संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कारवार येथे पहिल्या नौदल कमांडर्स परिषद 2025 च्या पहिल्या टप्प्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सागरी सुरक्षा आणि भारतीय नौदलाच्या  सज्जतेचा घेतला आढावा

Posted On: 05 APR 2025 5:54PM by PIB Mumbai

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कर्नाटकातील कारवार येथे 5 एप्रिल 2025 रोजी, पहिल्या नौदल कमांडर्स परिषद 2025 च्या उद्घाटन टप्प्यात, सागरी सुरक्षा परिस्थिती, भारतीय नौदलाची सज्जता  आणि भविष्याचा वेध घेतला. संरक्षण मंत्र्यांनी समकालीन सुरक्षा आदर्शांची नोंद  घेणे, नौदलाची लढाऊ क्षमता अधिक वाढवण्यासाठी भविष्यातील मार्ग तयार करणे तसेच धोरणात्मक, कार्यान्वयन आणि प्रशासकीय पैलूंवर लक्ष केंद्रित करण्या संदर्भात नौदल कमांडर्सशी संवाद साधला.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कमांडर्सना संबोधित करताना भारताची सागरी सुरक्षा मजबूत करण्यात, प्रत्येक  परिस्थितीत लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात तसेच नवीन ऊर्जा आणि नवोन्मेषाच्या सोबतीने राष्ट्राची सेवा करण्यात निरंतर वचनबद्धता पाळण्यात नौदलाने दिलेल्या योगदानाचे कौतुक केले.

सध्याच्या कसलाही अंदाज न बांधता येणाऱ्या भूराजकीय परिस्थितीत सशस्त्र दलांच्या भविष्यातील भूमिकांची पुनर्रचना करणे आवश्यक आहे, असे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले.

राजनाथ सिंह यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सागरी  कायद्यावरील करारानुसार भारत मुक्त, खुल्या आणि नियम-आधारित व्यवस्थेचे नेहमीच समर्थन करत असल्याचा पुनरुच्चार केला. बदलत्या परिस्थितीचे मूल्यांकन करत सतर्क आणि सज्ज राहून त्यानुसार नियोजन, संसाधने आणि युद्धसराव सुनिश्चित करण्याचे आवाहन संरक्षण मंत्र्यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारसाठी राष्ट्रीय सुरक्षा ही सर्वोच्च  महत्त्वाची बाब आहे यावर संरक्षण मंत्र्यांनी भर दिला. सशस्त्र दलांच्या सर्व गरजा पूर्ण केल्या जातील याची नेहमीच सुनिश्चिती   केली गेली आहे, असेही त्यांनी सांगितले.

संरक्षण मंत्रालयाकडून 2025 हे वर्ष 'सुधारणांचे वर्ष' म्हणून घोषित करण्यात आल्यावर, राजनाथ सिंह यांनी सुधारणांबद्दलच्या वचनबद्धतेची पूर्तता करण्यासाठी सर्व भागधारकांनी एकत्रित प्रयत्न करावेत असे आवाहन केले.

ही परिषद सर्वोच्च पातळीवरील द्वैवार्षिक आयोजन असून यात सहभागी होणारे वरिष्ठ नौदल कमांडर महत्त्वाच्या धोरणात्मक, कार्यात्मक आणि प्रशासकीय मुद्द्यांवर चर्चा करतील.

या परिषदेचा दुसरा टप्पा 7 ते 10 एप्रिल 2025 दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित केला जाणार आहे.

परिषदेत सहभागी होणारे कमांडर परराष्ट्र धोरण आणि आंतरराष्ट्रीय सहभागाशी संबंधित मुद्द्यांवर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि अमिताभ कांत यांच्याशी देखील संवाद साधतील. सरकारच्या आत्मनिर्भरतेच्या दृष्टिकोनानुसार आधुनिकीकरण, स्वदेशीकरण आणि स्वावलंबन मजबूत करण्याचा भारतीय नौदलाचा प्रयत्न हा या कार्यक्रमाचा प्रमुख केंद्रबिंदू आहे.

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2119365) Visitor Counter : 54


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil