संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ऑपरेशन सिंदूर दरम्यान मेक-इन इंडियाने महत्त्वाची भूमिका बजावली; एएमसीए अंमलबजावणी प्रारूपामुळे खाजगी क्षेत्राला स्वदेशी क्षमतांना आणखी बळकटी देता येईल ; सरकार-उद्योग सहकार्यामुळे 2047 पर्यंत भारत विकसित राष्ट्र बनू शकतो: संरक्षण मंत्री


"पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भूभाग; तो स्वेच्छेने आपल्या मुख्य प्रवाहात परत येईल; पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार एक भारत-श्रेष्ठ भारत संकल्पाबाबत वचनबद्ध"

"वार्षिक संरक्षण उत्पादनाने 1,46,000 कोटी रुपयांचा सार्वकालीन उच्चांक केला पार ; 24,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या संरक्षण उपकरणांच्या विक्रमी निर्यातीची नोंद "

Posted On: 29 MAY 2025 6:05PM by PIB Mumbai

नवी ‍‍दिल्ली, 29 मे 2025

"मेक-इन-इंडिया हा आपल्या राष्ट्रीय सुरक्षेचा एक अत्यावश्यक घटक आहे आणि ऑपरेशन सिंदूर दरम्यान दहशतवादाविरुद्ध भारताच्या प्रभावी कारवाईत त्याने महत्त्वाची भूमिका बजावली," असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उद्योग धुरिणींना सांगितले. प्रगत मध्यम लढाऊ विमान  कार्यक्रम(एएमसीए) अंमलबजावणी प्रारूपामुळे खाजगी क्षेत्राला प्रथमच  सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांसह एका मोठ्या संरक्षण प्रकल्पात सहभागी होण्याची संधी मिळेल, ज्यामुळे स्वदेशी संरक्षण क्षमता आणखी मजबूत होतील. ते 29, मे 2025 रोजी नवी दिल्ली येथे भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय) वार्षिक व्यवसाय शिखर परिषदेच्या उद्घाटनाच्या पूर्ण सत्राला संबोधित करत होते.

भारतात पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने तयार करण्यासाठी एएमसीए कार्यक्रमासाठी एक्झिक्युशन मॉडेल हे एक धाडसी आणि निर्णायक पाऊल आहे  जे देशांतर्गत एरोस्पेस क्षेत्राला नव्या  उंचीवर घेऊन जाईल असे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले. "एएमसीए प्रकल्पांतर्गत, पाच प्रोटोटाइप विकसित करण्याची योजना आहे, त्यानंतर त्याचे श्रुंखला -निहाय उत्पादन घेतले  जाईल. मेक-इन-इंडिया कार्यक्रमाच्या इतिहासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे," असे ते म्हणाले."मेक-इन-इंडिया कार्यक्रमाच्या इतिहासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे," असे ते म्हणाले.

ऑपरेशन सिंदूर दरम्यान मेक-इन-इंडियाच्या यशाचा उल्लेख करताना, राजनाथ सिंह म्हणाले की जर देशाने  स्वदेशी संरक्षण क्षमता मजबूत केल्या नसत्या तर भारतीय सशस्त्र दल  पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधात प्रभावी कारवाई करू शकले नसते. त्यांनी सुरक्षा आणि समृद्धीसाठी मेक-इन-इंडिया महत्त्वपूर्ण असल्याचे नमूद  केले आणि सांगितले की ऑपरेशन सिंदूर दरम्यान करण्यात आलेल्या स्वदेशी प्रणालींच्या वापरातून हे सिद्ध झाले आहे की भारताकडे शत्रूच्या कोणत्याही शस्त्रास्त्रांना भेदण्याची शक्ती आहे.

सरकारने धोरणात्मक स्पष्टता, स्वदेशीकरण, आर्थिक लवचिकता आणि धोरणात्मक स्वायत्तता यांना प्राधान्य दिले आहे आणि या प्रयत्नांचे यश तेव्हाच सुनिश्चित होऊ शकते जेव्हा नवोन्मेषक, उद्योजक आणि उत्पादक यांसह सर्व हितधारक या राष्ट्रीय मोहिमेत मजबूत भागीदार बनतील यावर संरक्षणमंत्र्यांनी भर दिला.

गेल्या दशकात सरकारने हाती घेतलेल्या उपक्रमांमधून मिळालेल्या यशाचा उल्लेख करून भारताच्या विकासाच्या प्रवासात संरक्षण क्षेत्र बजावत असलेली महत्त्वाची भूमिका संरक्षणमंत्र्यांनी अधोरेखित केली.10-11 वर्षांपूर्वी आपले संरक्षण उत्पादन सुमारे  43,000 कोटी रुपये होते. आज त्याने  1,46,000 कोटी रुपयांची विक्रमी पातळी ओलांडली आहे, ज्यामध्ये खाजगी क्षेत्राचा वाटा  32,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. 10 वर्षांपूर्वी सुमारे 600-700 कोटी रुपये असलेल्या आपल्या संरक्षण निर्यातीने आज 24,000 कोटी रुपयांचा विक्रमी आकडा ओलांडला आहे . आपली शस्त्रे, प्रणाली, उप-प्रणाली, घटक आणि सेवा सुमारे100 देशांमध्ये पोहोचत आहेत. संरक्षण क्षेत्राशी संबंधित 16,000हून अधिक एमएसएमई पुरवठा साखळीचा कणा बनले आहेत. या कंपन्या केवळ आपल्या स्वयंपूर्णतेच्या प्रवासाला बळकटी देत नाहीत तर लाखो लोकांना रोजगारही देत आहेत," असे ते म्हणाले.

या कार्यक्रमाला नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग, संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही कामत, लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल एनएस राजा सुब्रमण्यी, सीआयआयचे अध्यक्ष संजीव पुरी आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


S.Bedekar/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2132418)