आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी झज्जर एम्समधील राष्ट्रीय कर्करोग संस्थेच्या 5व्या वर्धापनदिन कार्यक्रमात केले बीजभाषण
देश आयुष्मान बनावा जिथे आरोग्य सुविधा प्रत्येक नागरिकाला परवडण्याजोग्या आणि उपलब्ध असाव्यात, असे पंतप्रधानांचे स्वप्न आहे. या प्रयत्नांसाठी सरकारने आरोग्य क्षेत्र विकासासोबत जोडले आहे - डॉ. मांडविया
Posted On:
12 FEB 2024 6:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 12 फेब्रुवारी 2024
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज झज्जरच्या एम्समध्ये राष्ट्रीय कर्करोग संस्थेच्या 5व्या वर्धापनदिन कार्यक्रमात बीजभाषण केले.

लिव्हरपूल विद्यापीठ आणि नवी दिल्लीच्या एम्समध्ये “ एम्स लिव्हरपूल कोलॅबोरेटिव्ह सेंटर फॉर ट्रान्स्लेशनल रिसर्च इन हेड अँड नेक- एएलएचएनएस” या संशोधन संस्थेच्या स्थापनेसाठी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एका करारावर यावेळी स्वाक्षऱ्या देखील करण्यात आल्या. एएलएचएनएस या संस्थेकडून डोके आणि मानेच्या कर्करोगावरील संयुक्त संशोधन आणि शिक्षण कार्यक्रम तयार करण्यासाठी दोन्ही संस्थांच्या संसाधनांचे एकत्रिकरण करण्यात येईल, ज्यामुळे संशोधनाचे निष्कर्ष आणि शिक्षणाच्या दर्जात सुधारणा होईल आणि त्याचा लाभ या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या उपचारांसाठी होऊ शकेल.

डॉ. मांडविया म्हणाले की देश आयुष्मान बनावा जिथे आरोग्य सुविधा प्रत्येक नागरिकाला परवडण्याजोग्या, आवाक्यातील आणि उपलब्ध असाव्यात, असे पंतप्रधानांचे स्वप्न आहे. उपचारांसाठी गरीब आणि श्रीमंत असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव असू नये. प्रत्येकाला समान दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात हे सुनिश्चित करण्यासाठी गेली 10 वर्षे आरोग्य क्षेत्राची विकासासोबत सांगड घालून सरकारने काम केले आहे. आयुष्मान भारत पीएम-जेएवाय च्या कामगिरीबाबत आणि आयुष्मान आरोग्य मंदिर योजनेबाबत बोलताना ते म्हणाले, “ देशातील 60 कोटी जनतेला वर्षाला 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा, गंभीर आजारांसाठी मोफत उपचार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या योजने अंतर्गत आज अगदी गरिबांना सुद्धा त्या रुग्णालयात उपचार घेता येत आहेत ज्या रुग्णालयात यापूर्वी केवळ श्रीमंत लोकांना उपचार मिळत होते. आतापर्यंत 6 कोटींपेक्षा जास्त लोकांनी या योजने अंतर्गत उपचार घेतले आहेत ज्यामुळे गरीब जनतेच्या 1,12,500 कोटी रुपयांची बचत झाली आहे.” “ 1.64 लाख आयुष्मान आरोग्य मंदिरांच्या स्थापनेमागील प्रमुख उद्देशांपैकी एक म्हणजे पहिल्या टप्प्यातच प्राथमिक कर्करोग तपासणी सुनिश्चित करणे हा आहे. आज जिल्हा रुग्णालयात देखील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया केल्या जात आहेत”, त्यांनी नमूद केले. आयुष्मान भारत योजनेने केवळ कोट्यवधी लोकांचे जीव वाचवण्याबरोबरच त्यांना दारिद्र्य रेषेखाली जाण्यापासून देखील वाचवले आहे, असे ते पुढे म्हणाले.

2025 पर्यंत भारत क्षयरोगमुक्त करण्यासाठीच्या प्रयत्नांमधील भारताच्या यशाबाबत बोलताना मांडविया म्हणाले, “ पंतप्रधानांच्या क्षयरोगमुक्त भारत मोहिमेत प्रत्येक वर्षी 25 लाख क्षयरुग्णांना मोफत औषधे, तपासण्या, पोषण इ. उपलब्ध करून दिले जाते, ज्यासाठी वर्षाला सुमारे 3000 कोटी रुपये खर्च केला जातो. याशिवाय दर महिन्याला क्षयरुग्णांना 500 रुपये मदत दिली जाते, ज्यामध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये 2756 कोटी रुपये थेट रुग्णांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत.” यावेळी त्यांनी सेवाभावी नागरिकांकडून देशात 10 लाख क्षयरुग्ण दत्तक घेण्यात येत आहेत आणि त्यांना दर महिन्याला पौष्टिक आहार वितरित केला जात असल्याची बाब अधोरेखित केली. भारत सरकारच्या सिकल सेल निर्मूलन कार्यक्रमांतर्गत पुढील 3 वर्षात सुमारे 7 कोटी लोकांची सिकल सेल तपासणी करण्यात येईल आणि त्यांना त्यावरील औषधे मोफत देण्यात येतील, ज्यावर सरकार सुमारे 910 कोटी रुपये खर्च करेल, अशी माहिती त्यांनी दिली.
N.Chitale/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2005368)