सांस्कृतिक मंत्रालय

रोजगार निर्मितीची भूमी म्हणून भारत उदयाला येत असल्याचे केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांचे प्रतिपादन

Posted On: 28 JAN 2023 4:51PM by PIB Mumbai

 

केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्री, जी किशन रेड्डी  आज हैदराबादमधील ताज कृष्णा इथे जी-20 च्या स्टार्टअप20 एन्गेजमेंट ग्रुपची  प्रारंभिक बैठकीला उपस्थित होते.  या बैठकीला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश, जी-20 चे शेर्पा आणि नीती  आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत हे देखील उपस्थित होते.

इनोव्हेटिंग फॉर अमृत काल, इंडिया @2047’ या संकल्पने अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला उपस्थित प्रतिनिधी आणि सहभागींना संबोधित करताना रेड्डी  म्हणाले, आपल्या संकल्पनेला अनुसरून, उत्तरदायित्व पार पाडण्यासाठी, संयुक्त  सहकार्याचे उद्दिष्ट ठेवण्यासाठी आणि यश प्राप्त करून ते वाटून घेण्यासाठी एकत्र येऊन काम करणे हे भारताच्या अध्यक्षतेखालील जी-20 परिषदेचे उद्दिष्ट आहे.  

भारतामधील स्टार्टअप परिसंस्थेबद्दलही जी. किशन रेड्डी यांनी आपले विचार मांडले. ते म्हणाले, "आजच्या स्टार्ट-अप उद्योगात कार्यरत गटासाठी भारत हे एक आदर्श ठिकाण आहे, कारण आपल्याकडे 350 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या एकत्रित मूल्याची 100 पेक्षा जास्त युनिकॉर्नसह जवळजवळ 85,000 नोंदणीकृत स्टार्ट-अप्स आहेत. सर्वात जास्त युनिकॉर्न असलेल्या देशांमध्ये जगात तिसऱ्या स्थानावर असलेला भारत, लवकरच या यादीत पहिल्या स्थानावर झेप घेणार आहे. स्टार्ट अप्सच्या माध्यमातून आपल्या तरुणांना नोकरी शोधणारे बनण्याऐवजी रोजगार निर्माण करणारे बनायचे आहे. आपले स्टार्टअप्स नवोन्मेषी आहेत, तसेच नवीन उत्पादने आणि अनुभवांचा शोध घेणारे आणि त्यामध्ये गुंतवणूक करणारे आहेत. आपल्या स्टार्टअप परीसंस्थेचे यश हे ध्यास, प्रगती आणि स्टार्टअप्सना प्रोत्साहन आणि आधार देण्यासाठीच्या सरकारच्या प्राथमिकतेचे  प्रतीक आहे. आपल्याकडील प्रतिभेचा संचय आणि उत्पादनक्षम लोकसंख्येचा लाभ यामुळे भारत हे गुंतवणुकीसाठी आदर्श ठिकाण ठरले आहे, ते म्हणाले.    

बैठकीला संबोधित करताना जी. किशन रेड्डी यांनी  भारताचा गतिमान नवोन्मेष आणि स्टार्टअप परिसंस्थेला चालना देण्यासाठी भारत सरकारने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांबद्दल सांगितले. रेड्डी यांनी फंड ऑफ फंड्स फॉर स्टार्टअप्स (एफएफएस) योजनेबद्दल सांगितले. 1.25 अब्ज अमेरिकी डॉलर्स (रु. 10,000 कोटी) च्या भांडवली रकमेसह सुरु करण्यात आलेल्या या योजनेमुळे सुमारे 1.75 अब्ज डॉलर्स (रु. 13,500 कोटी) गुंतवणुकीला चालना मिळाली. त्यांनी सरकारच्या स्टार्टअप इंडिया सीड फंड योजनेबद्दलही सांगितले, यामध्ये 126 इनक्यूबेटर्ससाठी 60 दशलक्ष डॉलर्स (रु. 455.25 कोटी) मंजूर करण्यात आले आहेत. जागतिक नवोन्मेष निर्देशांकात भारताने गेल्या 7 वर्षांमध्ये 41 स्थानांनी झेप घेतली आहे, याचे संपूर्ण श्रेय भारत सरकारच्या अथक प्रयत्नांना असल्याचे रेड्डी यांनी नमूद केले.

***

S.Kakade/R.Agashe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1894396) Visitor Counter : 120


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu