वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

पंतप्रधानांनी द्वारका येथील इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्स्पो सेंटरचा पहिला टप्पा "यशोभूमी" राष्ट्राला केला समर्पित, कारागिरांसाठी पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा केला प्रारंभ


भारत मंडपम आणि यशोभूमी केंद्र दिल्लीला परिषद पर्यटनाचे सर्वात मोठे केंद्र बनवणार: पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारत मंडपम आणि यशोभूमी व्यापार, उद्योग, निर्यात आणि रोजगाराला चालना देतील: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल

Posted On: 17 SEP 2023 3:51PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील द्वारका येथे इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्स्पो सेंटर - 'यशोभूमी'च्या  पहिला टप्याचे लोकार्पण केले. त्यांनी विश्वकर्मा जयंतीनिमित्त पारंपरिक कारागीर आणि हस्तकलाकारांसाठी पीएम विश्वकर्मा योजनापीएम विश्वकर्मा बोधचिन्ह, घोषवाक्य  आणि पोर्टलचा प्रारंभ केला.

पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित करताना या भव्य केंद्राच्या उभारणीत श्रमिक आणि विश्वकर्मा यांच्या योगदानाचे कौतुक केले. "आज 'यशोभूमी' देशातील प्रत्येक विश्वकर्मा, प्रत्येक कामगाराला, समर्पित करतो",असे ते म्हणाले.

यशोभूमी हा पंतप्रधानांच्या कौशल्य, गती आणि प्रमाण या दृष्टिकोनाचा भक्कम पुरावा आहे, असे गौरव उद्गार केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आपल्या स्वागत भाषणात काढले. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरचा (IICC) प्रकल्प वेगाने पूर्ण झाला आणि आज यशोभूमीच्या रुपात त्याचे उद्घाटन होत असल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्याची व्याप्ती आजच्या टप्प्याच्या दुप्पट असेल, असे ते म्हणाले. द्वारका येथील हे कन्व्हेन्शन सेंटर हे पंतप्रधान गतिशक्तीच्या आदर्शाचे एक उत्तम उदाहरण आहे, असे गोयल म्हणाले. या केंद्रापासून आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक्स्प्रेसवेने 5 मिनिटांत पोहोचता येते, मेट्रो कनेक्टिव्हिटी 20 मिनिटांत कॅनॉट प्लेसशी जोडते यासोबतच परिसरातील अनेक हॉटेल्स या प्रकल्पासोबत जोडलेले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

गेल्या 9 वर्षात देशात उभारली गेलेली अधिवेशन केंद्रे जागतिक दर्जाची प्रदर्शन केंद्रे बनतील, असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला. भारत मंडपम आणि यशोभूमी व्यापार, उद्योग, निर्यात तसेच रोजगार यांना प्रोत्साहन देतील. यशोभूमी सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र, शेतकरी आणि कारागीरांना प्रोत्साहन देईल तसेच त्यांना नवीन संधी आणि बाजारपेठ उपलब्ध करून देईल, असे ते म्हणाले.

मजबूत अर्थव्यवस्था आणि पायाभूत सुविधा निर्माण करून, गरिबांचे उत्थान करून, डिजिटलायझेशनला चालना आणि भ्रष्टाचारमुक्त सरकार सुनिश्चित करून पंतप्रधानांनी अमृत काळामध्ये भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा पाया घातला आहे, असे वाणिज्यमंत्र्यांनी नमूद केले. पंतप्रधानांनी आपल्या कारागिरांच्या परिश्रमाची पारख केली असून ही योजना त्यांचा सन्मान करणारी आणि त्यांना बळकटी देणारी आहे, असे विश्वकर्मा योजनेच्या ऐतिहासिक शुभारंभाच्या उद्घाटनप्रसंगी गोयल म्हणाले.

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1958268) Visitor Counter : 92


Read this release in: Bengali , English , Urdu , Hindi