पंचायती राज मंत्रालय
केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांच्या हस्ते प्रकल्प प्रणित तालुका पंचायत विकास योजना आणि जिल्हा पंचायत विकास आराखडा योजनेविषयीच्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन
Posted On:
05 JAN 2023 10:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जानेवारी 2023
केंद्र सरकारच्या, पंचायत राज्य मंत्रालयाने, नवी दिल्लीत 5 आणि 6 जानेवारी असे दोन दिवस प्रकल्प प्रणित तालुका पंचायत विकास आराखडा (BPDP) आणि जिल्हा पंचायत विकास आराखडा (DPDP) याविषयी माहिती देण्यासाठी एका राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांच्या हस्ते आज या कार्यशाळेचे उद्घाटन झाले. या राष्ट्रीय कार्यशाळेचा उद्देश, प्रकल्प प्रणित तालुका पंचायत विकास आराखडा आणि जिल्हा पंचायत विकास आराखडा योजनेचा अंगीकार करणे, त्यामागची संकल्पना स्पष्ट करणे आणि हा आराखडा लोकप्रिय करणे हा आहे. ज्यामुळे, पंचायत विकास योजनांच्या प्रक्रिया आणि अंमलबजावणी प्राधान्याने करत, त्याला गती देता येईल.

या कार्यशाळेत, देशभरातील 650 पेक्षा अधिक प्रतिनिधी सहभागी झाले असून, त्यात लोकप्रतिनिधी आणि जिल्हापंचायत तसेच तालुका पंचायत क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्याशिवाय, विविध महत्वाची मंत्रालये/विभाग तसेच नाबार्ड, इर्मा, युनिसेफ सारख्या विविध संस्था/संघटना यांचे प्रतिनिधीही या कार्यशाळेत सहभागी झाले आहेत.
कपिल पाटील यांनी या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी ते म्हणाले, “ही राष्ट्रीय कार्यशाळा अगदी योग्य वेळी आयोजित केली जात आहे. – नवीन वर्ष सुरु होत असताना – ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी योजना तयार करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे, जी “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास” या संकल्पनेशी सुसंगत आहे. जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर काम करून राष्ट्र उभारणीत आपल वाटा उचलणे हा आपला सामायिक संकल्प असला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
पंचायत राज संस्थांच्या माध्यमातून योग्य समन्वय साधून सर्व हितसंबंधीयांनी एकत्र प्रयत्न करून स्थानिक स्तरावर शाश्वत विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे असे आवाहन कपिल पाटील यांनी केले. त्रिस्तरीय पंचायत व्यवस्थांनी सर्व त्या आवश्यक सुविधा उभारून, शहरी भागात उपलब्ध असलेल्या सर्व सोयी/संधी पुरविण्यासाठी खेड्यांना आणि ग्रामीण भागांना प्रधान्याने उपलब्ध करुन द्याव्यात, जेणेकरून शहरी – ग्रामीण भागांतील दरी कमी होईल, असेही ते पुढे म्हणाले.
N.Chitale/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1889031)