ऊर्जा मंत्रालय

भविष्याकडे पहा, अद्ययावत रहा आणि योग्य विश्लेषणाच्या आधारे सरकारला सल्ला द्या: ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर के सिंह यांनी केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या 50 व्या स्थापना दिनानिमित्त केले आवाहन


"तंत्रज्ञान कुठेही उदयास येवो, आम्ही ते स्वीकारू.”

Posted On: 15 OCT 2023 7:17PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली येथे झालेल्या केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या 50 व्या स्थापना दिन सोहळ्याला केंद्रीय ऊर्जा तसेच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर. के. सिंह यांच्या हस्ते झाले. या वेळी बोलताना ते म्हणाले की " देशातील सर्व ऊर्जा ग्राहकांना पुरेशा गुणवत्तेचा विश्वासार्ह 24×7 वीज पुरवठा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीकोनातून या दिशेने कार्य करणारे केंद्रीय विद्युत प्राधिकरण (CEA) भारतातील वीज क्षेत्राच्या उत्क्रांतीत आघाडीवर आहे तसेच देशाच्या विजेच्या गरजांचे नियोजन आणि व्यवस्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. गेल्या पाच दशकांच्या इतिहासात, प्राधिकरणाने देशाला विश्वासार्ह आणि शाश्वत वीजपुरवठा सुनिश्चित करण्याप्रति सातत्याने आपली वचनबद्धता दाखवली आहे."

भारत सरकार आणि उर्जा क्षेत्रातील इतर सर्व भागधारकांना तांत्रिक आणि धोरणात्मक सहाय्य प्रदान करणारी, भारत सरकारच्या उर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली केंद्रीय विद्युत प्राधिकरण ही संस्था, आज 15 ऑक्टोबर 2023 रोजी आपला 50 वा स्थापना दिवस साजरा करत आहे.

यावेळी ऊर्जा सचिव पंकज अग्रवाल; केंद्रीय विद्युत प्राधिकरणाचे अध्यक्ष घनःश्याम प्रसाद तसेच सरकार आणि उद्योगाच्या क्षेत्रातील इतर ऊर्जा भागधारक उपस्थित होते.

"कोणते बदल आवश्यक आहेत ते ओळखा, आणि ते अंमलात आणण्याची इच्छा बाळगा

या कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रीय ऊर्जा मंत्री आर.के सिंह यांनी अधिकार्‍यांना ऊर्जा क्षेत्र आणि प्रणालींमध्ये सुधारणांसाठी कोणत्या गरजा आवश्यक आहेत याचा विचार करण्याचा सल्ला दिला. तसेच बदल आणि सुधारणा अंमलात आणण्याची इच्छाशक्ती असली पाहिजे, असे सांगितले. आपण अजूनही नियम विकसित करण्याच्या टप्प्यात आहोत, आपण अजूनही त्रुटी शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असे  सांगितले. आपण आधुनिकीकरणाची कास धरून आपली प्रणाली व्यवहार्य तसेच नवीन आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम बनवली असली तरीही आपला आधुनिकीकरणाचा पुढचा प्रवास सुरुच आहे.असेही ते म्हणाले.

भविष्याकडे पाहणे, अद्ययावत राहणे आणि सरकारला सल्ला देणे ही केंद्रीय विद्युत प्राधिकरणाची भूमिका आहे

मंत्र्यांनी केंद्रीय विद्युत प्राधिकरण समुदायाला आपल्या भूमिकेचा विचार करण्याचे आवाहन केले. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाची मुख्य भूमिका भविष्याचा विचार करणे आणि उर्जा क्षेत्रात कोणत्या यंत्रणा आणि तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे हे ओळखणे असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी अभ्यास करा, धोरणांमधील तफावत ओळखून समतोल साधा, तंत्रज्ञानातील नवीनतम घडामोडींची माहिती घ्या आणि त्यावर आधारित सरकारला सल्ला द्या, असे आवाहन सिंह यांनी केले. त्यासाठी तुम्हाला नवीनतम मासिकांचा अभ्यास करावा लागेल, संकेतस्थळांना भेट द्यावी लागेल, जग कुठे चालले आहे हे जाणून घेऊन आपल्या तांत्रिक आणि संशोधन संस्थांना आपण दिशा कशी देऊ शकतो याचा विचार करावा लागेल, असा सल्ला त्यांनी दिला. जगात कुठेही प्रगत तंत्रज्ञान उदयास येवो, आपण त्याचा स्वीकार करुन, असे आश्वासन त्यांनी दिले.

