भारतीय स्पर्धा आयोग
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्ली येथे भारतीय स्पर्धा आयोगाच्या 16 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे भूषवले अध्यक्षपद


जागतिक मूल्य साखळी आणि डिजिटल परिसंस्थांशी भारत एकजीव होत असताना, भारताच्या स्पर्धात्मकतेसाठी खुल्या आणि स्पर्धात्मक बाजारपेठा कायम राखणे महत्त्वाचे ठरेल: सीतारामन

Posted On: 20 MAY 2025 9:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 मे 2025

केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री  निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्ली येथे भारतीय स्पर्धा आयोगाच्या (सीसीआय) 16 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले.

आपल्या भाषणात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितले की, उदारीकरणाच्या भावनेचे रक्षण करण्यासाठी सीसीआय ही एक महत्त्वाची संस्था म्हणून उदयास आली. बाजारपेठांनी केवळ मोजक्या लोकांसाठी नव्हे तर अनेकांसाठी काम केले पाहिजे असे त्या म्हणाल्या. अंमलबजावणी, समर्थन, बाजाराचा अभ्यास आणि नियामक सुधारणांद्वारे सीसीआयचे हस्तक्षेप, छोट्या आणि मोठ्या उद्योगांसाठी असे वातावरण तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, जिथे ते  गुणवत्तेच्या बळावर  स्पर्धा करू शकतील, ग्राहकांसमोर अनेक पर्याय असतील आणि नवोन्मेष आणि कार्यक्षमतेचा गौरव केला जाईल असे सीतारामन म्हणाल्या.

सीसीआयच्या नियामक दृष्टिकोनाची प्रशंसा करताना, सीतारामन म्हणाल्या की, सीसीआयने स्पर्धाविरोधी पद्धतींविरुद्ध ठोस आणि निर्णायक अंमलबजावणीची कारवाई करून कायद्याचे पावित्र्य राखतानाच कायदेशीर व्यवसाय वर्तन सक्षम करण्यासाठी समान वचनबद्धता दर्शवली आहे. यातून  समावेशक बाजारपेठांचा विकास आणि भारताच्या नियामक चौकटीत गुंतवणूकदारांचा विश्वास निर्माण करण्यात भरीव  योगदान दिले आहे.

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितले की, भारताच्या विद्यमान संरचनात्मक सुधारणा बाजारपेठेतील क्षमता खुली  करण्यासाठी आणि स्पर्धा अधिक तीव्र बनवण्यासाठी सज्ज आहेत.

केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26, मध्ये नमूद केलेल्या “कमी कठोर नियामक चौकटी” चे महत्त्व सांगताना, सीतारामन यांनी नियामकांना ‘किमान आवश्यक, जास्तीत जास्त व्यवहार्य’ या तत्त्वाने पालन  करणे आवश्यक आहे यावर भर दिला.

सीसीआयसमोरील उदयोन्मुख आव्हानांवर बोलताना, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जागतिक सहकार्य आणि दक्ष नियमनाच्या गरजेवर भर दिला. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्पर्धा या विषयावर सीसीआयने अलीकडेच सुरू केलेला बाजार अभ्यास हा योग्य वेळी केलेला धोरणात्मक उपक्रम आहे, असे त्या म्हणाल्या.

जागतिक मूल्य साखळी आणि डिजिटल परिसंस्थांशी भारत अधिक एकात्मिक होत असताना, खुल्या आणि स्पर्धात्मक बाजारपेठा कायम राखणे हे भारताच्या स्पर्धात्मकतेसाठी महत्त्वाचे ठरेल असे केंद्रीय मंत्री म्हणाल्या. सीसीआय या प्रवासात  - मग ते एमएसएमईसाठी बाजारपेठ प्रवेश सुलभ करणे असो, निष्पक्ष स्पर्धेला बाधा पोहचवणारे  अडथळे दूर करणे असो, डिजिटल समावेशनाला प्रोत्साहन देणे असो किंवा ग्राहकांना चांगली निवड,  कमी किंमती आणि सुधारित गुणवत्तेचा फायदा मिळवून देणे असो, प्रमुख भूमिका बजावेल असे सीतारामन  यांनी नमूद केले.

S.Kakade/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2130094)
Read this release in: English , Urdu , Hindi , Malayalam