विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
इटलीच्या विद्यापीठ आणि संशोधन मंत्री अॅना मारिया बर्निनी यांनी केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांची घेतली भेट
उभय मंत्र्यांमध्ये क्वांटम तंत्रज्ञान, कृत्रिम प्रज्ञा आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा
Posted On:
11 APR 2025 3:25PM by PIB Mumbai
भारत आणि इटली यांच्या दरम्यान द्विपक्षीय वैज्ञानिक सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, इटलीच्या विद्यापीठ आणि संशोधन मंत्री अॅना मारिया बर्निनी या सध्या भारत दौऱ्यावर आहेत, त्यांनी ‘नॉर्थ ब्लॉक’ येथे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांच्यासमवेत उच्चस्तरीय बैठक घेतली.

याप्रसंगी उभय मंत्र्यांनी सहकार्याच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली, हे या बैठकीचे वैशिष्ट्य होते. यावेळी या नेत्यांनी क्वांटम तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, जैवतंत्रज्ञान आणि इतर उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये संयुक्त उपक्रम पुढे नेण्याविषयी चर्चा केली;
द्विपक्षीय संशोधनासाठी भारताच्या वचनबद्धतेची पुष्टी करताना, डॉ. जितेंद्र सिंह यांनी 10 एप्रिल, 2025 रोजी संयुक्त विज्ञान आणि तंत्रज्ञान समितीच्या बैठकीत 2025-2027 वर्षासाठी इंडो-इटालियन कार्यकारी सहकार्य कार्यक्रम (ईपीओसी ) वर स्वाक्षरीची घोषणा केली. ईपीओसी आराखड्याच्या चौकटीअंतर्गत, दोन्ही देशांनी आजपर्यंत 150 हून अधिक संयुक्त संशोधन प्रकल्प यशस्वीरित्या अंमलात आणले आहेत.

सध्याच्या कार्यक्रमात संशोधनाला गतिशीलता देणा-या दहा प्रस्तावांसाठी संयुक्त निधी आणि विविध वैज्ञानिक विषयांमध्ये 10 महत्त्वपूर्ण सहयोगी संशोधन उपक्रमांचा समावेश आहे.
डॉ. जितेंद्र सिंह यांनी कृत्रिम प्रज्ञा (एआय), उच्च-कार्यक्षमता संगणन (एचपीसी), बिग डेटा आणि जैवतंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात भारताने केलेल्या प्रगतीवर प्रकाश टाकला. त्यांनी नमूद केले की, भारताची धोरणात्मक गुंतवणूक आणि धोरणे देशाला उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे जागतिक केंद्र बनण्याच्या दिशेने नेत आहेत.
डॉ. जितेंद्र सिंह यांनी भारताच्या चैतन्यमय स्टार्टअप परिसंस्थेचा अभिमानाने उल्लेख केला. स्टार्टअप क्षेत्रामध्ये जागतिक स्तरावर भारत तिसऱ्या क्रमांकावर असून यात कृषी-जैवतंत्रज्ञान स्टार्टअप्सचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
आधुनिक विज्ञानाद्वारे प्राचीन ज्ञानाचे जतन करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचे पुनरूच्चार करताना, डॉ. सिंह यांनी पारंपरिक ज्ञान डिजिटल लायब्ररीबद्दल सांगितले - हा एक अनोखा उपक्रम आहे जो अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पारंपरिक भारतीय ज्ञानाचे डिजिटलायझेशन आणि संरक्षण करतो.

दोन्ही देशांनी संसर्गजन्य रोग, क्वांटम तंत्रज्ञान, हरित हायड्रोजन आणि अक्षय ऊर्जा, सांस्कृतिक वारसा जतन तंत्रज्ञान आणि शाश्वत नील अर्थव्यवस्था यासारख्या क्षेत्रात दीर्घकालीन सहकार्यासाठी त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
त्यांनी उद्योग 4.0 , स्वच्छ ऊर्जा यासारख्या नवीन सहयोगी क्षेत्रांचा शोध घेण्यावर देखील सहमती दर्शविली.
डॉ. जितेंद्र सिंह यांनी दोन्ही देशांमधील एसएमई आणि स्टार्टअप्सचा समावेश असलेल्या शैक्षणिक आणि औद्योगिक भागीदारीसह इतर क्षेत्रांमध्ये वाव असल्याचे नमूद केले.
***
N.Chitale/S.Bedekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2121033)