गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज मुंबईत माधवबागस्थित श्री लक्ष्मी नारायण मंदिराच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला केले संबोधित
भारताने दहशतवाद्यांच्या घरात घुसून आणि त्यांचे मुख्यालय उद्ध्वस्त करून, भारताच्या मातृशक्तीची मान अभिमानाने उंचावली आहे
Posted On:
27 MAY 2025 5:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 मे 2025
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज मुंबईतील माधवबाग स्थित श्री लक्ष्मी नारायण मंदिराच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आपल्या भाषणात सांगितले की, गेल्या 150 वर्षांपासून मंदिराची उद्दिष्टे आणि समाजसेवेची प्रबळ भावना लोकांमध्ये जागविण्याचे काम विश्वस्त मंडळाचे सर्व सदस्य करत आहेत. त्या काळात वरजीवनदास आणि नरोत्तमभाई यांनी उदार मनाने आणि समाजाप्रती आपली औदार्याची भावना दर्शवत या संस्थेची स्थापना केली. सन 1875 मध्ये परकीय राजवटीच्या काळात एक मंदिर बांधून, त्याच्या माध्यमातून सामाजिक जाणिवेचे पुनर्जागरण केवळ महान लोकच करू शकतात, असे प्रतिपादन शाह यांनी आपल्या भाषणात केले.
लक्ष्मीनारायण मंदिरात अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम सुरू आहेत आणि येथे शैक्षणिक उपक्रम, गीता अभ्यास यासोबत एकेकाळी संस्कृत शाळादेखील चालवली जात होती, याचे स्मरण शाह यांनी करून दिले. माधवबाग ट्रस्टची स्थापना पावित्र्य, संतुलन आणि सत्कर्मांच्या त्रिवेणीतून झाली आहे, असे ते म्हणाले.
दीडशे वर्षांपासूनची ही परंपरा आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. शाह म्हणाले की, जेव्हा आपण द्विशताब्दी साजरी करू तेव्हा या ट्रस्टचे स्वरुप कसे असेल याचा विचार आपण केला पाहिजे. मध्यमवर्गाच्या सर्व चिंता मिटवणाऱ्या एका धार्मिक केंद्रात या ट्रस्टचे रुपांतर आपण करू शकतो का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अनेक प्रकारच्या उपचार सुविधा उपलब्ध करुन देऊन मध्यम वर्गातील रुग्णांसाठी इथे एक संजीवनी केंद्र उभारले जाऊ शकते असे शाह म्हणाले.
केंद्रिय गृहमंत्री म्हणाले की, कालच नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा 11 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आणि गेली 11 वर्षे पंतप्रधान मोदी देशाला विकासाच्या वाटेवर पुढेच घेऊन जात आहेत. ते म्हणाले की, भारतीय असल्याचा आपल्याला अभिमान वाटेल असे काम पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. स्वातंत्र्यानंतर कित्येक दशकांपर्यंत राजनैतिक इच्छेच्या अभावी कितीतरी समस्या सोडवल्या गेल्या नव्हत्या. शाह म्हणाले की, 550 वर्षांनंतर अयोध्येत भव्य राममंदिर बांधण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता होती आणि ती पंतप्रधान मोदी यांनी दर्शवली. ते म्हणाले की औरंगजेबाने उद्ध्वस्त केलेल्या काशी विश्वनाथाचे मंदिर भव्य स्वरुपात उभे करुन ही राजकीय इच्छाशक्ती त्यांनी दाखवून दिली आहे. जगभरात, घराघरामध्ये योगाचा प्रसार करण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले आहे. 2047 पर्यंत भारत देश पूर्णपणे विकसित आणि प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर होऊ शकतो असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्माण केला आहे. गृहमंत्री म्हणाले की, भारताला आता मागे वळून पाहण्याची किंवा थांबण्याची काहीच गरज नाही.
अमित शहा म्हणाले की, जगाला सिंदूरचे महत्त्व माहिती नव्हते मात्र पंतप्रधान मोदी यांनी सर्जिकल स्ट्राईकला ऑपरेशन सिंदूर असे नाव देऊन सिंदूरचे महत्त्व अख्या जगाला सांगितले. ते म्हणाले की पंतप्रधान मोदी यांनी दहशतवाद्यांच्या घरात घुसून त्यांची मुख्यालये नष्ट केली आणि भारताच्या मातृशक्तीची मान गौरवाने उंचावेल असे काम केले.
S.Kane/S.Kakade/S.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2131678)