विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणाऱ्या "हरस्टार्ट" मंचाचे नुकतेच उद्घाटन झाल्याची केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी दिली माहिती
Posted On:
17 MAR 2023 3:21PM by PIB Mumbai
महिला स्टार्टअप आणि महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी नवनिर्मित ‘हरस्टार्ट’ मंच सुरू करण्यात आल्याची माहिती केंद्रीय पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्ती वेतन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज दिली. राष्ट्रपतींच्या हस्ते या नवीन मंचाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले असे ते म्हणाले.

पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीतर्फे आयोजित भारत स्टार्टअप परिषद आणि प्रदर्शन 2023 च्या पूर्ण सत्राला त्यांनी मार्गदर्शन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सना एक वर्षापर्यंत 20,000 रुपये मासिक भत्ता देण्याचे प्रस्तावित केल्याचे त्यांनी सांगितले.
उद्योजक म्हणून महिलांचे वाढते प्रमाण डॉ जितेंद्र सिंह यांनी अधोरेखित केले. महिलांच्या नेतृत्वाखालील उद्योग देशात रोजगाराच्या संधी निर्माण करून, लोकसंख्याशास्त्रीय बदल घडवून आणि महिला उद्योजकांच्या पुढच्या पिढीला प्रेरणा देऊन समाजात लक्षणीय भूमिका बजावत आहेत असे ते म्हणाले. भारतात किमान 36 युनिकॉर्न आणि संभाव्य युनिकॉर्नमध्ये किमान एक महिला संस्थापक किंवा सह-संस्थापक आहे. उपक्रम, योजना, नेटवर्क आणि समुदायांद्वारे महिला उद्योजकतेसाठी सक्षम प्रणाली तयार करण्यासाठी तसेच स्टार्टअप परिसंस्थेतील विविध घटकांमध्ये भागीदारी सक्रिय करण्यासाठी केन्द्र सरकार वचनबद्ध आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
भारत झपाट्याने नवकल्पनांचे जन्मस्थान म्हणून उदयाला येत आहे. ज्ञान-आधारित आर्थिक विकास प्रारुपाकडे वळत असून श्रम-केंद्रित, भांडवल-केंद्रित आणि उत्पादन राष्ट्र म्हणून त्याचे लाभ नव्याने शोधण्यासाठी भारत वचनबद्ध आहे असे त्यांनी सांगितले.
सरकारचा स्टार्टअप इंडिया कृती आराखडा देशातील उद्योजकीय परिसंस्था बळकट करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे पाऊल आहे. आर्थिक वाढ आणि रोजगार निर्मिती या दोहोंसाठी एक इंजिन म्हणून भारतामध्ये नवोन्मेषाच्या संवर्धनाकरता एक भक्कम परिसंस्था तयार करणे हा कृती आराखड्याचा उद्देश असल्याचे ते म्हणाले.
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उत्पादने विकसित करण्यासाठी आणि ते कमीत कमी वेळेत वितरित करण्याकरता उद्योगांसोबत भागीदारी करणे आणि शिक्षण तसेच उद्योग यांच्यातील संबंध मजबूत करणे ही काळाची गरज आहे असे त्यांनी नमूद केले.
“उद्योगांनी सुरुवातीपासूनच योग्य उत्पादनांची निवड केली आणि सरकारच्या समतुल्य गुंतवणूक केली तर स्टार्टअप्स शाश्वत होतील. तेव्हाच आपण पंतप्रधानांचे “समर्थ” आणि “आत्मनिर्भर भारताचे” स्वप्न साकार करू शकू. देशातील नवोन्मेषी परिसंस्थेला चालना देण्यासाठी सरकारकडून निधीची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या परिसंस्थेत पीएचडीसीसीआय सदस्यांची खूप महत्त्वाची भूमिका आहे. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे आपण आजच्या 108 युनिकॉर्नवरून पुढल्या वर्षात 200 युनिकॉर्नपर्यंत झेप घेण्यास सज्ज आहोत असे ते म्हणाले.
***
N.Chitale/V.Ghode/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1908132)
Visitor Counter : 195