ नागरिक पोर्टल अंतर्गत गुणवत्ता वाढवणे, वितरणानंतरचा पाठपुरावा आणि ज्येष्ठ नागरिकांच्या डिजिटल समावेशाचा समावेश करण्यासाठी व्याप्ती वाढवणे या संदर्भातील प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. लोकसंख्याशास्त्रीय वास्तव प्रतिबिंबित करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय धोरण (NPSC) वर चर्चा झाली - विशेषतः 2047 पर्यंत भारतातील लोकसंख्येच्या 20% वृद्धांची संख्या असेल,असा अंदाज आहे.
परिषदेने समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा गैर मार्गाने घेतला जाणारा फायदा आणि त्यांच्याकडे होणारे दुर्लक्ष दूर करण्यासाठी समर्पित तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करण्याबाबात चर्चा केली. देशभरातील वृद्धाश्रमांनी आणि ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थांनी किमान मानकांची अंमलबजावणी करण्यासाठी, तसेच समुदाय सहभाग आणि दोन पिढ्यांमध्ये चांगले संबंध प्रस्थापित व्हावेत यासाठी प्रोत्साहन देण्याचे धोरण तयार करण्यासाठी, अंमलबजावणीमध्ये आणि अभिप्राय यंत्रणेमध्ये स्वयंसेवी संस्था आणि ज्येष्ठ नागरिक संघटनांचा सहभाग संस्थात्मक करण्यावर अधिक भर देण्यात आला जेणेकरून शेवटच्या टप्प्यापर्यंत वितरण आणि संदर्भात्मक प्रासंगिकता सुनिश्चित होईल.
या आणि परिषदेच्या मागील बैठकींमधून पुढे आलेल्या आणि वारंवार येणाऱ्या विषयांमध्ये वृद्धांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आंतर-मंत्रालयीन एकत्रीकरणाची तातडीची गरज व्यक्त करण्यात आली. वृद्ध कल्याणासाठी तंत्रज्ञानाचा वापर, केंद्रीकृत डेटा प्रणाली आणि कल्याणापासून सक्षमीकरणाकडे व्यापक तात्विक बदल - भारताच्या विकास प्रवासात वृद्धांना सक्रिय भागधारक म्हणून स्थान देणे यांचा समावेश होता.
विद्यमान योजनांच्या कामगिरीचा आढावा -
गेल्या वर्षभरात, मंत्रालयाने ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणाला चालना देण्यासाठी अनेक प्रभावी उपक्रम हाती घेतले आहेत. आरव्हीवाय अंतर्गत, 371 जिल्ह्यांमधील 5 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना मोफत सहाय्यक राहणीमान उपकरणे मिळाली. ‘ALIMCO’ च्या भागीदारीने आयोजित केलेल्या शिबिरांमध्ये जागेवरच वैद्यकीय मूल्यांकन आणि उपकरणांचे वितरण समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे वृद्धांना सुलभतेने उपकरणे मिळतात आणि त्यांचे जीवनमान सुधारते.
आयपीएसआरसी द्वारे, मंत्रालयामार्फत दक्षता गृह, फिजिओथेरपी केंद्रे, वृद्धाश्रम आणि फिरते वैद्यकीय केंद्रे चालवणाऱ्या 708 हून अधिक स्वयंसेवी संस्थांना मदत केली जात आहे. गेल्या पाच वर्षांत सुमारे 2.24 लाख ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य तपासणी, फिजिओथेरपी, समुपदेशन आणि मनोरंजनात्मक उपक्रमांसह विविध सेवांचा लाभ घेतला आहे. त्यामुळे त्यांचे शारीरिक, भावनिक आणि मानसिक आरोग्यामध्ये सुधारणा झाली.
आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन (IDOP) 2024 देशभरात 2.5 लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांच्या सहभागाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये सांस्कृतिक सादरीकरणे, डिजिटल साक्षरता कार्यशाळा, आंतरपिढी संवाद आणि आरोग्य जागरूकता शिबिरे यांचा समावेश होता. सार्वजनिक जीवनात ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आणि समाजात त्यांच्याप्रति आदर वाढवण्यासाठी एक व्यासपीठ तयार करणे, हे या कार्यक्रमांचे उद्दिष्ट होते.
