अंतराळ विभाग
azadi ka amrit mahotsav

भारतीय अंतराळवीर ग्रॅप कॅप्टन शुभांशू शुक्ला अवकाशातील ‘एक्स्ट्रीमोफाइल्स – टार्डिग्रेड्स’ - चे पुनरुज्जीवन आणि अस्तित्व तपासणार


"आंतरराष्ट्रीय मोहिमेतील भारतीय अंतराळवीराचा सक्रिय सहभाग आणि निश्चित भूमिका; ही राष्ट्रीय अभिमानाची गोष्‍ट”: केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह

Posted On: 03 JUN 2025 8:29PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 जून 2025

 

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अवकाश राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज जाहीर केले की,  ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला अवकाशातील शारीरिक, संज्ञानात्मक आणि शारीरिक प्रतिक्रियांचा तसेच सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात सतत इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले वापरण्याच्या परिणामांचा अभ्यास करतील, जो भविष्यातील दीर्घकालीन अंतराळ मोहिमांसाठी एक महत्त्वाचा पैलू आहे.

याशिवाय त्यांनी सांगितले की ग्रुप कॅप्टन शुक्ला टार्डिग्रेड्स सारख्या एक्स्ट्रीमोफाइल्स प्राण्यांचे पुनरुज्जीवन, निभाव आणि पुनरुत्पादन याविषयी प्रयोग करतील.

मोहिमेचे महत्त्व अधोरेखित करताना मंत्री म्हणाले, "या आंतरराष्ट्रीय मोहिमेत एक भारतीय अंतराळवीर सक्रियपणे सहभागी आहे आणि त्याच्यावर वैज्ञानिक जबाबदाऱ्या आहेत ही राष्ट्रीय अभिमानाची बाब आहे.”

गगनयान या भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेसाठी निवडलेल्या चार अंतराळवीरांपैकी ग्रुप कॅप्टन शुक्ला हे प्रशांत नायर, अंगद प्रताप आणि अजित कृष्णन यांच्यासह एक आहेत. ग्रुप कॅप्टन पी.बी. नायर यांना अ‍ॅक्सिओम-4 मोहिमेसाठी राखीव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

भारताची पहिली मानवासह अंतराळ यान मोहीम  गगनयानबाबत  बोलताना डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की,  सध्या या मोहिमेची चाचणी प्रक्रिया सुरू आहे. ही मोहीम 2027 च्या सुरुवातीला पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. अशा प्रकारच्या  अंतराळगमनाचे प्रयोग भारताच्या अंतराळ क्षेत्रातील महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे सांगून ते म्हणाले की,  यामुळे भारत अंतराळ क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी मदत होईल.

डॉ. सिंह यांनी मानवासह यान पाठवून,  अवकाश आणि खोल समुद्र संशोधन यासाठी सरकार  वचनबद्ध असल्याचे सांगितले. भारतीय किनाऱ्यालगत मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती असूनही सागरी अर्थव्यवस्था अद्याप पूर्णतः कार्यक्षम नाही. खोल समुद्र अभियान सागरी क्षमतेचा उपयोग करण्यासाठी राबविले जात आहे, असे त्यांनी नमूद केले.

नागरी हवाई वाहतुकीबाबत, डॉ. सिंह म्हणाले की , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली उपाय योजनांमुळे हवाई प्रवास सर्वसामान्य नागरिक आता सहजतेने करू शकतात. अनेक नवीन विमानतळांचे उद्घाटन  झाले असून विमानचालकांना वाढती मागणी आहे. यासाठी सीएसआयआर-एनएएलने दोन-आसनी प्रशिक्षक विमान विकसित केले असून खाजगी क्षेत्राच्या सहयोगाने इलेक्ट्रिक हंसा- (ई-हंसा) -चे उत्पादन वाढविण्याचे काम सुरू आहे.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केले की,  हे सर्व उपक्रम भारतीय वैज्ञानिक प्रगतीच्या नव्या युगाचे प्रतीक आहेत. यामुळे भारताचे जागतिक अंतराळ मोहिमांमधील सक्रिय योगदान आणि आत्मनिर्भरता आणि  तंत्रज्ञानातील नेतृत्वाकडे वाटचाल स्पष्टपणे दिसून येते.

 

* * *

S.Bedekar/Reshma/Nandini/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2133654)