वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
पंतप्रधान गतिशक्ती योजनेअंतर्गत नेटवर्क नियोजन गटाच्या 92व्या बैठकीत महत्त्वाच्या पायाभूतसुविधा विषयक प्रकल्पांचे मूल्यमापन
हे प्रकल्प लॉजिस्टिक्सची कार्यक्षमता वाढवतील आणि प्रादेशिक विकासाला चालना देतील
Posted On:
29 APR 2025 9:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 एप्रिल 2025
रस्ते आणि रेल्वे या क्षेत्रांतील पायाभूत सुविधाविषयक प्रकल्पांचे मूल्यमापन करण्यासाठी आज नवी दिल्ली येथे नेटवर्क नियोजन गटाची (एनपीजी) 92 वी बैठक झाली. पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लान (पीएमजीएस एनएमपी) मधल्या घटकांना अनुसरुन, मल्टीमोडल कनेक्टीव्हिटी वाढवणे तसेच लॉजिस्टिक्सची कार्यक्षमता सुधारणे या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली.
एनपीजीने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (एमओआरटीएच)सादर केलेला एक आणि केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने (एमओआर) सादर केलेले तीन अशा एकूण चार मुख्य प्रस्तावांचे मूल्यमापन केले. एकात्मिक बहुपद्धतीय पायाभूत सुविधा, प्रत्येक क्षेत्राशी जोडणी तसेच संपूर्ण सरकार आणि संपूर्ण क्षेत्र विकास दृष्टीकोनासह पंतप्रधान गतिशक्ती योजनेच्या मुख्य तत्वांशी या प्रकल्पांची सुसंगतता तपासण्यात आली. या उपक्रमांमुळे प्रवासाला लागणारा वेळ वाचेल, मालाची चढ-उतार विषयक गतीशीलतेत सुधारणा होईल आणि या क्षेत्रांतून लक्षणीय सामाजिक-आर्थिक लाभ मिळवता येतील.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (एमओआरटीएच)
1. सहा/चार पदरी प्रवेश-नियंत्रित महामार्ग-ऋषिकेश बाह्यवळण
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (एमओआरटीएच) एनएचएआय अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून ऋषिकेश शहर परिसरातील कोंडी कमी करण्यासाठी तसेच दिल्ली, मीरत, रुरकी, हरिद्वार आणि बद्रीनाथ या शहरांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग-34 या महत्त्वाच्या मार्गावरील वाहतुकीची हालचाल सुधारण्यासाठी ऋषिकेश शहराला लागून एका बाह्यवळणाचा प्रस्ताव सादर केला आहे.या प्रकल्पामध्ये 6/4 पदरी उन्नत मार्गिका आणि आणखी एका अतिरिक्त 4 पदरी रस्त्याचा समावेश असून या प्रकल्पाद्वारे भविष्यातील वाहतूकीचे व्यवस्थापन करण्यासाठी तसेच एकंदर वाहतूक क्षमता सुधारण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहेत.
केंद्रीय रेल्वे मंत्रालय (एमओआर)
2. बीना-इटारसी चौथी रेल्वे लाईन (236.97 किमी)
केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने बीना आणि इटारसी या शहरांच्या दरम्यान चौथ्या रेल्वे लाईनचा प्रस्ताव दिला आहे. नर्मदापुरम, राणी कमलापती, भोपाळ, निशातपुरा तसेच विदिशा यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवरून हा मार्ग जाणार आहे.
3. कसारा-मनमाड मल्टी-ट्रॅकिंग लाईन्स (तिसरी आणि चौथी वाहिनी, 2x130.817 किमी)
या प्रकल्पात ईशान्य घाटामधील कसारा-इगतपुरी आणि दक्खनच्या पठारावरील इगतपुरी मनमाड या दोन टप्प्यांमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे लाईनच्या उभारणीचा समावेश आहे. या भागात शंभरात 1 असा रुलिंग ग्रॅडियंट राखणे, बँकिंग इंजिनाची आवश्यकता काढून टाकणे तसेच उर्जा कार्यक्षमता सुधारणे हे या प्रकल्पाचे मुख्य उद्देश आहेत. या प्रकल्पामुळे अनेक स्थानके टळणार आहेत आणि हा मार्ग सध्याच्या लहावित स्थानकात विलीन होतो आणि मालाची वाहतूक अधिक सुलभतेने होईल याची सुनिश्चिती करतो.
4. भुसावळ-वर्धा तिसरी आणि चौथी लाईन (314 किमी)
भुसावळ आणि वर्धा यांच्या दरम्यान प्रस्तावित 314 किमीच्या तिसऱ्या आणि चौथ्या लाईनचा मार्ग महाराष्ट्रातील जळगाव,बुलडाणा,अकोला,अमरावती आणि वर्धा या पाच जिल्ह्यांतून जाणार आहे. या प्रकल्पात नवीन रेल्वे मार्ग, स्थानकांचे अद्ययावतीकरण, यार्डची पुनर्रचना तसेच सिग्नल यंत्रणेत सुधारणा या कामांचा समावेश आहे. मुंबई-हावडा हाय-डेन्सिटी मार्गिका (एचडीएन-2)चा भाग असलेला हा मार्ग मालाच्या वाहतुकीची कोंडी कमी करणे आणि मध्य रेल्वे नेटवर्क बळकट करणे या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
केंद्रीय उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे (डीपीआयआयटी) संयुक्त सचिव पंकज कुमार यांनी या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले.
* * *
N.Chitale/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2125311)
Visitor Counter : 11