मंत्रालयाने 'आराधना' या अनोख्या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील केले होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांनी आपली अफाट प्रतिभा आणि चैतन्य प्रदर्शित केले. 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या 100 हून अधिक ज्येष्ठ कलाकारांनी शास्त्रीय संगीत, लोकनृत्य आणि नाटकांचे मंचावर सादरीकरण करून वृद्धत्व ही मर्यादा नसून अनुभव, सर्जनशीलता आणि आजीवन योगदानाचा उत्सव आहे या संदेशाचा पुनरुच्चार केला.
याव्यतिरिक्त, ज्येष्ठ नागरिकांवर होणारे अत्याचार, त्यांचे कायदेशीर हक्क आणि त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या कल्याणकारी योजनांचा लाभ यात येणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 500 हून अधिक जागरूकता आणि संवेदनशीलता कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या. ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचण्याच्या या प्रयत्नांचा लाभ त्यांची काळजी घेणारे लोक आणि तरुणांसह तीन लाखांहून अधिक नागरिकांनी घेतला. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची समुदाय-आधारित काळजी मजबूत करणे आणि वृद्धत्वाशी संबंधित आव्हानांबद्दल जागरूकता निर्माण करणे यांचा समावेश होता.
2 मे 2025 रोजी राष्ट्रपती भवनात आयोजित 'एजिंग विथ डिग्निटी' या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या अनेक प्रमुख उपक्रमांचा प्रारंभ केला. राष्ट्रपतींनी यावेळी ज्येष्ठ नागरिक कल्याण पोर्टलचे उद्घाटन केले. हे पोर्टल म्हणजे सरकारी योजना, आरोग्यसेवा लाभ, कल्याणकारी सेवा आणि संबंधित कार्यक्रमांवरील अद्यतने यांच्याद्वारे ज्येष्ठ नागरिकांना सक्षम बनविण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेले एक व्यापक डिजिटल व्यासपीठ आहे.
याव्यतिरिक्त, राष्ट्रपतींनी तवांग (अरुणाचल प्रदेश), वोखा (नागालंड), वेल्लोर (तामिळनाडू), अनकापल्ली (आंध्र प्रदेश) आणि नैनीताल (उत्तराखंड) येथे असलेल्या पाच नवीन ज्येष्ठ नागरिक गृहांचे दूरदृश्य प्रणालीमार्फत उद्घाटन केले.देशभरातील गरीब ज्येष्ठ नागरिकांसाठी राहण्यासाठी सुरक्षित, प्रेमळ आणि सन्मानजनक वातावरण प्रदान करण्याच्या उद्देशाने ही गृहे तयार करण्यात आली आहेत.
तरुण आणि वृद्ध दोन्ही पिढ्यांसाठी मानसिक आरोग्य, सजगता आणि आध्यात्मिक समृद्धी यांना प्रोत्साहन देण्यासाठी, सामाजिक न्याय तसेच सक्षमीकरण विभाग आणि ब्रह्माकुमारी संघटना यांच्यात एक सामंजस्य करार देखील करण्यात आला.
'विकसित भारत @2047' च्या दृष्टिकोनाकडे देश सातत्याने वाटचाल करत असताना, ज्येष्ठ नागरिकांचे आवाज आणि ज्ञान मागे राहून चालणार नाही - ते या गटाचे नेतृत्व करतील. मंत्रालयाचे प्रयत्न केवळ ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्याबाबत नाहीत, तर त्यांनी आयुष्यभर दिलेल्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आहेत.वृद्धत्वाकडे आयुष्याचा शेवट म्हणून पाहिले जाऊ नये तर त्याकडे सहभाग, उद्देश आणि अभिमानाचा एक नवीन अध्याय म्हणून पाहिले जावे, याची खात्री करण्याबाबत मंत्रालय प्रयत्नशील आहे.

S.Patil/S.Bedekar/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2133926)