शिक्षण मंत्रालय
अखिल भारतीय शिक्षा समागम 2024 च्या आयोजनासह केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 चा चौथा वर्धापनदिन केला साजरा
एनईपी 2020 म्हणजे शैक्षणिक परिदृश्यात परिवर्तन घडवून आणणे, देशाचा लोकसंख्याविषयक लाभांशाचा पुरेपूर वापर, जनतेचे सक्षमीकरण आणि सामाजिक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठीच्या आशेचे प्रतीक आहे – केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान
Posted On:
29 JUL 2024 6:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 जुलै 2024
नवी दिल्ली येथील माणेकशॉ केंद्राच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय शिक्षा समागम 2024 या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अंमलबजावणीचा चौथा वर्धापनदिन साजरा केला. या प्रसंगी, केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री तसेच केंद्रीय कौशल्यविकास आणि उद्योजकता विभागाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) जयंत चौधरी आणि केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री तसेच केंद्रीय शिक्षण आणि ईशान्य प्रदेश विकास राज्यमंत्री डॉ. सुकांत मजुमदार कार्यक्रम स्थळी उपस्थित होते.

याप्रसंगी, केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते,विविध भारतीय भाषांमधून शिक्षण घेणे सुलभ करण्याच्या दृष्टीने समर्पित दूरचित्रवाणी वाहिन्या; एक तमिळ वाहिनी; 25 भारतीय भाषांमध्ये सुरवातीच्या इयत्तांसाठी प्राथमिक पुस्तके; शिक्षणाला मजेदार, तणावमुक्त अनुभव बनवण्याच्या उद्देशाने 10 बॅगमुक्त दिवस साजरे करण्यासाठी मार्गदर्शक सूचना; करियर मार्गदर्शनासाठी मार्गदर्शक सूचना, 500 पेक्षा जास्त जॉब कार्डे असलेले प्रचंड ग्रंथसंग्रहालय; एनएमएम (मार्गदर्शनासाठीचे राष्ट्रीय अभियान)आणि ब्रेल आणि ऑडियो बुक्स संदर्भात शिक्षकांसाठी राष्ट्रीय व्यावसायिक मापदंड (एनपीएसटी); एआयसीटीई नीती आयोग तसेच एआयएम तर्फे शालेय नवोन्मेष मॅरॅथॉन तसेच पदवीपरीक्षेतील कामगिरी आणि व्यावसायिक क्षमता यांच्यावर आधारित पुस्तक अशा केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या महत्त्वाच्या अनेक एनईपी 2020 उपक्रमांची सुरुवात देखील करण्यात आली.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे की, एनईपी 2020च्या चार वर्षांच्या वाटचालीने शिक्षण घेणाऱ्या नव्या पिढीची जोपासना करण्यासाठी देशाच्या शैक्षणिक प्रणालीमध्ये अनेक परिवर्तनकारक बदल घडवून आणले आहेत. एनईपी2020 म्हणजे शैक्षणिक परिदृश्यात परिवर्तन घडवून आणणे, देशाचा लोकसंख्याविषयक लाभांशाचा पुरेपूर वापर, समान्या जनतेचे सक्षमीकरण आणि सामाजिक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठीच्या आशेचे प्रतीक आहे असे त्यांनी नमूद केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या देशाला 21 व्या शतकातील ज्ञान अर्थव्यवस्था बनवण्यासाठी अत्यंत आत्मीयतेने एनईपीच्या अंमलबजावणी करण्याप्रती असलेल्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला.
उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनावर असलेला शिक्षकांचा प्रचंड प्रभाव आणि विद्यार्थ्यांचे जीवन घडवण्यासाठी शिक्षकांनी अनुसरलेली मूल्ये आणि दिलेले योगदान यावर प्रकाश टाकला. देशाची सूत्रे खऱ्या अर्थाने शिक्षकांच्या हाती असतात असे त्यांनी पुढे सांगितले. शेतकरी, वैज्ञानिक आणि शिक्षक हे समाजाचे तीन आधारस्तंभ असून ते देशाच्या भविष्याची संकल्पना निश्चित करतात असे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले.
एनईपी 2020 ला आकार देणाऱ्या दूरदर्शी आणि प्रागतिक संकल्पना मांडल्याबद्दल केंद्रीय मंत्री डॉ.सुकांत मजुमदार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.ते म्हणाली की एनईपी 2020 हा केवळ प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग न बनता त्या पलीकडे जाऊन वैयक्तिक विकासाच्या परिवर्तनात्मक प्रवासाचा आदर्श घालून देते. एनईपी 2020 मध्ये भारताचा समृद्ध वारसा, आधुनिक प्रगतीसह पारंपरिक ज्ञानाचे विश्लेषण तसेच राष्ट्र-उभारणीला केंद्रस्थानी ठेवून मूल्य शिक्षणाचे एकत्रीकरण यांचा समावेश करण्यात आला आहे असे ते म्हणाले.
N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2038647)