कृषी मंत्रालय
देशभरात 'क्लीन प्लांट'चे 9 प्रकल्प सुरू केले जाणार असून, त्यापैकी 3 प्रकल्प महाराष्ट्रात - केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान
देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय कृषी हॅकथॉनचा केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत पुण्यात समारोप
Posted On:
03 JUN 2025 6:17PM by PIB Mumbai
मुंबई/पुणे, 3 जून 2025
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान आज पुणे इथे आयोजित भारतातल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकॅथॉनच्या समारोप सत्रात सहभागी झाले होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. सध्याच्या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कृषी क्षेत्रासमोर अनेक समस्या आहेत, त्यावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हाच एकमेव उपाय असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पुणे ॲग्री हॅकॅथॉनमधील उपयुक्त तंत्रज्ञानाचे इन्क्युबेशन करून ते थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील ही क्रांती पुढे नेली तर त्यामुळे शेतीची उत्पादकता वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
15PN.jpeg)
केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी देखील उपस्थितांना संबोधित केले. हॅकेथॉनमध्ये सहभागी झालेल्यांनी दाखवलेल्या नवोन्मेषाचे आणि त्यांच्या उत्साहाचे त्यांनी कौतुक केले. फलोत्पादन क्षेत्रात महाराष्ट्राने दिलेल्या महत्त्वाच्या योगदानाची त्यांनी प्रशंसाही केली.
महाराष्ट्र हे देशाचे फलोत्पादन (Horticulture) केंद्र म्हणून उदयाला आले आहे, सरकारचे प्रयत्न आणि इथल्या शेतकऱ्यांच्या मेहतीने साधलेल्या प्रगतीतून संपूर्ण देशाला दिशा दाखवली असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रातील द्राक्ष, डाळिंब, संत्री, चिकू आणि विविध भाज्यांच्या अद्भुत उत्पादनासाठी त्यांनी राज्याचे अभिनंदनही केले.
फलोत्पादन क्षेत्रात लागवडीसाठी मिळणारी रोपं रोगमुक्त आणि उत्पादनक्षम असतात की नाही याची शाश्वती नसते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार 'क्लीन प्लांट' कार्यक्रम सुरू करणार असल्याची महत्त्वाची घोषणा त्यांनी केली. या कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना मिळणारी रोपे रोगमुक्त असल्याची सुनिश्चिती केली जाईल. देशभरात 'क्लीन प्लांट'चे 9 प्रकल्प सुरू केले जाणार असून, त्यापैकी 3 प्रकल्प महाराष्ट्रात 300 कोटी रुपये खर्चून उभारले जातील असे त्यांनी सांगितले. याअंतर्गत द्राक्षासाठी पुण्यात, संत्र्यासाठी नागपूरमध्ये आणि डाळिंबासाठी सोलापूरमध्ये प्रकल्प सुरू केला जाणार असल्याचे ते म्हणाले. या प्रकल्पांसोबतच, अत्याधुनिक रोपवाटिकाही तयार केल्या जाणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली. शेतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्यांना या रोपवाटिकांसाठी सहकार्य केले जाईल. मोठ्या रोपवाटिकांसाठी 3 कोटी रुपये, तर मध्यम आकाराच्या रोपवाटिकांसाठी दीड कोटी रुपयांची मदत दिली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. या रोपवाटिकांच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना 8 कोटी रोगमुक्त रोपे उपलब्ध होतील, यामुळे महाराष्ट्राचे फलोत्पादन जगासोबत स्पर्धा करू शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा कार्यक्रम राबवण्यासाठी इस्रायल आणि नेदरलँड्ससारख्या देशांचेही सहकार्य घेतले जाणार असल्याचे शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले.
R4L6.jpeg)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या विकसित भारताच्या संकल्पाचा पुनरुच्चार त्यांनी केला. मात्र विकसित शेती आणि समृद्ध शेतकऱ्याशिवाय हा संकल्प प्रत्यक्षात साकार होऊ शकत नाही असे ते म्हणाले. शेतकऱ्यांना शेतीतून लाभ मिळवण्यासाठी प्रति हेक्टर उत्पादन वाढवणे, उत्पादन खर्च कमी करणे, कृषी उत्पादनांना योग्य भाव मिळवून देणे आणि नुकसानीच्या भरपाईची व्यवस्था करणे या उपाययोजना आवश्यक असल्याची बाबही त्यांनी नमूद केली.
चांगली बियाणे निर्माण करण्यासाठी, उत्पादन वाढवण्यासाठी आणि रोगांचे निदान करण्यासाठी वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये काम करतात. मात्र त्यांचे संशोधन योग्य वेळेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. ही दरी भरून काढण्यासाठी 'लॅब टू लँड' म्हणजेच वैज्ञानिक आणि शेतकऱ्यांना एकत्र आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी देशभरातील 16 हजार वैज्ञानिक प्रयोगशाळांमधून बाहेर पडून केंद्र सरकारच्या कृषी विभागासोबत प्रत्यक्ष शेतकऱ्यांसोबत काम करतील, असा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. विज्ञान आणि शेतकरी एकत्र आले आणि त्यांना राज्य सरकार तसेच कृषी विद्यापीठांचे सहकार्य मिळाले तर कृषी क्षेत्रात चमत्कार घडून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

युवा वर्ग कृषी क्षेत्रात येऊ इच्छित नाही ही चूकीची धारणा पसरली आहे. मात्र युवा वर्गाने आपले कौशल्य वापरून कृषी क्षेत्रात यावे आणि स्टार्टअप सुरू करावेत असे आवाहन त्यांनी केले. हवामान बदलामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी त्याच्याशी जुळवून घेणारी बियाणांची वाणं विकसित करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी सरकार कोणतीही कसर सोडणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.
भारताच्या नागरिकांचे पोट भरून जगभरात आपली कृषी उत्पादने निर्यात करण्याचे आणि भारताला जगाचे खाद्यान्नाचे भांडार म्हणून ओळख मिळवून देण्याचा संकल्पही त्यांनी मांडला. यात महाराष्ट्राची महत्त्वाची भूमिका असेल असे ते म्हणाले. शेतकऱ्यांनी आपली शेती विकसित करून विकसित भारताच्या वाटचालीत योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.
4QJ6.jpeg)
या कार्यक्रमादरम्यान हॅकेथॉनमध्ये सहभागी झालेल्या स्टार्टअप, कृषी नवोद्योजक आणि उपक्रमशील शेतकऱ्यांमधून कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता, मृदा, सिंचन आणि मृदा आरोग्य व्यवस्थापन, कृषी यांत्रिकीकरण, खतसिंचन आणि रोग कीड व्यवस्थापन, पीक काढणी उत्तर तंत्रज्ञान आणि अवशेष व्यवस्थापन, कृषी अर्थशास्त्र बाजार जोडणी, इतर कोणतीही नवकल्पना या विभागाअंतर्गतच्या विजेत्यांना केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याहस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. यासोबतच या हॅकेथॉनसाठी मुख्य परीक्षक, परीक्षकांचा आणि ज्ञानविषयक भागिदारांचाही कृषीमंत्र्यांच्या हस्ते सन्मान केला गेला.
* * *
PIB Mumbai | S.Tupe/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2133605)