पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी नवी दिल्लीत पोंगल उत्सवात घेतला सहभाग


"तामिळनाडूतील प्रत्येक घरातून जसा पोंगलचा प्रवाह वाहतो, तसाच प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धीचा प्रवाह वाहो याच शुभेच्छा आपण देत आहोत"

"कुटुंब आणि मित्रांसोबत सण साजरा करण्यासारखीच आजची भावना आहे"

"पिके, शेतकरी आणि गावे बहुतांश सणांच्या केंद्रस्थानी आहेत"

“भरड धान्याला मिळालेल्या प्रोत्साहनामुळे लहान शेतकरी आणि तरुण उद्योजकांना फायदा होत आहे”

"पोंगल सण एक भारत श्रेष्ठ भारत ही राष्ट्रीय भावना प्रतिबिंबित करतो"

“2047 पर्यंत विकसित भारत निर्माण करण्यासाठी ही एकतेची भावना सर्वात मोठे सामर्थ्य आहे”

Posted On: 14 JAN 2024 12:16PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री एल मुरुगन यांच्या निवासस्थानी पोंगल उत्सवात सहभाग घेतला.

पंतप्रधानांनी पोंगल निमित्त शुभेच्छा दिल्या आणि या प्रसंगी संबोधित करताना ते म्हणाले की तामिळनाडूमध्ये प्रत्येक घरात या उत्सवाचा उत्साह दिसून येत आहे. सर्व नागरिकांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि समाधानाचा प्रवाह सतत वाहत राहो, अशा शुभेच्छा मोदी यांनी दिल्या. काल साजरा झालेला लोहरी उत्सव, आज साजरा होत असलेले मकर उत्तरायण, उद्या साजरी होणारी मकर संक्रांती आणि लवकरच होणारी माघ बिहूची सुरुवात याचाही त्यांनी उल्लेख केला. सध्या देशभर सुरू असलेल्या उत्सवाच्या कालावधीसाठी मोदी यांनी सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान मोदी यांनी काही चेहरे परिचित दिसत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि गेल्या वर्षी तामिळ पुथंडू उत्सवादरम्यान त्यांची भेट झाल्याचे आपल्या आठवणीत असल्याचे सांगितले. आजच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केल्याबद्दल केंद्रीय मंत्री एल मुरुगन यांचे आभार मानतानाच कुटुंब आणि मित्रांसोबत सण साजरा करण्यासारखीच ही भावना आहे असे पंतप्रधानांनी सांगितले.

महान संत थिरुवल्लुवर यांचे  स्मरण करून पंतप्रधानांनी राष्ट्र उभारणीत सुशिक्षित नागरिक, प्रामाणिक उद्योजक आणि चांगले पीक यांची भूमिका अधोरेखित केली आणि सांगितले की पोंगलच्या काळात देवाला ताजे पीक अर्पण केले जाते जे अन्नदाता किसानला उत्सव परंपरेच्या केंद्रस्थानी ठेवते. ग्रामीण भाग, पीक आणि शेतकरी यांच्याशी भारतातील प्रत्येक सणाचा असलेला संबंध त्यांनी अधोरेखित केला. गेल्या वेळी भरड धान्य आणि तमिळ परंपरा यांच्यातील संबंधाबद्दल आपण जे बोललो होतो त्याचे त्यांनी स्मरण केले. श्री अन्न या सुपरफूडबद्दल नवीन जागरूकता येत आहे आणि अनेक तरुणांनी भरड धान्य-श्री अन्नावर आधारित स्टार्टअप उपक्रम हाती घेतल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. भरड धान्याची शेती करणाऱ्या ३ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना भरड धान्य संवर्धनाचा थेट लाभ मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली.

पोंगल उत्सवादरम्यान तामिळ समुदायातील महिलांनी घराबाहेर कोलम रेखाटण्याची परंपरा लक्षात घेऊन, पंतप्रधानांनी ही प्रक्रिया बारकाईने पाहिली आणि निरीक्षण नोंदवले की पीठ वापरून जमिनीवर अनेक ठिपके बनवून हे नक्षीकाम केले आहे, या प्रत्येकाचे वेगळे महत्त्व आहे, मात्र जेव्हा हे सर्व ठिपके जोडले जातात आणि एक मोठी कलाकृती तयार करण्यासाठी यात रंग भरले जातात तेव्हा कोलमचे खरे रूप अधिक भव्य होत उजळून निघते. कोलम आणि भारताच्या विविधतेत साम्य व्यक्त करत पंतप्रधान म्हणाले की जेव्हा देशाचा प्रत्येक कोपरा भावनिकरित्या एकमेकांशी जोडला जातो तेव्हा देशाचे सामर्थ्य नवीन स्वरूपात दृगोच्चर होते. पोंगलचा सण एक भारत श्रेष्ठ भारत ही राष्ट्रीय भावना प्रतिबिंबित करतो”, असे  मोदी यांनी म्हटले आहे. काशी-तामिळ संगमम आणि सौराष्ट्र-तामिळ संगमम यांनी सुरू केलेल्या परंपरेत तामिळ समुदायाने मोठ्या संख्येने उत्साही सहभाग नोंदवल्याने हाच भाव दिसून आल्याचे त्यांनी नमूद केले.

“2047 पर्यंत विकसित भारत निर्माण करण्यासाठी ही एकतेची भावना सर्वात मोठे सामर्थ्य असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. आपण लाल किल्ल्यावरून  जे पंचप्राण आवाहन केले  त्याचा मुख्य घटक म्हणजे देशाच्या एकात्मतेला उर्जा देणे आणि एकता मजबूत करणे होतेअसे ते म्हणाले. राष्ट्राची एकात्मता मजबूत करण्याच्या संकल्पासाठी पोंगलच्या या शुभमुहूर्तावर पुन्हा एकदा समर्पित होण्याच्या आवाहनाने त्यांनी आपल्या संबोधनाचा समारोप केला

***

M.Iyengar/S.Naik/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1995986) Visitor Counter : 152