विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी भारत जेन शिखर परिषदेत भारतीय भाषांसाठी स्वदेशात विकसित, सरकारी निधीच्या पाठबळावर एआय आधारित पहिल्यावहिल्या मल्टीमोडल एलएलएम ‘भारत जेन’ चा केला शुभारंभ
नैतिक, समावेशक, बहुभाषिक आणि भारतीय मूल्ये आणि सिद्धातांमध्ये रुजलेली कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली निर्माण करणारी भारतजेन ही एक राष्ट्रीय मोहीम आहेः डॉ. जितेंद्र सिंह
Posted On:
02 JUN 2025 10:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 जून 2025
स्वदेशी बनावटीने भारतीय भाषांसाठी सरकारी निधीच्या पाठबळाने, विकसित केलेल्या एआय आधारित पहिल्यावहिल्या मल्टीमोडल लार्ज लँग्वेज मॉडेल (एलएलएम) भारत जेनचा केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी प्रतिष्ठेच्या भारतजेन शिखर परिषद या भारताच्या सर्वात मोठ्या जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि एलएलएम शिखर परिषद आणि हॅकॅथॉनमध्ये प्रारंभ केला.
इंटरडिसिप्लिनरी सायबर-फिजिकल सिस्टिम्सवरील राष्ट्रीय अभियान (NM-ICPS) अंतर्गत विकसित केलेल्या आणि आयआयटी बॉम्बे येथील टीआयएच फाउंडेशन फॉर आयओटी आणि आयओई द्वारे कार्यान्वित केलेल्या 'भारत जेन'चे भारताच्या भाषिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात एआयच्या विकासात क्रांती घडवण्याचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमाला विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे पाठबळ असून, प्रमुख शैक्षणिक संस्था, तज्ञ आणि नवोन्मेषकारांचा एक बळकट समूह यासाठी एकत्र आला आहे.

या परिषदेत बोलताना डॉ. जितेंद्र सिंह यांनी भारतजेन म्हणजे नैतिक, समावेशक, बहुभाषिक आणि भारतीय मूल्ये आणि सिद्धातांमध्ये रुजलेली कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली निर्माण करणारी एक राष्ट्रीय मोहीम असल्याचे सांगितले. या मंचावर मजकूर, भाषण आणि प्रतिमांचे एकत्रीकरण करता येते, ज्यामुळे 22 भारतीय भाषांमध्ये विनासायास एआय आधारित समस्यांवरील उत्तरे(सोल्युशन्स) उपलब्ध होतात.
“ या उपक्रमामुळे आरोग्यसुविधा, शिक्षण, कृषी आणि प्रशासन यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांचे सक्षमीकरण होऊन प्रत्येक भारतीयाची गरज जाणून घेत प्रदेशाशी संबंधित एआय समस्या निवारण करून त्यांना सेवा मिळू शकतील, असे डॉ. सिंह म्हणाले.
'भारत जेन' ही प्रणाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "भारताचे तंत्रज्ञान दशक" (India's Techade) या संकल्पनेशी सुसंगत आहे - केवळ नवोन्मेषासाठीच नव्हे तर सर्वसमावेशकतेसाठीही ती उपयुक्त आहे, यावर डॉ. जितेंद्र सिंह यांनी भर दिला. त्यांनी सीपीग्राम्स (CPGRAMS) ही प्रणाली, जिचा अनेक देशांमध्ये आदर्श तक्रार निवारण प्रणाली म्हणून अभ्यास केला जात आहे, तिच्यासह भारताची एआय क्षेत्रातील प्रगती म्हणजे जागतिक मानक असल्याचे सांगत तिची प्रशंसा केली.

नागरिक सहभाग आणि तक्रार निवारण वाढवण्यासाठी सीपीग्राम्स सारख्या प्लॅटफॉर्ममध्ये बहुभाषिक अभिप्राय प्रणालींच्या एकत्रीकरणाचा दाखला देत डॉ. जितेंद्र सिंह यांनी तळागाळातील शासनात असलेल्या जनरेटिव्ह एआयच्या परिवर्तनकारी भूमिकेवर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांना तांत्रिक आणि मानव्यविद्या शाखा एकत्र करण्याची संधी देऊन आंतरविद्याशाखीय शिक्षणाला प्रोत्साहन दिल्यामुळे त्यांची रोजगारक्षमता आणि नवनिर्मितीची क्षमता वाढवण्याची सुविधा असलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 चा समावेशक दृष्टीकोन त्यांनी अधोरेखित केला.
3000 पेक्षा जास्त ऍग्री-टेक स्टार्ट अप्सच्या यशाची डॉ. जितेंद्र सिंह यांनी प्रशंसा केली. या शिखर परिषदेत सरकारी विभाग आणि संशोधन केंद्रांदरम्यान सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी एक महत्त्वाचा सामंजस्य करार देखील करण्यात आला. एआयच्या मदतीने वास्तविक जगातील समस्यांचे निराकरण करण्यामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करण्यासाठी जनरेटिव्ह एआय हॅकॅथॉन 2025 या स्पर्धेचा प्रारंभ एक महत्त्वाचे पाऊल ठरले. तंत्रज्ञान विकास, उद्योजकता, मनुष्यबळ विकास आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य यांचा या मिशनच्या चार स्तंभांमध्ये समावेश आहे.

* * *
N.Chitale/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2133417)