वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारताचा लोकसंख्याशास्त्रीय लाभांश युरोपीय देशांशी आर्थिक भागीदारी वाढवण्यासाठी उपयोगी ठरेल - केंद्रीय मंत्री पीयूष गोयल
भारतात मजबूत नियामक यंत्रणेमुळे व्यवसायांसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे- केंद्रीय मंत्री पीयूष गोयल
Posted On:
21 FEB 2024 8:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 21 फेब्रुवारी 2024
भारत आज जगात शक्यतांचे केंद्र म्हणून उदयाला आला असून, आकांक्षी भारताचा लोकसंख्या शास्त्रीय लाभांश भारत-युरोप आर्थिक भागीदारी आणि भू-राजकीय सहभाग वाढवण्यासाठी उपयोगी ठरेल, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. ते आज नवी दिल्ली येथे आयोजित, भारतीय उद्योग महासंघ भारत युरोप व्यवसाय आणि शाश्वतता परिषदेमध्ये बोलत होते.
भारताने सर्वात कमी दर डोई कार्बन उत्सर्जनासह, पर्यावरणाबाबत नेहमीच जागरूक भूमिका घेतली असून, हवामान आणि शाश्वततेच्या बाबतीत एक जबाबदार देश म्हणून भारत आपले स्थान कायम ठेवेल असे केंद्रीय मंत्र्यांनी नमूद केले. सरकार विजेवरील वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना एक आकर्षक व्यवसाय बनवण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे, आणि जागतिक शाश्वतता निर्माण करण्यासाठी चक्राकार अर्थव्यवस्था विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे, असे ते म्हणाले. सरकार अनुपालनाचा भार कमी करण्यावर लक्ष केंद्रित करून व्यवसायांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करत आहे, तसेच मजबूत आणि भक्कम नियामक यंत्रणेच्या सहाय्याने जगभरातील व्यवसायांबरोबर भागीदारी करत असल्याचे केंद्रीय मंत्री म्हणाले. आजचा भारत हा सर्वात वेगाने वाढणारी ई-कॉमर्स बाजारपेठ असलेला ‘आत्मनिर्भर भारत’ आहे, असे त्यांनी नमूद केले.
भारताने G20 चे आयोजन करून जागतिक व्यासपीठावर दिलेल्या योगदानावर केंद्रीय मंत्री गोयल यांनी भर दिला आणि ते म्हणाले की, जागतिक जैव-इंधन गट आणि भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉरच्या स्थापनेमुळे, भारत जगाला पारदर्शक आणि निष्पक्ष व्यापार प्रणालीच्या माध्यमातून एकत्र येऊन काम करायला मदत करेल. सरकार महिलांच्या नेतृत्वाखालील विकासासाठी काम करत आहे, आणि युवा आकांक्षी प्रतिभावंतांच्या मोठ्या समुदायाच्या पाठबळासह मजबूत समग्र -आर्थिक पाया असलेला देश उभारत आहे, असे केंद्रीय मंत्र्यांनी नमूद केले. केंद्रीय मंत्री गोयल पुढे म्हणाले की, सरासरी वय 30 वर्षांपेक्षा कमी असलेली आकांक्षी नवीन पिढी, सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासासाठी काम करण्याबरोबरच भारताला 2047 पर्यंत पूर्णपणे विकसित देश बनायला सहाय्य करेल.
N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2007837)