उपराष्ट्रपती कार्यालय
‘मन की बात’ हा भारत @ 100 चा पाया: उपराष्ट्रपती
'मन की बात' ने स्थानिक कला आणि कारागीरांसाठी बाजारपेठ तयार केली, ईशान्येकडील आणि अन्य राज्यांची संस्कृतीही केली लोकप्रिय: उपराष्ट्रपती
मन की बात माध्यमातून होणारी पंतप्रधानांची भाषणे देशासाठी सकारात्मकतेचे दीपस्तंभ: उपराष्ट्रपती
उपराष्ट्रपतींनी ‘मन की बात @100’ या संमेलनाचे केले उद्घाटन, या प्रसंगी दोन पुस्तकांचे केले प्रकाशन
Posted On:
26 APR 2023 5:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 एप्रिल 2023
'मन की बात' कार्यक्रमाचा 100 वा भाग पूर्ण होत असून, तो 'इंडिया @ 100' चा पाया ठरेल असे उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनी आज सांगितले. भारत 2047 मध्ये शताब्दी वर्ष साजरे करेल तेव्हा तो जगात अव्वल असेल असे ते म्हणाले.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आयोजित केलेल्या 'मन की बात @ 100' या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन धनखर यांनी केले. 'मन की बात' देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. व्याप्ती आणि लोकप्रियतेमध्ये या कार्यक्रमाची कोणाशी तुलना होऊ शकणार नाही असे ते म्हणाले. स्थानिक कला आणि कारागीरांना ओळख आणि ब्रँड मूल्य देण्यासाठी तसेच त्यांच्याकरीता बाजारपेठ बनवण्यासाठी त्यांनी या कार्यक्रमाला श्रेय दिले.
स्वच्छ भारत, बेटी बचाओ बेटी पढाओ यांसारख्या सरकारच्या प्रमुख उपक्रमांना मन की बातने मोठी चालना दिली आणि त्यांना लोकचळवळीत रूपांतरित केले, असे उपराष्ट्रपती म्हणाले. यातील पंतप्रधानांची भाषणे हे कोविड महामारीच्या काळात राष्ट्रासाठी ‘सकारात्मकतेचे दीपस्तंभ’ होते असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचा 100 वा भाग (30 एप्रिल 2023 रोजी प्रसारित होणारा) हा एक ऐतिहासिक मैलाचा दगड असल्याचे धनखर यांनी नमूद केले. ईशान्येकडील आणि इतर राज्यांची संस्कृती आणि सणांना लोकप्रिय करण्यासाठी तसेच मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ म्हणून काम केल्याबद्दल या कार्यक्रमाचे त्यांनी कौतुक केले. 'मन की बात', खरं तर, आपल्या संस्कृती -सभ्यतेच्या भावनांचे प्रतिबिंब आहे', असे त्यांनी सांगितले.
राष्ट्राच्या दैदिप्यमान कामगिरीचा सर्वांनी अभिमान बाळगावा, असे आवाहन करून ‘नेहमी राष्ट्र प्रथम ही भावना ठेवली पाहिजे’ यावर उपराष्ट्रपतींनी भर दिला. भारताच्या राष्ट्रपतीपदी एका आदिवासी महिलेच्या झालेल्या निवडीमुळे ‘नारी शक्ती’ने भारताच्या विकासाची गाथाही अधोरेखित केली आहे असे ते म्हणाले. विविध कल्याणकारी उपक्रम जसे की थेट लाभ हस्तांतरण, पीएम उज्ज्वला योजना, पीएम किसान सन्मान निधी आणि इतर हे देशातील सामाजिक-आर्थिक परिस्थितीतील परिवर्तनाचे निदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान धनकर यांनी 'माय डिअर फेलो सिटिझन्स...' या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन केले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. माननीय पंतप्रधानांनी आकाशवाणीवरील कार्यक्रमात उल्लेख केलेल्या 100 हून अधिक प्रेरणादायी कथांची झलक यात सादर केली आहे. प्रसार भारतीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर वेम्पती यांनी लिहिलेल्या “कलेक्टिव्ह स्पिरिट, कॉंक्रिट ऍक्शन” या पुस्तकाचेही त्यांनी प्रकाशन केले. ‘मन की बात’ कार्यक्रमाचा देशावर काय प्रभाव पडला याचे वर्णन यात केले आहे.
माहिती आणि प्रसारण तसेच युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर, माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा, प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी, उद्घाटन प्रसंगी उपराष्ट्रपतींसोबत होते. किरण बेदी, आमिर खान, रवीना टंडन, रिकी केज, निखत जरीन यासारख्या मान्यवर व्यक्ती आणि उद्घाटनानंतरच्या वेगवेगळ्या सत्रांचे तज्ञ मार्गदर्शक यावेळी उपस्थित होते. "मन की बात" च्या विविध भागांमध्ये पंतप्रधानांनी उल्लेख केलेल्या देशाच्या विविध भागांतील सुमारे 100 प्रतिष्ठित नागरिकही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
* * *
G.Chippalkatti/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1919893)
Visitor Counter : 113