रेल्वे मंत्रालय

एरोस्पेस अध्यापन आणि संशोधनासाठी भारतीय रेल्वेच्या वडोदरा येथील गती शक्ती विद्यापीठ (जीएसव्ही) आणि एअरबस यांच्यात करार


वाहतूक आणि लॉजिस्टिक क्षेत्रांवर विशेषत्वाने लक्ष केंद्रित करून रेल्वे, विमान वाहतूक, नौवहन, बंदरे, महामार्ग, रस्ते आणि जलमार्ग यांमधील राष्ट्रीय विकास योजनांचे कार्य पूर्ण करण्याचा उद्देश असलेले जीएसव्ही हे अशाप्रकारचे पहिले विद्यापीठ

Posted On: 05 JUL 2024 5:47PM by PIB Mumbai

 

भारतीय विमान वाहतूक क्षेत्राला लक्षणीयरीत्या बळकट करण्याकरिता भारतीय रेल्वेच्या वडोदरा येथील गती शक्ती विद्यापीठ (जीएसव्ही) आणि एअरबस यांनी आज सहकार्य करार केला. सप्टेंबर 2023 मध्ये स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य कराराच्या अनुषंगाने, रेमी मेलर्ड (एअरबस भारत आणि दक्षिण आशियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक) आणि प्रा. मनोज चौधरी (गतीशक्ती विद्यापीठाचे कुलगुरू) यांच्यात नवी दिल्लीतील रेल्वे भवन येथे अंतिम करार झाला. रेल्वे, माहिती आणि प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आणि गतीशक्ती विद्यापीठाचे पहिले कुलपती अश्विनी वैष्णव, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू आणि रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

या करारामध्ये संपूर्ण कार्यक्रम कालावधीसाठी 40 जीएसव्ही विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण शिष्यवृत्ती कार्यक्रम, जीएसव्ही मध्ये उत्कृष्टता केंद्राची स्थापना तसेच जीएसव्ही मध्ये एअरबस एव्हिएशन अध्यासन केंद्राच्या प्राध्यापक  पदाचा समावेश आहे. तसेच, विमान वाहतूक क्षेत्रातील कार्यरत व्यावसायिकांच्या कार्यकारी प्रशिक्षणासाठी जीएसव्ही आणि एअरबस भागीदारी करतील.

"आज सामंजस्य करारातून प्रत्यक्ष कृतीत रुपांतरण होण्याचा दिवस आहे. जीएसव्ही आणि एअरबसचे अभिनंदन. दिलेल्या वचनाची पूर्तता करणे हे पंतप्रधान मोदी यांच्या  सरकारची  सर्वात मोठी उपलब्धी आहे. पुन्हा एकदा आपल्या पंतप्रधानांच्या म्हणण्यानुसार सबका साथ सबका विकास या भावनेने विमान वाहतूक, महामार्ग, रेल्वे, रस्ते वाहतुकीचा विकास व्हायला हवा. सबका साथ सबका विकास या भावनेने आम्ही सर्वांसोबत सहकार्य करत राहूअसे  अश्विनी वैष्णव यांनी यावेळी सांगितले.

"एअरबससोबत सामंजस्य करार होत असल्याचा मला आनंद आहे. नागरी विमान वाहतूक हे भारतातील सर्वात वेगाने विकसित होणारे क्षेत्र आहे. गेल्या दहा वर्षांत, विमानतळांची संख्या 74 वरून जवळपास दुप्पट होऊन 157 झाली आहे. आता, उडान योजनेने विमान वाहतुकीच्या नकाशावर टियर II आणि टियर III शहरे आणली आहेत. आम्ही रेल्वेचे मार्गदर्शन घेत राहू. नागरी विमान वाहतूक मंत्रालय हवाई क्षेत्राच्या प्रगतीसाठी गती शक्ती विद्यापीठाला पूर्ण सहकार्य आणि समर्थन करेल आणि जीएसव्ही ने मास्टर्स आणि पीएचडी कार्यक्रम सुरू करण्याची तयारी करावी" असे आवाहन यावेळी किंजरापू राममोहन नायडू यांनी केले.

***

S.Kakade/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2031124) Visitor Counter : 16


Read this release in: English , Urdu , Hindi