कृषी मंत्रालय

नवी दिल्ली इथे खरीप मोहीम 2023-24 वरील कृषी विषयक राष्ट्रीय परिषदेचे आयोजन


देशाला आत्मनिर्भर बनविण्यावर भर देणाऱ्या खरीप मोहीम 2023-24 चे केंद्रीय कृषि मंत्री, नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते उद्‌घाटन

कृषी क्षेत्रामधील भू-स्थानिक डेटासाठी, कृषी मॅपर या एकात्मिक अॅपचे केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन

Posted On: 03 MAY 2023 9:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 मे 2023

केंद्रीय कृषि मंत्री, नरेंद्र सिंह तोमर यांनी 03-05-2023 रोजी नवी दिल्ली मधील NASC कॉम्प्लेक्स इथे खरीप मोहीम 2023-24 वरील कृषी विषयक राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले. परिषदेला संबोधित करताना, ते म्हणाले की, शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा प्राण आहे, आणि तो देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासाचा गाभा आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनामध्ये (जीडीपी) या क्षेत्राचा जवळजवळ 19 टक्के वाटा असून, सुमारे दोन तृतीयांश लोकसंख्या या क्षेत्रावर अवलंबून आहे.

गेल्या सहा वर्षांच्या काळात भारताच्या कृषी क्षेत्राचा, वार्षिक सरासरी 4.6 टक्के वाढीसह मोठा विकास झाला आहे, याबद्दल तोमर यांनी समाधान व्यक्त केले. यामुळे देशाचा सर्वांगीण विकास आणि अन्न सुरक्षेमध्ये कृषी आणि त्याच्याशी संलग्न क्षेत्र महत्वाचे योगदान देऊ शकली.

वर्ष 2022-23 साठीच्या दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार, देशाचे अन्नधान्याचे उत्पादन 3235 लाख टन राहील असा अंदाज आहे, जे 2021-22 मधील अन्नधान्याच्या उत्पादनापेक्षा 79 लाख टन जास्त आहे. तांदूळ, मका, हरभरा, कडधान्ये, रेपसीड, मोहरी, तेलबिया आणि ऊस, या पिकांच्या विक्रमी उत्पादनाचा अंदाज आहे. 2022-23 मध्ये देशाचे एकूण ऊस उत्पादन 4688 लाख टन राहील, असा अंदाज आहे, जे सरासरी ऊस उत्पादनापेक्षा 1553 लाख टन जास्त आहे. फलोत्पादनाबाबतच्या तिसऱ्या  आगाऊ अंदाजानुसार, 2021-22 मध्ये 3423.3 लाख टन इतक्या विक्रमी फलोत्पादनाचा अंदाज आहे, जे 2020-21 च्या उत्पादनापेक्षा 77.30 लाख टन अधिक आहे

पिकांचे उत्पादन आणि उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने, मागील पीक हंगामातील पीक कामगिरीचे मूल्यांकन करून, राज्य सरकारांशी सल्लामसलत करून खरीप हंगामासाठी पीकनिहाय उद्दिष्ट ठरवणे, महत्वाच्या साधन-सामुग्रीचा पुरवठा सुनिश्चित करणे आणि नवोन्मेशी तंत्रज्ञानाचा अवलंब करणे, हे या परिषदेचे उद्दिष्ट होते.

तांदूळ आणि गहू यासारख्या पिकांसाठी वापरली जाणारी अतिरिक्त जमीन, तेलबिया, कडधान्ये आणि मोठे निर्यात मूल्य असलेल्या कमी प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या पिकांकडे वळवण्यासाठी, कृषी-पर्यावरण आधारित पीक नियोजन, हे सरकारचे प्राधान्य आहे. रब्बी हंगाम 2020-21 मध्ये राबवण्यात आलेल्या विशेष मोहरी कार्यक्रमाला सर्वात मोठे यश मिळाले आहे. मोहोरीचे उत्पादन गेल्या 3 वर्षात 91.24 वरून 40% ने वाढून 128.18 लाख टन वर पोहोचले आहे. उत्पादकता 1331 वरून 1447 किलो/हेक्टर वर पोहोचली असून, यामध्ये 11% वाढ नोंदवण्यात आली. रेपसीड आणि मोहरीचे क्षेत्र 2019-20 मधील 68.56 लाख हेक्टर वरून, 2022-23 मध्ये 88.58 लाख हेक्टर वर पोहोचले असून, यामध्ये 29% वाढ झाली. केंद्र आणि राज्य सरकारने वेळेवर उचललेल्या पावलांमुळे हे उल्लेखनीय यश मिळवणे शक्य झाले.

आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष महोत्सवाचा एक प्रमुख भाग म्हणून भारतानं नवी दिल्लीत भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या (आयएआरआय) परिसरात 18 मार्च 2023 रोजी जागतिक भरड धान्य ( श्री अन्न) परिषद आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले. 2023 च्या आंतरराष्ट्रीय भरड दिनाचे औचित्य साधून पंतप्रधानांनी नाणे आणि टपाल तिकीटाचे अनावरण केले.  त्यानंतर भरडधान्यांच्या मानकांवरील पुस्तकाचेही त्यांच्या हस्ते प्रकाशन झाले. 

पंतप्रधानांनी आयसीएआर-आयआयएमआर ला ग्लोबल सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून घोषित केले. त्यानंतर श्री अन्न आणि आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष 2023 वर एक लघुपट प्रदर्शित करण्यात आला. सर्व भागधारकांसोबत बैठका (व्यक्तिगत/ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) नियमितपणे आयोजित करून वर्षभर नियोजनबद्ध पद्धतीने हे वर्ष साजरे केले जाईल, याकडे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय लक्ष देत आहे.  . भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर)- भारतीय भरड धान्य संशोधन संस्था (आयआयएमआर), कृषी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा), जल व्यवस्थापनासाठी आंतरराष्ट्रीय अर्ध- शुष्क कटिबंधातील पीक संशोधन संस्था (आयसीआरआयएसएटी) आणि इतर तज्ञ संस्था देखील संशोधन आणि विकास, उत्पादकता आणि मूल्यवर्धनाला प्रोत्साहन देत आहेत.

 

 S.Patil/Rajashree/Prajna/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1921816) Visitor Counter : 480


Read this release in: Telugu , English , Urdu