श्नी सिंह यांनी या कार्यक्रमात बोलताना खुल्या मनाचे महत्त्व तसेच उत्पादन, संक्रमण आणि वितरण यांचा समावेश असलेल्या संपूर्ण यंत्रणेकडे लक्ष देण्याची गरज हे मुद्दे अधोरेखित केले. जेथे कामाची गरज निर्माण होते त्या ठिकाणी जाऊन काम करावे लागेल आणि ते काम स्वतःच व्यक्तीश: करावे लागेल‌ तेंव्हा  तेथील प्रणाली कशी काम करते हे तुम्हाला कळेल. तुम्ही संपूर्ण प्रणाली जाणून घेतली पाहिजे आणि ही संपूर्ण प्रणाली अधिक चांगले काम करु शकेल यासाठी आवश्यक सुधारणांकडे लक्ष दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

सिंह म्हणाले की, आपण ज्याचे लक्ष्य निर्धारित केले पाहिजे अशा सौरऊर्जा आणि पवन ऊर्जेचे मिश्रण केले तर कशाप्रकारेचे लाभ मिळतील यासारख्या बाबींचे विश्लेषण करणे आणि त्याबाबत सरकारला सल्ला देणे हे केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे काम आहे. "वैज्ञानिक प्रगती कुबड्यांवर होऊ शकत नाही, ती केवळ योग्य विश्लेषणाच्या आधारावरच साधता येते, असेही ते म्हणाले. तुम्‍ही उर्जा क्षेत्रातील सरकारचे प्राथमिक सल्लागार आहात हे तुम्‍हाला तुमच्‍या कामगिरीवरून सिद्ध करण्‍याची आवश्‍यकता आहे. तुम्हाला स्वतःला अद्यतनीत करावे लागेल आणि तुमचे ज्ञान देखील अद्ययावत ठेवावे लागेल. याच्तुया सहाय्यानेच तुम्ही यापुढेही नेतृत्व करत राहाल.असे सिंह यांनी सांगितले.

"भारतीय अर्थव्यवस्था सुमारे 9 ते 10 टक्के दराने वाढू शकेल यासाठी वीज उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे "

आपल्या समोरील आव्हाने खूप मोठी आहेत, परंतु त्या आव्हानांना तोंड देणे खूप रोमांचक आहे, असे सिंह यांनी केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना बोलताना सांगितले. मंत्री म्हणाले की, आपण खुल्या मनाने आव्हानांचा सामना केला तर आपली ऊर्जा व्यवस्था आधुनिक होईल‌.  आपल्याला संक्रमण आणि उत्पादन क्षमता जलद गती वाढवण्याची गरज आहे. आपण सर्व एका मोहिमेवर असून आपल्याला निहित स्वार्थ सोडून काम करायचे आहे, असे त्यांनी सांगितले. विकासाला चालना देण्यासाठी पुरेशी वीज उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे जेणेकरुन आपण आताच्या 9 ते10 वृध्दीदरापेक्षा जास्त वेगाने वाढू शकू.असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संपूर्ण अर्थव्यवस्थेचे विद्युतीकरण करणे आणि हरित उर्जेचा जास्तीत जास्त वापर करणे हा आपला दृष्टीकोन असल्याचे सिंह यांनी सांगितले. 2050 मध्ये आपल्याला किती वीज लागेल? आपल्याला लागणार्‍या सौरऊर्जेची पूर्तता करण्यासाठी आपल्याकडे पुरेशी जमीन असेल का? चला या प्रश्नांची उत्तरे शोधून काढूया आणि गरजेनुसार पर्याय शोधूया. आपल्याला भविष्य घडवायचे आहे. आपण आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्य करु, ज्यामुळे आपला भारत राष्ट्रांच्या समुदायात अग्रस्थानी असेल.असे सिंह यांनी सांगितले.

***

G.Chippalkatti/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1967964) Visitor Counter : 106