रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

रतलाम-नागदा तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्ग प्रकल्पामुळे रेल्वेची गर्दी कमी होईल,अंतर्गत भागांपासून ते बंदरांपर्यंत कनेक्टिव्हिटी वाढेल आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल


केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रवाशांच्या वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी रेवा-पुणे, जबलपूर-रायपूर आणि ग्वाल्हेर-बंगळुरू या तीन नवीन रेल्वे सेवा सुरू करण्याची घोषणा केली; दोन महिन्यांमध्ये सेवा सुरू होतील

Posted On: 29 MAY 2025 9:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 मे 2025

केंद्रीय रेल्वे, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान  आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीतील रेल भवन येथे माध्यमांशी संवाद साधला. आर्थिक व्यवहारांवरील केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने अलीकडेच मंजूर केलेल्या रतलाम आणि नागदा दरम्यानच्या तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्ग प्रकल्पाबद्दल महत्त्वाची माहिती देताना, केंद्रीय मंत्र्यांनी या प्रकल्पाचे प्रमुख पैलू आणि विद्यमान रेल्वे मार्गांवरील  गर्दी कमी करणे, मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीची कार्यक्षमता वाढवणे, महत्त्वाच्या आर्थिक कॉरिडॉरमध्ये कनेक्टिव्हिटी मजबूत करणे आणि ते पूर्ण होण्याची मुदत या बाबी अधोरेखित केल्या.

माध्यमांना संबोधित करताना, अश्विनी वैष्णव यांनी या प्रकल्पाचे धोरणात्मक महत्त्व आणि व्यापक लाभ  याबद्दल सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की उच्च-घनता नेटवर्कचा भाग असलेला 41.4 किमीचा रतलाम-नागदा खंड  1,018 कोटी रुपयांच्या खर्चासह चार-पदरी होणार आहे , ज्यामुळे लाईन क्षमता वापर 116% वरून  65% पर्यंत कमी होईल.  हे नागदा (उत्तर), वडोदरा (दक्षिण), इंदूर (पूर्व) आणि चित्तोडगड (पश्चिम) या प्रमुख जंक्शनना जोडेल, जे प्रादेशिक आणि राष्ट्रीय कनेक्टिव्हिटीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.

या प्रकल्पामुळे मध्य प्रदेशातून कांडला, मुंद्रा, पिपावाव, हजीरा, दहेज, जेएनपीए आणि प्रस्तावित वाढवण  बंदर यासारख्या पश्चिम किनारपट्टीच्या प्रमुख बंदरांपर्यंत मालवाहतूक वाढेल, ज्यामुळे मध्य आणि उत्तर आर्थिक क्षेत्रांपर्यंत पोहोच वाढेल. याचा थेट लाभ इंदूर सेझ, छिंदवाडा सेझ, एमएमपीएल इंदूर, एमएमएलपी भोपाळ, दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर आणि नागदा औष्णिक ऊर्जा प्रकल्प आणि रतलाम प्रदेशातील संबंधित व्हिस्कोस आणि रासायनिक उद्योगांसारख्या प्रमुख औद्योगिक केंद्रांना होईल.

रेल्वेमंत्र्यांनी पुढे सांगितले की या पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणामुळे कृषी माल , कोळसा, कंटेनर आणि पेट्रोलियम उत्पादनांची जलद आणि अधिक कार्यक्षम वाहतूक होईल.

डॉ.आंबेडकर नगर-नवी दिल्ली सुपरफास्ट एक्सप्रेसची प्रचंड मागणी आणि दीर्घ  प्रतीक्षा यादीच्या पार्श्वभूमीवर, वैष्णव यांनी प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन तीन नवीन रेल्वे सेवा सुरू करण्याची घोषणा केली. नवीन सेवांमध्ये जबलपूर आणि सतना मार्गे रेवा ते पुणे , नैनपूर, बालाघाट आणि गोंदिया मार्गे जबलपूर ते रायपूर आणि  गुणा आणि भोपाळ मार्गे ग्वाल्हेर ते बंगळुरू तिसरी गाडी समाविष्ट असेल. या गाड्या पुढील दोन महिन्यांत सुरू होण्याची अपेक्षा आहे.

उज्जैनमध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2028 च्या तयारीबाबत अश्विनी वैष्णव म्हणाले की, रेल्वे मंत्रालयाने भाविकांची होणारी वाढती गर्दी लक्षात घेऊन व्यापक नियोजन सुरू केले आहे.


S.Kakade/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2132541)
Read this release in: English , Urdu , Hindi